गीत रचनेसाठीही आता हवा ‘सेन्सॉर बोर्ड’
By Admin | Updated: January 26, 2015 01:02 IST2015-01-26T01:02:09+5:302015-01-26T01:02:09+5:30
चित्रपट संगीताच्या नैतिक मूल्यांच्या पडझडीवर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यानंतर प्रख्यात गायक सुखविंदर सिंह यांनीदेखील टीका केली आहे. गेल्या काही काळापासून गाण्यांमध्ये अश्लील

गीत रचनेसाठीही आता हवा ‘सेन्सॉर बोर्ड’
नागपूर : चित्रपट संगीताच्या नैतिक मूल्यांच्या पडझडीवर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यानंतर प्रख्यात गायक सुखविंदर सिंह यांनीदेखील टीका केली आहे. गेल्या काही काळापासून गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा उपयोग वाढीस लागला आहे. समाजातील घटकांवर याचा वाईट परिणाम होत असून गाण्यांसाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ असावे अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित नागपूर महोत्सवासाठी उपराजधानीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
चित्रपट संगीतक्षेत्रात गुलजार, जावेद अख्तर, विशाल भारद्वाज, ए.आर.रहमान यांच्यासारख्या व्यक्तींमुळे ‘क्लास’ टिकून आहे. परंतु झटपट प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही जणांकडून अश्लीलतेचा आधार घेतला जातो ही दुर्दैवी बाब आहे. मुळात स्वत:च्या कर्तृत्वातील त्रुटी लपविण्यासाठी असे प्रकार केले जातात, अशी टीका त्यांनी केली. या गाण्यांमुळे समाजावर व विशेषत: युवावर्गावर वाईट परिणाम होतो. शिवाय गाण्यांचा दर्जादेखील खालवतो. गाण्यांसाठी ‘सेन्सॉर बोर्ड’संदर्भात केंद्र शासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. जुन्या गाण्यांचे ‘रिमेक’ किंवा ‘फ्युजन’देखील करण्यात येत आहे. यातून संबंधित व्यक्तींकडे नाविन्यपूर्ण गाणी सादर करण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट होते असा टोलादेखील त्यांनी मारला. मराठी चित्रपटात गायन करायला आवडते व मराठी मला माझ्या मातृभाषेसारखीच आहे असेदेखील ते म्हणाले.
‘अवॉर्ड’पेक्षा जनतेचा ‘रिवॉर्ड’ महत्त्वाचा
निरनिराळ्या चित्रपट अवॉर्डबद्दलदेखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. चार लोक मिळून ‘अवॉर्ड’ कोणाला जाईल ते ठरवितात. त्यामुळे मला अशा ‘अवॉर्ड’पेक्षा जनतेकडून मिळणारा प्रशंसेचा ‘रिवॉर्ड’ जास्त आवडतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘रिअॅलिटी शो’मधून संगीतक्षेत्राला चांगले कलाकार मिळू शकतात. केवळ त्यांना ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे असेदेखील ते म्हणाले.(प्रतिनिधी)