दोन वर्षांंचा निकष : तीन वर्ष होऊनही अनेक अधिकारी एकाच जागी यवतमाळ : एका ठिकाणी दोन वर्ष हा निकष लावून राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी या यादीतही बराच घोळ असल्याचे पुढे आले आहे. एकाच ठिकाणी तीन वर्ष झालेले अनेक अधिकारी राज्यात आजही कायम आहेत. त्यामुळे बदल्यांच्या या यादीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री ४९२ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. परंतु या यादीतील अनेक नावे डोळे विस्फारणारी आहेत. एकीकडे दोन वर्ष झाले म्हणून पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी केली गेली. तर दुसरीकडे तीन वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही काही पोलीस निरीक्षकांना आहे त्याच ठिकाणी ठेवले गेले आहे. गृहजिल्ह्यात नियुक्ती देऊ नये असे आदेश असताना औरंगाबाद शहरात एका पोलीस निरीक्षकाला नियुक्ती दिली गेली आहे. अनेक अधिकार्यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बदल्या झाल्या असताना त्यांना पुन्हा बदलविण्यात आले आहे. हा घोळ पाहता महासंचालक कार्यालयाने दोन वर्षांच्या निकषातून मर्जीतील अधिकार्यांना वगळले तर नाही ना अशी शंका पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काही विशिष्ट अधिकार्यांना हेतुपुरस्सर की-पोस्टवर ठेवले जात आहे. विदर्भातही अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येकच यादीत गोंधळ बढत्या असो वा बदल्या प्रत्येकच यादीत गोंधळ पहायला मिळत आहे. महासंचालकांनी काही डेस्क अधिकार्यांवर कारवाई करून काहींच्या बदल्या केल्यानंतरही घोळ कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तीन दिवसांपूर्वी ९५ पोलीस निरीक्षकांच्या बढतीची यादी जारी केली. मात्र प्रत्यक्षात त्यातून तीन नावेच गहाळ होती. ही चूक लक्षात आल्यानंतरही आस्थापना महानिरीक्षक कार्यालयातील संबंधित महिला अधिकार्याची मुजोरी मात्र कायम होती. (जिल्हा प्रतिनिधी)
४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांच्या यादीत घोळ
By admin | Updated: May 28, 2014 00:56 IST