८६ कोटींचा घोटाळा, पिता-पुत्रासह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:24+5:302020-12-26T04:08:24+5:30
- जय श्रीराम को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : एफआयआरच्या दीड वर्षांनंतर कारवाई जगदीश जोशी लोकमत इम्पॅक्ट नागपूर : ८६ कोटींच्या ...

८६ कोटींचा घोटाळा, पिता-पुत्रासह
- जय श्रीराम को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : एफआयआरच्या दीड वर्षांनंतर कारवाई
जगदीश जोशी
लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : ८६ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे आणि त्यांचा मुलगा अभिषेकसह सहा आरोपींना अटक केली आहे. लोकमतने एका महिन्यापूर्वी प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. आरोपींमध्ये खेमचंद मेहरकुरे, त्यांचा मुलगा अभिषेक मेहरकुरे, योगेश चरडे, कुश कावरे, अशोक दुरगुडे आणि अर्चना टेके यांचा समावेश आहे.
लोकमतने २३ नोव्हेंबरला या प्रकरणात पोलीस कुचराई करीत असून आरोपींना अटक करीत नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चौकशी केली. सोसायटीचे जगनाडे चौक, गणेशनगर येथे कार्यालय असून शिवनगर निवासी खेमचंद मेहरकुरे अध्यक्ष आहेत. घोटाळा २०१८ मध्ये उजेडात आला होता. सोसायटी डेली कलेक्शन, एफडी, आरडी आदींच्या माध्यमातून गुंतवणूक स्वीकारत होती. याकरिता एजंट नियुक्त केले होते. दोन वर्षांपूर्वी सोसायटी अचानक गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागली. गुंतवणूकदारांनी याची तक्रार कोतवाली ठाण्यात केली होती. पण पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर गुंतवणूकदारांनी ठाण्यासमोर निदर्शने केली होते. एप्रिल २०१९ मध्ये मेहरकुरेने पोलिसांसमोर पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही पैसे परत केले नाही. याची तक्रार पीडितांनी न्यायालयात केली. न्यायालयाच्या आदेशानंतर १३ जुलै २०१९ ला ४ कोटीचा आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक पीडित तक्रार करण्यासाठी पुढे आले. त्यानंतर हे प्रकरण १ सप्टेंबर २०१९ ला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी चौकशी करून ६.५० कोटींचा घोटाळा उजेडात आणला. सोसायटीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ७९.५४ कोटींचा घोटाळा झाल्याची बाब पुढे आली. पोलिसांचा तपास आणि ऑडिट रिपोर्टमध्ये आरोपींनी ८६ कोटींचा घोटाळा केल्याचे उजेडात आले. मीना जगताप यांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणाशी नेते आणि अनेक प्रभावशाली लोक जुळले आहेत. आरोपींनी घोटाळ्याची रक्कम सुरक्षित लोकांच्या हातात सोपविल्याचा गुंतवणूकदारांना संशय आहे. गुंतवणूकदारांनी आरोपींशी जुळलेल्या लोकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘आयाराम-गयाराम’ झाली आर्थिक शाखा
आर्थिक घोटाळ्यामुळे अनेक निवृत्त कर्मचारी कंगाल झाले आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीची रक्कम सोसायटीत जमा केली होती. यातून त्यांनी मुलामुलींचे लग्न, शिक्षक आणि घराचे स्वप्न पाहिले होते. गेल्या एक वर्षात आर्थिक शाखेच्या पाच अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. पण ही शाखा आयाराम-गयाराम ठरली. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकऱ्यांना फटकारले. त्यानंतर डीसीपी विवेक मसाळ यांच्या नेतृत्त्वात निरीक्षक मीना जगताप यांच्याकडे चौकशी सोपविली. काही अधिकऱ्यांमुळे गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हे शाखा पांढरा हत्ती ठरली आहे.