वुहानचा धडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:04 AM2020-02-16T06:04:00+5:302020-02-16T06:05:04+5:30

शेजारधर्म पाळताना डॉ. कोटनिसांनी चिनी सैन्याच्या मदतीसाठी पहिल्यांदा वुहान गाठलं, याच वुहानमध्ये 2018ला पहिलं भारत-चीन  अनौपचारिक शिखर संमेलन झालं आणि आज  हेच वुहान कोरोना व्हायरसचं जागतिक केंद्र आहे. प्रत्येक वेळची घटना वेगळी, प्रसंग वेगळा आहे; पण याच वुहाननं ‘जिंदादिली’चा  एक नवा संदेशही आपल्याला दिला आहे.

Wuhan's lesson! | वुहानचा धडा!

वुहानचा धडा!

Next
ठळक मुद्देवुहान व्हायरसच्या निमित्तानं ‘वुहान जिंदादिली’ही आपण कायम जागती ठेवण्याची आवश्यकता आहे.

- डॉ. राजेंद्र शेंडे

चीनच्या वुहानमध्ये उगम पावलेल्या आणि आता जगभरात झपाट्यानं उच्छाद मांडलेल्या कोरोना व्हायरसच्या निमित्तानं अनेक गोष्टींची शिकवण जगाला आणि आपल्यालाही दिली आहे. तो संदेश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
कोरोना व्हायरसची लागण सर्वदूर पसरते आहे, हे लक्षात आल्याबरोबर भारत सरकारनं चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांना परत मातृभूमीला आणण्याची मोहीम तातडीनं सुरू केली. संपूर्ण आशिया खंडात भारतानं ही मोहीम सर्वात आधी सुरू केली. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणतानाच शेजारधर्माला जागून मालदीवच्या नागरिकांनाही भारतानं मदत केली.
भारताची ही मोहीम सुरू असतानाच 5 फेब्रुवारीला मी ‘साउथ एशिया मॉनिटर’ आणि ‘मीडिया इंडिया ग्रुप’वर यासंदर्भात दोन लेख लिहिले आणि सोशल मीडियावर मुलाखती दिल्या. त्यात मी सांगितले की, कोरोना व्हायरस ही आजच्या घडीला निश्चितच सगळ्या जगासमोर अतिशय मोठी आपत्ती आहे; पण अशा आपत्तीतच अनेक मोठय़ा संधीही दडलेल्या असतात. सुरुवातीला ही संधी आपण दवडली; पण आता पुन्हा योग्य दिशेनं आपण पावलं टाकतो आहोत.
अशा आपत्तीच्या काळात भारतीय नागरिकांची प्रथम सुटका करणं, हे आपलं राष्ट्रीय कर्तव्यच आहे, ते आपण केलं; पण चीन एका अतिशय भीषण अशा संकटातून जात असताना ‘शेजारधर्म’ म्हणून त्यांनाही सर्वात प्रथम मदतीचा हात आपण पुढे करणं अतिशय अत्यावश्यक होतं, आहे.
कोरोना व्हायरससारखी आपत्ती कोणावरही, अगदी आपल्यावरही येऊ शकते. अशा वेळी दोन्ही शेजारी देशांनी संयुक्तपणे त्याविरुद्ध लढा देणं, एकत्रित संशोधन करणं, कृती कार्यक्रम आखणं, वैद्यकीय मदत देणं, मैत्रीचा हात पुढे करणं, दोन्ही बलाढय़ शेजारी देश एकत्रितपणे या भयंकर संकटाला सामोरे जाताहेत हा संदेश जगापर्यंत पोहोचवणं आणि गरजेच्या, आणीबाणीच्या प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून मानवतेच्या मुद्दय़ांवर आम्ही एकत्र येतो, हा आदर्श जागतिक समूहासमोर घालून देणं. अशा अनेक गोष्टी यातून साध्य करणं शक्य आहे. दोन मोठे देश एकत्र आले, तर त्यातून दोन्ही देशांचं व्यावसायिक, आर्थिक हितही मोठय़ा प्रमाणावर साधलं जातं.
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी आतापर्यंत दोन गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य दिलं. पहिलं म्हणजे ‘लूक इस्ट’ आणि दुसरं ‘नेबरहुड फस्र्ट’. याचा अर्थ मोदींच्या आधी जे सत्तेवर होते, त्यांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं किंवा त्यांनी याबाबतीत काहीच केलं नाही, असं नाही; पण मोदींनी या दोन्ही गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं व त्यांना परराष्ट्रनीतीत प्राधान्य दिलं. त्यामुळे मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात आपल्या शेजारी सर्व देशांना, अगदी पाकिस्तानलाही त्यांनी शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि चीनचं पहिलं अनौपचारिक शिखर संमेलन एप्रिल 2018मध्ये झालं ते वुहानमध्येच. दुसरं अनौपचारिक शिखर संमेलन ऑक्टोबर 2019 मध्ये झालं, चेन्नईजवळच्या महाबलीपुरम इथे. या शिखर संमेलनाला ‘वुहान - पार्ट टू’ असंही म्हटलं जातं.
