५०० कोटी बदलले, व्यवहारात मात्र १०० कोटीच

By Admin | Updated: November 19, 2016 02:30 IST2016-11-19T02:30:03+5:302016-11-19T02:30:03+5:30

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या.

500 crores changed, in practice only 100 crores | ५०० कोटी बदलले, व्यवहारात मात्र १०० कोटीच

५०० कोटी बदलले, व्यवहारात मात्र १०० कोटीच

बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट : खर्चाला बसला चाप
मोरेश्वर मानापुरे  नागपूर
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या. पण त्या नोटा खर्च करण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यांच्यामध्ये निर्माण झाली भीती आणि काटकसरीमुळे बाजाराची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत.

व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरण
केंद्र सरकारचा काळ्या पैशाच्या विरोधातील सर्जिकल स्ट्राईकनंतर गेल्या आठ दिवसात लोकांनी राष्ट्रीयीकृत, खासगी आणि नागरी अर्बन बँकांच्या नागपुरातील ५५० पेक्षा जास्त शाखांमधून जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या नोटा बदलवून घेतल्या आणि त्या घरीच ठेवल्या. त्यातील १०० कोटीसुद्धा व्यवहारात नाहीत. त्यामुळे बाजाराची आर्थिक उलाढाल ठप्प पडली आहे. सर्वच बाजारपेठांमधील व्यवहारात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. दुकानदार चिल्लर नोट देण्यास तयार नाहीत. कापड आणि सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. थोडी फार खरेदी धान्य आणि खाद्यतेल बाजारात सुरू आहे. ग्राहक किरकोळ दुकानातून केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत.

१०० व २००० च्या नोटांमध्ये मोठी तफावत
अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, २००० ची नवीन नोट आणि चलनातील १०० ची नोट यात मोठी तफावत आहे. शिवाय नवीन ५०० रुपयांची नोट चलनात अजूनही न आल्यामुळे लोक १०० रुपयाची नोट खर्च करण्यास तयार नाहीत. शिवाय दुकानदार २००० हजार रुपयाच्या नोटेची चिल्लर देत नाही. दुसरी बाजू पाहिल्यास कॅशलेस व्यवस्थेत नागपुरातील ९५ टक्के दुकानदारांकडे डेबिट कार्डने पैसे स्वीकारण्यासाठी ‘टेलर मशीन’ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक उलाढालीत मोठी घसरण झाली आहे. ५०० रुपयांची नवीन नोट जेव्हा नागरिक आणि दुकानदारांच्या हातात येईल, तेव्हाच लोक खरेदीसाठी घराबाहेर पडणार आहेत. त्यावेळी दुकानदारांनाही खरेदीनंतर लोकांना चिल्लर नोट देणे शक्य होईल. तेव्हाच बाजारात उत्साह संचारेल. पण अशी सकारात्मक स्थिती निर्माण होण्यासाठी निश्चितच महिन्याचा कालावधी लागणार आहे.

दोन दिवसातच ५०० ची नवीन नोट
बॅँक आॅफ महाराष्ट्रचे नागपूर विभागीय उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले की, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा लोकांनी घरीच ठेवल्या आहे. ते आवश्यक तेवढीच खरेदी करीत आहेत. ५०० रुपयाची नवीन नोट चलनात आल्यानंतर १०० आणि २००० रुपये यातील गॅप भरून निघेल आणि लोक मोठ्या प्रमाणात १०० रुपयांचे चलन बाजारात आणतील. दोन दिवसातच ५०० रुपयाची नोट चलनात येणार आहे. कांबळे म्हणाले, २००० हजाराची नोट आकारात छोटी आहे. शिवाय ५०० च्या नवीन नोटेचा आकारही पूर्वीच्या नोटेपेक्षा लहान आहे. लोकांना एटीएममधून सर्वच नोटा मिळाव्यात म्हणून बँकांच्या एटीएम मशीनमधील ट्रेमध्ये वास्तविक बदल करण्यात येत आहेत. आता १०० आणि २००० रुपयाची नोट एटीएममधून मिळत आहे. पुढे लोकांना १००, ५०० आणि २००० रुपयाची नोट सहजपणे मिळेल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लोकांच्या खिशात पैसा खेळता राहील आणि बाजारपेठांमध्ये उत्साह येईल. पण यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: 500 crores changed, in practice only 100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.