अजनी होणार सॅटेलाईट टर्मिनल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 02:33 IST2016-09-06T02:33:02+5:302016-09-06T02:33:02+5:30
प्रवाशांची रेलचेल असल्यामुळे नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दी आढळते. त्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री

अजनी होणार सॅटेलाईट टर्मिनल
दयानंद पाईकराव/आनंद शर्मा ल्ल नागपूर
प्रवाशांची रेलचेल असल्यामुळे नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दी आढळते. त्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बंसल यांनी अजनी रेल्वेस्थानकास टर्मिनलचा दर्जा दिला. त्यानंतर एक पाऊल पुढे टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अजनीला सॅटेलाईट टर्मिनलच्या रूपाने विकसित करण्याची घोषणा केली. परंतु आजमितीस येथे फक्त सहा रेल्वेगाड्या थांबतात. नव्यानेच रुजू झालेले ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी अजनीला अधिकाधिक रेल्वेगाड्या थांबविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविल्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढून अजनी खऱ्या अर्थाने सॅटेलाईट टर्मिनल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर ११० ते १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. यामुळे ५० ते ६० हजार प्रवाशांची गर्दी होते. येथे नेहमीच पार्किंग आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी अजनी रेल्वेस्थानकाला आधुनिक स्वरूप प्राप्त करून तेथे सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अजनीला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा दिल्यानंतरही अजनीला फक्त सहा रेल्वेगाड्या थांबत आहेत. त्यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण कमी करण्यासाठी ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.
पश्चिम आणि दक्षिण नागपुरातील बहुतांश प्रवासी ज्या गाड्यातून उतरतात, त्या गाड्या हेरून त्यांनी या गाड्यांचा थांबा अजनीला देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे रवाना केला आहे. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळताच अजनी स्थानकाचा सॅटेलाईट टर्मिनल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अजनी स्थानकावर रेल्वेगाड्या थांबल्यास प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. सध्या दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील प्रवाशांना मुख्य रेल्वेस्थानकावर जाऊन १०० ते १५० रुपये आॅटोसाठी खर्च करून आपल्या घरी जावे लागते. परंतु आता अजनीला गाड्या थांबल्यास त्यांच्या खर्चाची आणि वेळेची बचत होणार आहे. यामुळे भविष्यात अजनी स्थानकावर दररोज १० ते १५ हजार प्रवाशांची वर्दळ होऊन रेल्वे प्रशासन आणि प्रवाशी दोघांचाही फायदा होणार आहे.
हे होतील फायदे
४दक्षिण, पश्चिम नागपुरातील प्रवाशांचा फायदा
४प्रवाशांच्या वेळेची आणि पैशाची बचत
४मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण होणार कमी
४दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा
४मुख्य स्थानकावर आऊटरवर गाड्या थांबणार नाहीत
४मुख्य रेल्वेस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर होईल.
अजनीला गाड्या थांबविण्याचा
प्रस्ताव रवाना
‘अजनी रेल्वेस्थानकावर अधिक रेल्वेगाड्या थांबल्यास मुख्य रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पार्किंगचा महत्त्वाचा मुद्दा मार्गी लागणार आहे. त्यासाठी अजनीला अधिक गाड्या थांबविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.’
- बृजेश कुमार गुप्ता,
‘डीआरएम’ मध्य रेल्वे नागपूर विभाग