उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रथमच मिळणार लेखाजोखा
By Admin | Updated: May 16, 2014 00:49 IST2014-05-16T00:49:13+5:302014-05-16T00:49:13+5:30
निवडणुकीच्या मतमोजणीत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी यंदा प्रथमच मतमोजणीस्थळी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींना मतमोजणीची प्रत्येक फेरीनिहाय माहिती दिली जाणार आहे.

उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रथमच मिळणार लेखाजोखा
नागपूर : निवडणुकीच्या मतमोजणीत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी यंदा प्रथमच मतमोजणीस्थळी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींना मतमोजणीची प्रत्येक फेरीनिहाय माहिती दिली जाणार आहे. एरवी मतमोजणीच्या वेळी प्रतिनिधींना त्यांच्या उमेदवारांना किती मते मिळाली याची आकडेवारी स्वत: नोंदवावी लागत होती. अनेक वेळा मतदान कर्मचार्यांनी जाहीर केलेली व प्रतिनिधींनी नोंदविलेली माहिती यात तफावत येत होती व त्यातून वाद निर्माण होत असत. यातून फेरमतदानाचे प्रसंगही यापूर्वी अनेकदा उद्भवले आहे. यात वेळेचा अपव्यय होतो व इतरही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने निकाल जाहीर होण्यासही विलंब होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी आता निवडणूक यंत्रणेकडूनच उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्येक उमेदवाराला फेरीनिहाय किती मते मिळाली याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आकडे नोंदवून घेताना होणार्या चुका टळतील. मतमोजणी प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी आयोगाने यावेळी प्रथमच हे पाऊल उचलले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३३ तर रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २0 टेबल लावण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहे. त्यामुळे टेबलची एकूण संख्या २४0 होते. उमेदवारांनी त्यांचे प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर नियुक्त केले तर प्रत्येकाला मतमोजणीचा लेखाजोखा प्रशासनाला पुरवावा लागणार आहे. यामुळे कर्मचार्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पण उमेदवारांच्या प्रतिनिधींना तयार आकडेवारी उपलब्ध होणार आहे. काही अपक्ष उमेदवारांच्या नावाने काही राष्ट्रीय पक्षांनी त्यांचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. हे येथे उल्लेखनीय. टपाल मतांच्याबाबतीतही यंदा आयोग अधिक दक्ष आहे. या मतांची इत्थंभूत माहिती विशिष्ट प्रपत्रात आयोगाला पाठवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)