दुपारनंतर रस्ते सामसूम , सायंकाळी गर्दी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:25+5:302021-03-08T04:08:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवारी बंदचे आवाहन केले आहे. काल शनिवारप्रमाणेच ...

दुपारनंतर रस्ते सामसूम , सायंकाळी गर्दी ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवारी बंदचे आवाहन केले आहे. काल शनिवारप्रमाणेच रविवारीसुद्धा नागपुरात बंदचा चांगला परिणाम दिसून आला. सार्वजनिक सुटीचा दिवस असल्याने शासकीय व खासगी कार्यालयांसह प्रमुख बाजारही बंद राहिले. दुपारनंतर रस्ते सामसूम झाले. परंतु सायंकाळ होताच नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. दुसऱ्या आठवड्यात काही नागरिक या बंदला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. परंतु एकूण बंदला सलग दुसऱ्या आठवड्यातही नागरिकांची साथ मिळाली. पुढच्या आठवड्यातही याच प्रकारे बंद राहील.
काोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु याचे विशेष परिणाम दिसून आले नाहीत. नागपुरात गेल्या पाच दिवसात सरासरी ११०० पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. तरीही संसर्गाची ही साखळी निश्चित तुटेल आणि कोरोनावर मात केली जाईल, असा प्रशासनाला विश्वास आहे. नागपूरकरही प्रशासनाच्या अपेक्षेवर खरे उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारी बंदचा दिवसभर चांगला परिणाम दिसून आला. परंतु सायंकाळ होाच रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली. मॉल, बाजार, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद असल्याने या परिसरात तशी गर्दी झाली नाही. सीताबर्डी येथील मुख्य बाजारात रविवारी पाय ठेवायलाही जागा राहत नाही. परंतु बंदमुळे हा परिसर सामसूम होता. त्याचप्रकारे महाल,मस्कासाथ, इतवारी, गांधीबाग, गोकुलपेठ, धरमपेठ, खामला, जरीपटका, कमाल चौक हे शहरातील मुख्य मार्केटही रविवारी सामसूम होते.
शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. वाहनांची तपासणी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईसुद्धा करण्यात आली. मनपाच्या एलडीएस पथकाने रविवारी ९२ प्रतिष्ठानांची तपासणी केली. यात कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या १२ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली.
बॉक्स
मत्स्य बाजार बंद केल्याने नाराजी
मनपा प्रशासनाने मांस, चिकन, अंडे व मत्स्य बाजार उघडण्यास परवानगी दिली आहे. यानंतरही पोलिसांनी आज सकाळी ९ वाजता मत्स्य बाजार बंद करण्याची कारवाई केली. त्यामुळे दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. हे मार्केट महापाैरांच्या प्रभागात येत असल्याने नागरिकांनी त्यांना माहिती दिली. महापौरांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नंतर बाजार सुरू करण्यात आले.