रस्त्यांचे डांबरीकरण दसऱ्यानंतर
By Admin | Updated: September 19, 2015 04:00 IST2015-09-19T04:00:06+5:302015-09-19T04:00:06+5:30
उपराजधानीत बहुतांश रस्त्यांची स्थिती वाईट आहे. खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती पाहता डांबरीकरणाचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.

रस्त्यांचे डांबरीकरण दसऱ्यानंतर
स्थायी समितीची मंजुरी : ३.६६ कोटींचे प्रस्ताव
नागपूर : उपराजधानीत बहुतांश रस्त्यांची स्थिती वाईट आहे. खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती पाहता डांबरीकरणाचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. मात्र, सध्याच डांबरीकरण होण्याची चिन्हे नाहीत. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३ कोटी ६६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, दसऱ्यानंतरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रस्त्यांच्या कामासाठी काही प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली तर काहींच्या निविदा काढल्या जातील. त्यामुळे काम सुरू होण्यास थोडा विलंब होईल. तसेही मान्सूनच्या काळात डांबरीकरण केले जात नाही. सामान्यत: दसऱ्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू होईल. रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी हॉटमिक्स विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. गणेश विसर्जन लक्षात घेता विसर्जन मार्गावरील खड्डे भरले जात आहेत. कंत्राटदारांनी जास्त दराने निविदा भरल्याबाबत सिंगारे म्हणाले,
डीआरएवर पुन्हा कृपा
हुडकेश्वर-नरसाळा येथे पाणीपुरवठा योजनेसाठी ६३.०५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचा डीपीआर व निविदेचा आराखडा तयार करण्याचे काम मे. डीआरए कन्सलटंट प्रा. लिमिटेड यांना देण्यात आले आहे. संबंधित कंपनीला प्रकल्पाच्या दोन टक्के रक्कम दिली जाईल. यावर सिंगारे म्हणाले, २००९ मध्ये तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी धोरण निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेच्या अधिकृत कन्सलटंटच्या पॅनलकडूनच डीपीआर तयार करावा लागतो.
एलबीटी अनुदानाची प्रतीक्षा
एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून महापालिकेला दरमहा एक निश्चित अनुदान मिळणार आहे. सिंगारे यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या खात्यात ३३.९८ कोटी रुपये जमा होतील. या संबंधीचा शासकीय आदेश जारी झाला आहे. तीन- चार दिवसात रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होईल. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू झाला असला तरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. १५ सप्टेंबरपर्यंत महापालिकेच्या खात्यात फक्त ८ कोटी रुपये शिल्लक होते, अशी माहिती आहे.