आरोपीची सात वर्षे बेकायदा कोठडी
By Admin | Updated: June 3, 2017 02:04 IST2017-06-03T02:04:37+5:302017-06-03T02:04:37+5:30
महाल भागातील दोन पाईप बॉम्ब प्रकरणातून २०१० मध्ये निर्दोष सुटका झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या लखनौ कारागृहात बंदिस्त आरोपीला

आरोपीची सात वर्षे बेकायदा कोठडी
महाल पाईप बॉम्ब प्रकरण : आरोपी लखनौच्या कारागृहात बंदिस्त, १३ वर्षानंतर नागपुरात आणले
राहुल अवसरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाल भागातील दोन पाईप बॉम्ब प्रकरणातून २०१० मध्ये निर्दोष सुटका झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या लखनौ कारागृहात बंदिस्त आरोपीला २०१७ मध्ये समजली. कारागृह प्रशासनाच्या केवळ हिटलरी कारभारामुळे या आरोपीला तब्बल सात वर्षे बेकायदा कोठडी भोगावी लागल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी १३ वर्षानंतर नागपुरात आणले.
गुलजार ऊर्फ काश्मिरी ऊर्फ अशरफ ऊर्फ इर्शाद ऊर्फ अब्दुल हमिद ऊर्फ शाहीद गुलाम मोहम्मद वाणी (५५), असे आरोपीचे नाव असून तो जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टणठाणा तालुक्याच्या टप्परवारीपोर येथील रहिवासी आहे.
गुलजार हा सीमीचा कथित कार्यकर्ता आहे. काश्मीर खोऱ्यात केलेल्या कारवायात त्याचा सहभाग असल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. नागपूरच्या महाल भागात पेरलेल्या दोन पाईप बॉम्ब प्रकरणातही त्याला आरोपी करण्यात आले होते.
२१ मे २००१ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाल भागातील विश्वहिंदू परिषदेच्या कार्यालयात जिवंत पाईप बॉम्ब आढळून आला होता. त्यानंतर लागलीच २४ मे २००१ रोजी बडकस चौकात पंडित बच्छराज व्यास यांच्या पुतळ्याजवळ दुसरा पाईप बॉम्ब आढळून आला होता.
लागोपाठ पाईप बॉम्ब आढळून येताच त्यावेळी संपूर्ण उपराजधानी हादरली होती. हे दोन्ही बॉम्ब शक्तिशाली होते.
दोन्ही बॉम्बचा स्फोट घडवून संपूर्ण महाल भाग बेचिराख करण्याचा हा सीमीचा डाव होता. स्फोट होण्यापूर्वीच हे बॉम्ब गवसले होते. त्यापैकी एक बॉम्ब निकामी करताना तत्कालीन बॉम्ब शोधक-नाशक पथकाचे निरीक्षक भलावी हे जखमी झाले होते.
पुढे बॉम्बमधील रसायनाचा प्रादुर्भाव होऊन भलावी यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात जळगावच्या शेख रिझवान शेख रशीद याच्यासह १२ जणांना आरोपी करण्यात आले होते. आरोपींमध्ये गुलजारचाही समावेश होता. या प्रकरणातील एक आरोपी तर चक्क पोलिसांच्या हातकडीतून पळून गेला होता.
आधी निर्दोष आता डिस्चार्ज
पुढे या पाईप बॉम्ब प्रकरणाचा खटला चालून सत्र न्यायालयाने जुलै २०१० रोजी सर्वच आरोपींची सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली होती.
गुलजार हा लखनौच्या कारागृहात असताना २००४ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे यांच्या न्यायालयाने त्याचा प्रॉडक्शन वॉरंट जारी केला होता. या वॉरंटवर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला त्याच वेळी न्यायालयात हजर केले होते. पुढे गुलजार हा पाईप बॉम्ब प्रकरणात निर्दोष ठरला. काश्मिरातील सर्वच प्रकरणात तो यापूर्वीच निर्दोष ठरला होता.
नागपुरात गुलजारविरुद्ध पाईप बॉम्बचे प्रकरण असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांना समजताच ते २९ मे २०१७ रोजी त्याला घेऊन न्यायालयात आले. त्याला त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयात हजर केले. गुलजार हा २०१० मध्ये निर्दोष झालेला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने त्याला तत्काळ दोषमुक्त (डिस्चार्ज) केले. उत्तर प्रदेश पोलीस त्याला परत घेऊन गेले. आता तो कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही. गुलजारचे अतिरेकी म्हणून उभे आयुष्य कारागृहात गेले आता तो कारागृहाबाहेरचा मोकळ श्वास घेणार आहे. मात्र लखनौच्या कारागृहातील तब्बल सात वर्षांच्या त्याच्या बेकायदेशीर कोठडीचे काय, असा प्रश्न कायमच आहे.