स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी गांधींना चौकटीबाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:32 IST2017-10-08T01:32:24+5:302017-10-08T01:32:36+5:30

कॉंग्रेस पक्षाने भारताला स्वातंत्र्य नाही तर फाळणीच्या जखमा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनादेखील फाळणी अमान्य होती.

After independence, Congress leaders took Gandhi out of the box | स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी गांधींना चौकटीबाहेर काढले

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी गांधींना चौकटीबाहेर काढले

ठळक मुद्देइंद्रेश कुमार यांचा आरोप : अरविंद आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेस पक्षाने भारताला स्वातंत्र्य नाही तर फाळणीच्या जखमा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनादेखील फाळणी अमान्य होती. त्यामुळेच त्यांनी कुठलाही आनंदोत्सव साजरा केला नव्हता किंवा तशी प्रतिक्रियादेखील दिली नव्हती. मात्र तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांना मुख्य प्रवाहातून बाहेर करत चौकटीबाहेर काढले, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी केला. प.पू.कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ, खामगाव व कृष्णदास सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अरविंद आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.
राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजित या व्याख्यानमालेला डॉ. प्रकाश मालगावे यांचीदेखील उपस्थिती होती. ‘भारताच्या उत्थानात संतांचे कार्य’ या विषयावर इंद्रेश कुमार यांनी व्याख्यान दिले. भारताच्या इतिहासात मुगलांचे व ब्रिटिशांचे आक्रमण शिकविण्यात येते. मात्र त्यात गौरवशाली काहीच नाही. त्यामुळे असा इतिहास शिकविण्यात अर्थच नाही. अकबराला महान बादशहा म्हणण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्याला तसे म्हणणे म्हणजेच मोठे ढोंग आहे, असे प्रतिपादन इंद्रेश कुमार यांनी केले.
आपल्या देशात विद्वान आणि उपदेशक यांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे संतांचे प्रमाण घटते आहे. यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. विद्वान उपदेश देतात आणि त्यांच्यामुळे विवाद निर्माण होतात तर संत आचरणातून समजवतात व ते समस्यांवर समाधान सांगतात. देशाला विद्वान व संत दोघांचीही आवश्यकता आहे. मात्र विद्वानांनी संत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे इंद्रेश कुमार म्हणाले. आपल्या देशाला संतांची परंपरा लाभली आहे. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी संतांनी ‘दुसºयांचे धन म्हणजे माती’ या ओळींत उपाय सांगितला आहे. समस्या व आव्हाने सर्वांसमोरच येतात. मात्र संतांच्या विचारांतूनच अडचणीच्या काळातदेखील आनंदाने जगण्याचे बळ मिळते, असे सांगताना इंद्रेश कुमार यांनी भगवा दहशतवादाच्या नावाखाली त्यांना फसविण्याचे कसे प्रयत्न झाले याचे उदाहरण दिले.

अस्पृश्यता हे पापच
आपल्या देशातील संतांनी समाजाला भक्तीमार्गासोबतच देशभक्तीचेदेखील संस्कार दिले. अहिंसा व बलिदानाची शक्ती समजावली. लोकवाणी व जनवाणीत संत बोलायचे. अस्पृश्यतेवरदेखील त्यांनी मौलिक भाष्य केले आहे. आजच्या तारखेत सामाजिक समरसतेची आवश्यकता असून अस्पृश्यता व भेदाभेद मानणे हे पापच असल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले.
तर पाकिस्तान जगात नसेल
१४ आॅगस्ट १९४७ पूर्वी जगाच्या नकाशात पाकिस्तानचा नामोल्लेखदेखील नव्हता. मात्र पाकिस्तानच्या हरकती अशाच सुरू राहिल्या, तर भविष्यात पाकिस्तान नकाशावरुन पुसल्या जाईल. चीनदेखील भारतावर वर्चस्व गाजवू पाहत आहे. मात्र चीन व पाकिस्तान यांचे जगात कुणीच मित्र नाहीत व भारताचे सर्वाधिक देश मित्र आहेत. चीनच्या आर्थिक आक्रमणाला स्वदेशीनेच प्रत्युत्तर देता येईल, असे इंद्रेश कुमार म्हणाले.

Web Title: After independence, Congress leaders took Gandhi out of the box