अजनी आरक्षण कार्यालयात आरपीएफची अनुपस्थिती
By Admin | Updated: May 15, 2014 02:39 IST2014-05-15T02:39:55+5:302014-05-15T02:39:55+5:30
उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यांमधील गर्दी वाढली आहे. सर्व प्रवाशांना वेटींगचे तिकीट हातात मिळत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दलालांकडे धाव घेत आहेत.

अजनी आरक्षण कार्यालयात आरपीएफची अनुपस्थिती
नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यांमधील गर्दी वाढली आहे. सर्व प्रवाशांना वेटींगचे तिकीट हातात मिळत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दलालांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलालही सक्रिय झाले असताना अजनी रेल्वे आरक्षण कार्यालयात मात्र दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीच सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसत आहे.
उन्हाळ्यात नागपुरातून चारही दिशांना जाणार्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. ऐनवेळी प्रवासाचा बेत आखणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना तिकीट खरेदीसाठी गेल्यानंतर हाती वेटींग असलेले तिकीट पडत आहे. यामुळे कुटुंबासह कसा प्रवास करावा, असा प्रश्न त्यांना पडत आहे. यामुळे अनेक प्रवासी दलालांकडे जाऊन कन्फर्म तिकीट मिळते काय याची चाचपणी करीत आहेत. रेल्वे अँक्ट १४३ नुसार रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणे गुन्हा आहे. अशा व्यक्तीला दंड आणि तुरुंगवासाची तरतूद या कायद्यात आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल कार्यरत आहे. परंतु अजनीच्या आरक्षण कार्यालयात फेरफटका मारला असता तेथे कुठल्याच आरपीएफ जवानाची ड्युटी नसल्याचे अनेकदा आढळले. यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या दलालांचे चांगलेच फावत आहे.
आरक्षण कार्यालयात त्यांना अटकाव करण्यासाठी कुणीच उपस्थित राहत नसल्यामुळे अजनीच्या आरक्षण कार्यालयात दलालांच्या कारवाया वाढीस लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजनी आरक्षण कार्यालयात दलालांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आरपीएफ जवानांची नेमणूक करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)