मधूर स्वरशब्दांची अमृतवर्षिणी मैफिल
By Admin | Updated: July 3, 2014 00:59 IST2014-07-03T00:59:48+5:302014-07-03T00:59:48+5:30
अभिजात शास्त्रीय संगीतातील राग, रागिण्यांमध्ये विविध भावनांचा समुच्चय स्वरांच्या माध्यमातून केला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित गीतेही त्या रागाचे सौंदर्य घेऊन जन्माला येतात.

मधूर स्वरशब्दांची अमृतवर्षिणी मैफिल
रंगबावराचे आयोजन : शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गीतांचे सादरीकरण
नागपूर : अभिजात शास्त्रीय संगीतातील राग, रागिण्यांमध्ये विविध भावनांचा समुच्चय स्वरांच्या माध्यमातून केला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित गीतेही त्या रागाचे सौंदर्य घेऊन जन्माला येतात. त्यामुळे ही गीतेही जाणकार रसिकांच्या मनातच घर करतात. अशाच सरस अनुभूतीच्या ‘अमृतवर्षिणी’ या अनोख्या मैफिलीचे आयोजन रंगबावरा संस्थेतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला.
श्रोत्यांच्या कानावर हळुवार मोरपीस फिरविणारी विविध रागातील गीतांनी, बंदिशींनी यावेळी रसिकांचा ताबा घेतला. अनेकदा ऐकलेली, आवडीची आणि भावपूर्ण शब्दांची ही गीते नेमकी कोणत्या रागातील आहे, हे यावेळी सहजतेने उलगडत असल्याने रसिकांना ही मैफिल आनंदपर्वणी होती. सायली आचार्य, सुजाता व्यास या प्रतिभावंत गायिकांनी यावेळी शास्त्रीय संगातातील अर्थभावपूर्ण बंदिशी तर विवेक देशपांडे, अजय देवगावकर यांनी हिंदी-मराठी गीतांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांना आनंद दिला. यावेळी शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर काही रागातील रचना सादर करून आपल्या वादनाचा परिचय दिला. बालपणापासून स्वर शब्दांच्या उद्यानात बागडण्याचे भाग्य लाभलेल्या सुपरिचित गायिका सायली आचार्य या युवा गायिकेने राग मधुवंतीने गायनाला प्रारंभ केला. प्रख्यात गायक पं. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्या खास मित्रभावातील सांगितिक संवादावर कुमारजींनी रचलेल्या ‘मै आऊ तेरे मंदरवा...’ व द्रुत लयीतील ‘जाऊ बलिहारी तोपे ना...’ या बंदिशीसह ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे...’ हे गीतही सायलीने तयारीने सादर केले.
याशिवाय राग नंदमधील कुमारजींनी रचलेली बंदिश व तराणा तर ‘तू जहां जहां चलेगा...’ हे सिनेगीत सादर करून तिने रसिकांची दाद घेतली. संगीतातील जाणत्या गायिका सुजाता व्यास यांनी राग यमनकल्याणमधील पारंपरिक बंदिश ‘अवगुन न किजीए...’ तर विवेक देशपांडे यांनी ‘वो शाम कुछ अजीब थी...’ हे गीत सादर केले. सुजाता यांनी ‘नीर भरन कैसे जाऊ अब...’ ही रसिली ठुमरी, बंदिश, तराणा आणि त्यावरील अजय देवगावकर यांनी सादर केलेले ‘जिया जरत रहत दिन रैन वो रामा...’ सादर करून दाद मिळविली. शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर राग गौडमल्हारमधील बंदिश, सुरेलतेने सादर करून राग मेघमल्हारमधील बंदिशही पेश केली.
सुजाता व्यास यांनी डॉ. बाळासाहेब पुरोहित यांनी रचलेली राग चारुकेशीतील बंदीश ‘लाग रही सुरसे प्रित..’ तयारीने सादर केली. अजयने संत नामदेव महाराजांच्या अभंगाच्या भैरवीने या कार्यक्रमाचे समापन केले.
या मैफिलीचे निवेदन अधिश्री देशपांडे आणि अनुराधा देशपांडे यांनी केले. गायकांना ओंकार वैद्य-तबला, अजय गोसावी व भाविक मणियार-संवादिनी, उज्ज्वला गोकर्ण - सहतालवाद्य आणि परिमल जोशी यांनी सिंथेसायझरवर साथसंगत केली.(प्रतिनिधी)