आजारपणामुळे १५ टक्के पोलीस सुटीवर
By Admin | Updated: May 20, 2014 01:01 IST2014-05-20T01:01:13+5:302014-05-20T01:01:13+5:30
निवडणूक ‘ड्युटी’ संपली आणि बदली होण्याची वेळ आल्याने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस विभागातील तब्बल

आजारपणामुळे १५ टक्के पोलीस सुटीवर
आजारपणाचे खोटे कारण : नियमांची अवहेलना
जगदीश जोशी - नागपूर
निवडणूक ‘ड्युटी’ संपली आणि बदली होण्याची वेळ आल्याने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस विभागातील तब्बल १५ टक्के कर्मचारी सध्या आजारपणामुळे सुटीवर आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या आजारपणाच्या खोटारडेपणाची सर्वांनाच कल्पना आहे. परंतु कडक अनुशासित समजल्या जाणार्या पोलीस विभागामध्येच नियमांची अवहेलना होत असल्याची बाब धोकादायक आहे. निवडणुकीदरम्यान पोलिसांवर सर्वाधिक दडपण होते. यादरम्यान अनेकदा सुट्यासुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच दरवर्षी मे ते जूनदरम्यान वार्षिक बदली करण्यात येते. परंतु निवडणुकीमुळे यंदा बदल्यांची प्रक्रिया मंद गतीने झाली. पूर्वी एका ठाण्यात ६ वर्षे आणि एक झोनमध्ये १२ वर्षे पूर्ण करणार्या अधिकारी-कर्मचार्याची बदली केली जात होती. या नियमामध्ये बदल करून एका ठाण्यात दोन वर्षे आणि एका झोनमध्ये चार वर्षे पूर्ण करणार्या अधिकारी-कर्मचार्याची बदली केली जात आहे. शहर पोलीस अधिकार्यांमध्ये नागपूरबाहेरच्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते येथून बाहेर पडण्याची वाट पाहत आहेत. बदलीसाठी ‘जुगाड तंत्र’चा प्रभाव असतो. या उद्देशाने अधिकारी आणि कर्मचारी आजारी सुट्यांचा वापर करीत आहेत. आजारी सुटीवर जाण्यासाठी अधिकारी-कर्मचार्यांसाठी वेगवेगळी प्रक्रिया आहे. उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी स्टेशन डायरीमध्ये आजारी असल्याचा उल्लेख करून सुटीवर जातात. शिपायी ते सहायक उपनिरीक्षक दर्जाचे कर्मचारी आजारी सुटीसाठी अर्ज करून उपचारासाठी सुटीवर जातात. वैद्यकीय अधिकार्याने केलेल्या शिफारशीच्या आधारावर त्यांना ‘सिक मेमो’ दिला जातो. डॉक्टरतर्फे रुग्णालयात भरती होण्याची शिफारस केल्यास कर्मचार्यास पूर्ण सुटी दिली जाते. घरी राहताना उपचाराची शिफारस केली असता कर्मचार्याला घराजवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. परंतु अनेक वर्षांपासून कुणीच या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. याच वर्षी २० दिवसांपेक्षा अधिक आजारी रजेवर असल्याबाबत संबंधित अधिकारी-कर्मचार्याला वेतन न देण्याचाही नियम आहे. सूत्रानुसार हा नियम केवळ सामान्य कर्मचार्यांनाच लागू केला जातो. अधिकारी आणि त्यांचे मर्जीतील कर्मचार्यांना हा नियम लागू केला जात नाही. आजारी रजेवर असल्याचा बहाणा शोधणार्या कर्मचार्यांची सुद्धा त्यांची स्वत:ची मजबुरी आहे. ठाणेदार ‘महिन्याचा चंदा’ देणार्या कर्मचार्यांचे रजेचे अर्ज तातडीने स्वीकार करतात. त्यामुळे इतर दुसर्या कर्मचार्यांना सुटी मिळत नाही. त्यामुळे त्यांना आजारपणाचे खोटे कारण सांगावे लागते. रजा देण्याबाबत अधिकारी हे दुजेपणाचा व्यवहार करीत असल्याने सदर ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त असल्याचे सांगितले जाते.