आंभोरा लिफ्ट एरिगेशनवर २.३२ कोटींच्या पाणीपट्टीचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST2021-09-24T04:08:54+5:302021-09-24T04:08:54+5:30

नागपूर : गोसेखुर्द धरणाच्या चार मुख्य उपसा सिंचन योजनांपैकी आंभोरा उपसा सिंचन योजना २ कोटी ३२ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या ...

2.32 crore water load on Ambhora lift irrigation | आंभोरा लिफ्ट एरिगेशनवर २.३२ कोटींच्या पाणीपट्टीचा बोजा

आंभोरा लिफ्ट एरिगेशनवर २.३२ कोटींच्या पाणीपट्टीचा बोजा

नागपूर : गोसेखुर्द धरणाच्या चार मुख्य उपसा सिंचन योजनांपैकी आंभोरा उपसा सिंचन योजना २ कोटी ३२ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या बोजाखाली दडपली आहे. २०१४ पासून थकबाकी कायम असून, सतत वाढतच आहे. ती भरण्यासाठी प्रकल्पाकडे पैसा नाही. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल होत नाही. अशातच वीज वितरण कंपनीने कडक धोरण अवलंबल्याने ही उपसा सिंचन योजना केव्हाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

आंभोरा उपसा सिंचन योजना २०१४-१५ पासून कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीच्या काळात वितरिका पूर्ण न झाल्याने आणि पाणी वापर संस्था अस्तित्वात न आल्याने शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुलीवर भरच देण्यात आला नाही. परिणामत: २०१४ मध्ये असलेली १९ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी मार्च २०२१ अखेरपर्यंत २ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

जलसंधारण विभागाने आंभोरा पाटबंधारे विभागाला दिलेले पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्टही पूर्ण करता न आल्याने वसुली कमी आणि पाणीपट्टी थकबाकी अधिक, यामुळे ही उपसा सिंचन योजना संकटात सापडली आहे.

...

अशी आहे अवस्था

२०१४-१५ मधील थकबाकी : १९ लाख ७१ हजार

मार्च २०२१ अखेरपर्यंतची थकबाकी : २ कोटी ३२ लाख

२०२१ ते मार्च २०२२ साठी वसुलीचे उद्दिष्ट : १ कोटी रुपये (दरमहा ७ लाख ३३ हजार )

जून २०२१ पर्यंतचे उद्दिष्ट : २४ लाख ९९ हजार

जून-जुलैपर्यंत पाणीपट्टी वसुली : ७२ लाख

जून-जुलै वीजबिल : २२ लाख ९८ हजार ६५० रुपये

...

प्रकल्पाकडे पैसाच नाही

शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी थकबाकीची वसुली करून वीज देयक भरावे, असे अपेक्षित आहे. सरकार बिल भरणार नसल्याने सिंचनासाठी यापुढे पाणी देता येणार नाही, अशी स्थिती आहे. १९८३ मधील ३ कोटी १० लाख रुपये किमतीची ही उपसा सिंचन योजना आता ३४१ कोटी रुपयांची झाली आहे. मार्च अखेरपर्यंत यातील ३४० कोटी ३६ रुपये खर्च झाले असून जेमतेम १ कोटी रुपये हातात आहेत. यामुळे ही योजना वाचविण्यासाठी पाणीपट्टी वसुलीशिवाय आता दुसरा आधारच राहिलेला नाही.

...

३८ गावातील शेतकरी येणार संकटात

११,१९५ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात ३८ गावे असून, प्रत्यक्ष सिंचन घेणारे ३,५०० लाभधारक शेतकरी आहेत. योजनेतून ४,४०० हेक्टर सिंचन झाले असून, खरीप व रब्बीतील पिकांसाठी लाभ होत आहे. मात्र, पाणीपट्टीअभावी वीज कापल्यास ३८ गावातील शेतकरी संकटात येण्याचा धोका आहे.

...

कोट

पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना सातत्याने आवाहन करीत आहोत. थकबाकी भरण्यात शेतकरी उदासीन आहेत. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातूनही आवाहन केले जात असून, यापुढे नाइलाजाने थकबाकीदारांच्या ७-१२ वर कर्जाचा बोजा चढवावा लागेल.

- किशोर दमहा, कार्यकारी अभियंता, आंभोरा उपसा सिंचन योजना

...

Web Title: 2.32 crore water load on Ambhora lift irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.