राज्यात महायुतीला २४६ मतदारसंघात आघाडी

By Admin | Updated: May 19, 2014 00:41 IST2014-05-19T00:41:26+5:302014-05-19T00:41:26+5:30

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. महाराष्ट्रातही मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले असून विधानसभानिहाय विचार केला

The alliance in 246 constituencies of Mahayuti in the state | राज्यात महायुतीला २४६ मतदारसंघात आघाडी

राज्यात महायुतीला २४६ मतदारसंघात आघाडी

सरकारने राजीनामा द्यावा : देवेंद्र फडणवीस यांची मागणी

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. महाराष्ट्रातही मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले असून विधानसभानिहाय विचार केला असता महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदार संघापैकी महायुतीला २४६ मतदार संघातआघाडी मिळाली आहे. तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने लोकांचा विश्वास गमावलेला आहे. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनीच नव्हे तर या सरकारनेच राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रपरिषदेद्वारे केली. लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या निवासस्थानी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आ. सुधाकर देशमुख सुद्धा होते. आ. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नाही. १९७७ मध्ये सुद्धा संपूर्ण देशाने काँग्रेसला नाकारले असताना महाराष्ट्राने त्यांची साथ दिली होती. परंतु या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे पानिपत झाले आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकूण २ कोटी ५० लाख (५२.७१ टक्के) मते मिळाली आहेत. यामध्ये एकट्या भाजपलाच १ कोटी ३३ लाख मते मिळाली तर शिवसेनेला १ कोटी मते मिळाली. काँग्रेसला ८८ लाख तर राष्ट्रवादीला ७७ लाख मते मिळाली. २००९ च्या तुलनेत भाजपला दुप्पट मते मिळाली आहेत. भाजपने एकूण २४ लोकसभेच्या जागा लढविल्या. त्यामध्ये १४४ विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. यापैकी १३३ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आहे. शिवसेनेने २० जागा लढविल्या. त्यातील १२० विधानसभा मतदार संघापैकी १०१ मतदार संघात आघाडी मिळाली. स्वाभिमानी शेतकरीने २ जागा लढविल्या. त्यातील १२ पैकी ९ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आणि राष्ट्रीय समाज पक्षाने लढलेल्या एका जागेतील ६ मतदार संघापैकी ३ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली. काँग्रेसला केवळ ४० विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसची कधीच झाली नाही. स्वतंत्र विदर्भाबाबत बोलताना ते म्हणाले, विदर्भाचे आम्ही नेहमीच समर्थन केले आहे. त्यावर आजही आम्ही ठाम आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. जागा बदल शक्य, नेतृत्वावर निर्णय नाही महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ही महायुती मिळून लढत असते. मुख्यमंत्री प्रोजेक्ट करण्याबाबत कुठलीही चर्चा नाही. ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे आमचे धोरण होते. परंतु त्यामुळे तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. तेव्हा आधी निवडणूक लढवायची नेतृत्व कोण करणार याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. भाजप-सेनेमधील काही जागांमध्ये बदल करण्यात येतील. परंतु त्याचा निर्णय चर्चेतून सोडविला जाईल, त्यासाठी वाद होणार नाही. विधानसभेची तयारी आम्ही सुरू केली असून यावेळी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले. अमित शहा यांच्या रणनीतीचा उपयोग करू अमित शहा यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात येत असल्याबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी पत्रकारांनी त्यांना छेडले असता आपल्याला त्याबाबत काहीच माहिती नाही. प्रभारीपद हे केंद्रीय नेतृत्वाच्या अखत्यारीतील विषय आहे. राजीव प्रताप रुडी यानी चांगले काम केल्यानेच महाराष्ट्रात भाजपला इतके यश मिळाले. त्यामुळे सध्यातरी तेच आमचे प्रभारी आहेत. परंतु अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात जी जादू केली आहे, त्यासाठी त्यांनी कोणती रणनीती अवलंबिली याचा नक्कीच उपयोग करू घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The alliance in 246 constituencies of Mahayuti in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.