लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्हान नदी बोगदा वळण योजनेनंतर आता कन्हान वळण योजना हा नवा प्रकल्प आकारास येत आहे. काटोल, नरखेड, सावनेर आणि कळमेश्वर तालुक्याचे भाग्य उजळणारा हा प्रकल्प १,४९६ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पातून या चारही तालुक्यांतील १२,९१४ हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. मात्र सध्यातरी या प्रकल्पाच्या डीपीआरचे काम सुरू आहे.
गोदावरी पाणी तंटा लवादानुसार कन्हान नदीतील १५ टीसीएम पाणी महाराष्ट्राच्या वाट्याचे आहे. आंततराज्यीय नियोजनानुसार, यातील १५ टीसीएम पाण्यापैकी १० टीसीएम पाणी मध्यप्रदेशाच्या हद्दीतील जामघाट जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर नियंत्रित स्वरूपात १५ ऑक्टोबर ते ३० जून या काळात मिळणार आहे. उर्वरित ५ टीएमसी पाणी कन्हान जलविद्युत प्रकल्पाच्या खाली पण मध्यप्रदेशच्या हद्दीत कन्हानवर बॅरेज बांधून महाराष्ट्राला द्यायचे आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या क्षेत्रातील भूजलपातळी बरीच खोल आहे. या क्षेत्राची नोंद डार्क झोनमध्ये झाली आहे. पाण्याचा अन्य स्रोत उपलब्ध होण्यासारखा नसल्याने या भागाला अशा योजनांमधून पाणी देणे नितांत गरजेचे झाले आहे. या योजनेतून पाईपलाईनच्या माध्यमातून वितरण प्रणालीचे धोरण ठरले आहे.
...
जलसंधारण मंत्र्यांच्या दालनात बैठक होणार
या प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात लवकरच बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पाटील नागपूर जिलह्याच्या दौऱ्यावर आले असता आढावा बैठकीत कन्हान नदी वळण सिंचन योजनेचा विषय चर्चेला आला होता. या कामाला प्राधान्य दिल्यास काटोल, नरखेड, कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह पाणी सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. तसेच संत्रा उत्पादक क्षेत्रालाही याचा लाभ मिळणार आहे. सिंचनासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण होणार असल्यामुळे ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याची व त्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
...
अशी आहे योजना
१,४९६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात कन्हान नदीच्या कोची बॅरेजमधून पाणी लिफ्ट करून कोलार धरणात टाकले जाईल. या धरणाच्या साठ्यामधून तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वितरण करून १२ हजार हेक्टर कृषी क्षेत्र सिंचित करण्याचे या योजनेत प्रस्तावित आहे. सिंचन आणि औद्यागिक वापर हा मुख्य उद्देश आहे. सिंचनासाठी ८६.०४८ द.ल.घ.मी. पाणी दिले जाणार असून यात काटोल तालुक्यासाठी ९०४ हेक्टर, नरखेड तालुक्यासाठी ९,१९६ हेक्टर, सावनेर तालुक्यासाठी २,०५३ हेक्टर आणि कळमेश्वर तालुक्यासाठी ७६१ हेक्टर असे एकूण १२,९१४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे.
...
असे असेल पाण्याचे नियोजन
एकूण पाणी वापर : ९२.२३ द.ल.घ.मी.
सिंचन वापर : ८६.०४८ द.ल.घ.मी.
पाणी पुरवठा योजना : ०.८९ द.ल.घ.मी.
औद्योगिक वापर : १.००० द.ल.घ.मी.
बाष्पीभवन व्यय : ४.२९६ द.ल.घ.मी.
...
कोलारची उंचा वाढणार
या प्रकल्पासाठी कोलार धरणाची उंची ७.५७ मीटरने वाढवावी लागणार आहे. यातून संचय पातळी ३७१.५७० मीटर होईल. या वाढीव पातळीत ९०.६६१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा निर्माण होणार आहे. कोलारचे सध्याचे मूळ बुडीत क्षेत्र ५८५ हेक्टर आहे. उंची वाढणार असल्याने या धरणासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.
...