लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मुखाचा कर्करोग हा सर्वसामान्य व मोठ्या प्रमाणावर आढळणारा कर्करोग आहे. डोके व मान भागातील (हेड अँड नेक) ९० टक्के कॅन्सर थेट तंबाखू सेवनाशी संबंधित आहेत. 'साऊथ एशियन जर्नल ऑफ कॅन्सर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, ग्रामीण भागातील ४४ टक्के प्रौढ कॅन्सरबाधित थेट तंबाखूचे सेवन करतात, जे कर्करोग वाढीमागे एक प्रमुख कारण आहे, अशी माहिती जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सागर भालेराव यांनी पत्रकारांना दिली.
डॉ. भालेराव म्हणाले. खैनी, गुटखा, पानमसाला आणि वाळवलेल्या तंबाखूच्या पानांचा वापर ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका खूप वाढला आहे.
यासोबतच दातांची व तोंडाची स्वच्छता नीट न राखल्याने, विशेषतः गरीब लोकांमध्ये, ही समस्या अधिक गंभीर होत आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ न भरणारे तोंडातले अल्सर, तोंडात पांढरे किंवा लाल पट्टे, तोंड किंवा मान भागात गाठ किंवा सूज येणे, बोलण्यात किंवा गिळण्यात त्रास होणे, ही लक्षणे कर्करोगाची सुरुवात दर्शवू शकतात. लवकर निदान केल्यास जीव वाचू शकतो.
तंबाखू विक्रीवर निर्बंध असावेडॉ. भालेराव यांनी देशपातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. त्यामध्ये जनजागृती मोहीम, तंबाखु उत्पादनांच्या विक्री व जाहिरातीवर कठोर निर्बंध आणि तंबाखू सोडण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.