उमरेडमध्ये ‘मिशन ॲडमिशन’ला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:30+5:302021-09-03T04:08:30+5:30
उमरेड : कोरोनाच्या लाटेतच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता हेच विद्यार्थी शिक्षणाच्या पुढील प्रवासासाठी धावपळ करीत आहेत. तालुक्यातील विविध ...

उमरेडमध्ये ‘मिशन ॲडमिशन’ला वेग
उमरेड : कोरोनाच्या लाटेतच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता हेच विद्यार्थी शिक्षणाच्या पुढील प्रवासासाठी धावपळ करीत आहेत. तालुक्यातील विविध महाविद्यालयात ‘मिशन ॲडमिशन’साठी रांग लागत असून, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनपसंत शाखेत प्रवेश मिळत आहे. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांचा हिरमोड होत असून, टक्केवारी कमी पडल्याने पर्यायाची निवड करावी लागत आहे. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची पहिली यादी झळकली असून, अन्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.
उमरेड तालुक्यात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २,०४२ आहे. तालुक्यात कनिष्ठ विद्यालय तथा महाविद्यालयांची संख्या दहा आहे. शिवाय पॉलटेक्निक कॉलेज, आयटीआय येथेही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. उमरेड शहरासह तालुक्यातील सिर्सी, ब्राह्मणी, बेला, चांपा येथेसुद्धा प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे. प्रवेश प्रक्रिया वेगाने होत असली तरी शाळा-महाविद्यालये सुरू होणार कधी, असा सवाल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा आहे.
-
जादा प्रवेश नको
निर्धारित प्रवेश क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवेश देऊ नका, असा आदेश नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी दिले आहेत. जादाचे प्रवेश दिल्याने त्याचा विपरीत परिणाम अन्य महाविद्यालयांच्या प्रवेशावर होतो. तुकडी कमी होणे, शिक्षक अतिरिक्त होणे, असाही परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद आहे.
-
शाळा सुरू करा
ग्रामीण भागातील वर्ग आठवी ते बारावीच्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शहरातील शाळांना अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही. ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी विचलित झाले आहेत. दुसरीकडे पालकसुद्धा शाळांच्या फी वसुली धोरणामुळे कमालीचे वैतागले आहेत. एकीकडे विविध कार्यक्रम, उपक्रम नियमावलींना केराची टोपली दाखवीत राजरोसपणे सुरू आहे. दुसरीकडे शाळांवरच गंडांतर आणल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेकडोंच्या उपस्थितीत राजकीय कार्यक्रम थाटात साजरे केले जात असताना, दुसरीकडे शाळांच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय होत नसल्याने आश्चर्य आणि संतापसुद्धा व्यक्त होत आहे. शाळा सुरू करा, अशी पालकांची मागणी आहे.