लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात आपत्तीचा निटारा करण्यासाठी, पूर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १०० प्रशिक्षित अग्निशमन विमोचक यांची भरती ७ दिवसांत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील फाइल १५ दिवसांपासून रखडली होती. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तत्काळ फाइल बोलावून मंजुरी दिली व ७ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सामान्य प्रशासन विभागाला भरतीचे अधिकार दिले आहे. त्यामुळे विभाग किती लवकर ही प्रक्रिया पूर्ण करते हे बघावे लागेल.
महापालिकेत १२ केंद्रांसाठी ८०७ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत १२६ कर्मचारी व अधिकारीच कार्यरत आहे. मदतीसाठी ५५ कंत्राटी कर्मचारी व कळमना प्रशिक्षण केंद्रावर ४५ प्रशिक्षणार्थीच्या भरोशावर आपत्ती व्यवस्थापन विभाग काम करीत आहे. ७ पटीने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर अग्निशमन विभाग काम करीत आहे. त्याच कारणाने पावसाळ्याच्या तोंडावर ४ महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी अग्निशामक विमोचकांची भरतीचा निर्णय सरकारच्या नियमानुसार घेण्यात आला होता.
तर गरज पडली नसती प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची३५० पर्दाच्या भरतीची फाइल महिला उमेदवारांची उंची व वजनाच्या कारणाने नगरविकास विभागाकडे गेल्या ९ महिन्यांपासून पडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शहर असतानाही नगरविकास विभागाच्या दुर्लक्षामुळे ही पदभरती रखडलेली आहे. या पदांची जर वेळेत भरती झाली असती, तर प्रशिक्षणार्थीची भरती करणाची गरज पडली नसती. महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या कमकुवतपणासाठी राजकीय किंवा प्रशासकीय पोहोच कमी पडत आहे. पावसाळ्यात जर कुठलीही आपत्ती शहरावर आल्यास लोकं अडचणीत अडकल्यास येणाऱ्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल.