नक्षलींना हरविण्यासाठी विकासाचा मार्ग स्वीकारा

By Admin | Updated: September 5, 2016 02:34 IST2016-09-05T02:34:59+5:302016-09-05T02:34:59+5:30

नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका.

Accept the path of development to defeat the Naxalites | नक्षलींना हरविण्यासाठी विकासाचा मार्ग स्वीकारा

नक्षलींना हरविण्यासाठी विकासाचा मार्ग स्वीकारा

शिवाजीराव बोडखे यांचे आवाहन : सहलीवरून परतलेल्या आदिवासी मुलामुलींचा सत्कार
नागपूर : नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका. आदिवासी नागरिकांनी नक्षलींविरुद्ध शस्त्र घेऊन लढावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. त्यांनी केवळ विकासाचा मार्ग स्वीकारला तरी, नक्षली पराभूत होतील असे मत नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी व्यक्त केले.
गडचिरोली पोलीस व गडचिरोली जिल्हा आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुलामुलींसाठी आपला महाराष्ट्र सहल आयोजित करण्यात आली होती. या मुलामुलींचा व ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा रविवारी बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे मैत्री परिवार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, डॉ. नरेंद्र भुसारी व संजय नखाते व्यासपीठावर उपस्थित होते. सहलीमध्ये ४३ मुले व ३८ मुली सहभागी झाल्या होत्या. मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर हे मुलेमुली रविवारी नागपुरात आले होते.
देश झपाट्याने बदलत असताना आदिवासी समाज मात्र आजही विकासापासून दूर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकार सांगून व जीवनभर जंगलात राहून काहीच साध्य होणार नाही. या विचारामुळे पुढील अनेक पिढ्या मागासलेल्याच राहतील. यामुळे जंगलातून बाहेर पडा. महाराष्ट्र सहल हा उपक्रम आदिवासी मुलामुलींना विकासाचे दर्शन घडविण्यासाठी आहे. हा धागा पकडून पुढे जा. स्वत:सह इतरांनाही जागृत करा. सर्वांना उच्च पदाची नोकरी मिळविता येणार नाही, पण चांगला नागरिक निश्चितच होता येईल असेही बोडखे यांनी सांगितले. आदिवासी मुलामुलींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सहलीच्या निमित्ताने चांगली परंपरा सुरू झाली आहे.
सतत नवीन शिकण्याची जिद्द ठेवणारी व्यक्तीच पुढे जाते. स्वत:ला पूर्ण समजणाऱ्याचा विकास थांबतो. जगात साध्या लोकांनीच क्रांती केली आहे असे मत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केले.भुसारी यांनी करिअरवर मार्गदर्शन केले. शिल्पा बेलादे व रोहित कोळसा यांनी सहलीचे अनुभव सांगितले. सुरुवातीला सुरसंगमच्या कलावंतांनी देशभक्तिपर व प्रेरणादायी गीते सादर केलीत. नखाते यांनी प्रास्ताविक तर, भुवनेश्वरी परशुरामकर यांनी संचालन केले. मनोज बंड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Accept the path of development to defeat the Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.