सारे काही आरक्षणासाठी...
By Admin | Updated: September 1, 2014 01:09 IST2014-09-01T01:09:10+5:302014-09-01T01:09:10+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा मुख्य मुद्दा राहणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. या समाजाला आरक्षण मिळाले, तर बारामती व म्हाडा

सारे काही आरक्षणासाठी...
मागासवर्गीय कृती समिती निवडणूक लढविणार : संजय हेडाऊ यांची माहिती
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा मुख्य मुद्दा राहणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. या समाजाला आरक्षण मिळाले, तर बारामती व म्हाडा त्यांच्या हातून जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने अजूनपर्यंत केंद्राकडे प्रस्ताव पाठविलेला नाही. यावरून सत्तेत सहभागी झाल्याशिवाय मागावर्गीय समाजाचा विकास शक्य नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धनगर समाज संघर्ष समिती व मागासवर्गीय कृती समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात ६० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी भाजप-सेना महायुतीशी चर्चा करून, जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजय हेडाऊ यांनी दिली.
धनगर समाज संघर्ष समिती व मागासवर्गीय कृती समितीच्यावतीने ‘आरक्षणासाठी राजकीय हक्क परिषदेचे’ रविवारी हुडकेश्वर रोडवरील लोहार समाज भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. हेडाऊ पुढे म्हणाले, ५० ते ९० हजार मतदारसंख्या असलेल्या समाजाला त्या क्षेत्रात प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यानुसार कृती समितीने चिमूर, हिंगणा, आर्णी, गडचिरोली, आमगाव, अलिबाग, विक्रमगड व राळेगाव यासारख्या मतदार क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे.
कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील धनगर, हलबा, माना, गोवारी, छत्री, इंजवार, बिंजवार, कोळी, महादेव कोळी, मन्नेवार व ठाकूर अशा विविध ३३ जाती एकत्र आल्या आहेत. या सर्व समाजाचे मतदान आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महायुतीने आमच्या मागणीनुसार जागा दिल्या नाहीत, तर स्वबळावर १०० ते १२५ जागा लढविण्याची सुद्धा तयारी असल्याचे यावेळी हेडाऊ यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री रमेश गजभिये, माजी आमदार अनंत कुमार पाटील व विजय मोरे उपस्थित होते.
परिषदेत तीन ठराव पारित
धनगर समाज संघर्ष समिती व मागासवर्गीय कृती समितीच्यावतीने आयोजित ‘आरक्षणासाठी राजकीय हक्क परिषदेत’ विविध अन्यायग्रस्त मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजय हेडाऊ, धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री दशरथ भान, माजी विजय मोरे, डॉ. शिवाजी दळणार, डॉ. बबनराव लोखंडे, डॉ. संदीप डोहणे, डॉ. मंगेश गुलवाडे, अनंत कुमार पाटील, विठ्ठल रबदाडे व प्रकाश निमजे यांच्यासह आदी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या परिषदेत प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या समाजापुढील समस्यांकडे लक्ष वेधून, त्यांचा आजपर्यंत केवळ राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आल्याचा संताप व्यक्त केला. दरम्यान परिषदेच्या शेवटी तीन ठराव पारित करण्यात आले. या ठरावात अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागावर ३३ अन्यायग्रस्त आदिवासी समाजातील लोकांनाच उमेदवारी देण्यात यावी, निवडून येणाऱ्या आमदारांनी आरक्षणाचा प्रश्न उचलून धरावा व कृती समितीची कोर कमिटी तयार करून, महायुतीने उमेद्वारीही द्यावी, अशा प्रमुख मुद्यांचा समावेश करण्यात आला. (प्रतिनिधी)