लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली आहे. थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित गुरुवार ८ एप्रिलपर्यंत ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून १,१६० कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेतील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल ७७३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधी देखील हे शेतकऱी मिळविणार आहेत.
दरम्यान, राज्यातील २ लाख ८७ हजार ६४ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांसह सुधारित मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून कृषिपंपाच्या वीजबिलांतून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल ६६ टक्के रकमेचा निधी हा संबंधीत ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. या महत्वाच्या तरतुदीमुळे या थकबाकीमुक्तीला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. मागील वर्षी १ एप्रिल २०२० पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे.
कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण ११६० कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे तब्बल ७७३ कोटी रुपयांचा निधी संबंधीत ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरणार आहेत.