आता पाणी करावर ७० टक्के शास्ती माफ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत पाणी कर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेच्या १०० टक्के शास्ती माफीचा पहिला टप्पा संपला आहे. यात ३१ जानेवारीपर्यंत ३३,३५२ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून महापालिकेच्या तिजोरीत १५.३५ कोटींचा महसूल जमा झाला आहे. आता १ फेब्रुवारीपासून २२ फेब्रुवारीपर्यंत थकीत पाणी कर भरण्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये ७० टक्के शास्ती माफ केली जाईल. मनपाच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी थकबाकीदारांना केले आहे.
१ ते २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ७० टक्के शास्ती माफ करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपले पाणी बिल भरून थकबाकीदारांच्या यादीतून आपले नाव कमी करावे, असे आवाहन झलके यांनी केले. कोविड-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. याचा विचार करता, मनपाने मालमत्ता कर आणि पाणी करसंदर्भात अभय योजना आणली. याचा नागरिकांनी लाभ घेउन थकीत कर भरावा, असे आवाहन त्यांनी केले.