पतसंस्थेत २.२२ कोटींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:22+5:302020-12-25T04:09:22+5:30
नागपूर : पतसंस्थेत २.२२ कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत अध्यक्ष पुरुषोत्तम तुळशीदास बेले, ...

पतसंस्थेत २.२२ कोटींचा घोटाळा
नागपूर : पतसंस्थेत २.२२ कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत अध्यक्ष पुरुषोत्तम तुळशीदास बेले, उपाध्यक्ष नरेश तुलसीदास दांडेकर, व्यवस्थापक दिगांबर आनंदराव येवले, रोखपाल स्वर्णा प्रमोद काकडे तसेच संचालकांचा समावेश आहे. वाठोडाच्या खरबीत विश्वकर्मा ग्रामीण विना शेती पतसंस्था आहे. या संस्थेत एप्रिल २०१६ पासून मार्च २०१९ दरम्यान घोटाळा झाला. यादरम्यान आरोपी पतसंस्थेचा कारभार सांभाळत होते. त्यांनी अवैध पद्धतीचा वापर करून घोटाळा केला. सदस्यांनी सहकार विभाग आणि पोलिसांना तक्रार दिली आहे. पतसंस्थेचे लेखा परीक्षक पुंडलिक पलांदूरकर यांच्या तपासात २ कोटी २२ लाख ८० हजार रुपयाच्या घोटाळ्याचा खुलासा झाला. गुरुवारी वाठोडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेतर्फे चार आरोपींना अटक
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने कपिलनगरच्या एका प्रतिष्ठानात चोरी करून ५.५० लाखाचे पेपर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. सुभाष मिलन वर्मा (२६), पिंटू चंद्रप्रकाश वासनिक (२५), संतोष बाबाराव चव्हाण (२३), अमित महेतराम वर्मा (३०) गुलशननगर कळमना, प्यारेलाल रिकीराम नारायणवंशी (४२) तसेच अरविंद पाल मुक्तिनाथ मिश्रा (४२) वनदेवीनगर, अशी आरोपींची नावे आहेत. ऋषभ आहुजा यांची खसाळामध्ये राज ट्रेडिंग कंपनी आहे. ते पेपरचे व्यापारी आहेत. अमित वर्मा आहुजा यांच्या प्रतिष्ठानात माल लोडिंगचे काम करीत होता. त्याने सुभाष वर्मा, पिंटू वासनिक आणि संतोष चव्हाणच्या मदतीने ५ ऑगस्टला ५.५० लाख रुपये किमतीचे पेपरचे बंडल चोरी केले. हा माल प्यारेलाल आणि अरविंदला विकला. कपिलनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपींचा या घटनेत सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कपिलनगर पोलिसांना सोपविण्यात आले. ही कारवाई निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या पथकाने केली.