काय महत्त्व आहे, असतं अशा अनौपचारिक शिखर संमेलनांचं? राजकीय किंवा कोणताही ठरावीक अजेंडा बाजूला ठेवून अशा संमेलनांत चर्चा, देवाण-घेवाण केली जाते. वादाचे आणि वादविवादाचे मुद्दे बाजूला ठेवून इतर बाबींवर मतैक्य घडवून परस्पर संबंध विधायक पातळीवर नेण्याचे प्रय} केले जातात. एकमेकांमध्ये मतभेद असू शकतात; पण ते भांडणाच्या पातळीवर आणि हमरीतुमरीवर येणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. ‘हार्ट टू हार्ट’; जणू काही ‘ये हृदयीचे ते हृदयी.’ असं या संमेलनांचं स्वरूप असतं. 
भारत आणि चीन यांचे बाह्यसंबंध कसेही दिसू देत; पण भारत आणि चीनच्या नागरिकांमध्ये कायम जिव्हाळा पाहायला मिळाला आहे. चीनमध्ये जर आपण गेलो, तर तिथेही आपल्याला या जिव्हाळ्याची प्रचिती येऊ शकते. भारत आणि चीन हे दोन बलाढय़ देश केवळ एकमेकांची शेजारी नाहीत, उत्तुंग हिमालय आणि बुद्धिझमही आपण एकमेकांसोबत वाटून घेतला आहे. कठीणप्रसंगी आपण एकमेकांना मदत केली आहे.
चीन कठीण परिस्थितीतून जात असताना राजकारण बाजूला ठेवून सामाजिक भावनेतून शेजारधर्म पाळणं आताही आपलं कर्तव्य आहे. हा पायंडा आपण विसरलो की काय, असं 5 फेब्रुवारीला मी लिहिलेल्या लेखांचं आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या माझ्या मुलाखतींचं साधारण स्वरूप होतं.
कोरोना व्हायरसच्या निमित्तानं ‘नेबरहुड फस्र्ट’- शेजारधर्माच्या नात्याची जवळपास शंभर वर्षांपूर्वीची यादही जागी होते, हे मी त्या लेखातून वा व मुलाखतीतून सांगितले होते.  डॉ. द्वारकानाथ कोटनिस या भारतीय डॉक्टरांच्या रूपानं भारत-चीन या दोन्ही देशांतील सर्वसामान्य नागरिकांच्या दोस्तीची कहाणी आजही चीनमध्ये सर्वसामान्य नागरिक मोठय़ा अभिमानानं सांगतात.
1993मध्ये मी पहिल्यांदा चीनला गेलो होतो. चीनमध्ये बसनं फिरत असताना तिथल्या चिनी मित्रानंही डॉ. कोटनिस यांची स्मृती जागवून त्यांची कहाणी पुन्हा एकवार मला सांगितली. डॉ. कोटनिस यांनी चिनी सैनिकांना कर्तव्यभावनेतून केलेल्या मदतीचं प्रतीक म्हणून चीनमध्ये डॉ. कोटनिस यांचं भव्य स्मारक तर उभारलेलं आहेच; पण डॉ. कोटनिसांबद्दल चिनी नागरिकांमध्ये आजही आदराची भावना आहे, हेही त्यानं मला आवर्जून सांगितलं.
कोरोना व्हायरसमुळे वुहान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आलं; पण या वुहानशी आपणही अतिशय जवळच्या नात्यानं बांधलेलो आहोत. चिनी सैनिकांना मदतीसाठी डॉ. कोटनिस आणि अन्य भारतीय डॉक्टरांचं पथक चीनमध्ये पहिल्यांदा उतरलं, ते वुहानजवळच आणि चीनबरोबर भारताचं पहिलं अनौपचारिक शिखर संमेलन झालं तेही वुहानमध्येच.
शेजारधर्माचं प्रतीक म्हणूनही या वुहानशी आपली ओळख आहे.
तब्बल 81 वर्षांपूर्वी, 1938चा तो काळ.
जपाननं चीनवर आक्रमण केलं होतं. सैन्य आणि शस्रबळानं प्रबळ असलेल्या जपाननं चीनला माघारलं होतं. आक्रमक जपान्यांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चिनी जनता झगडत होती. ब्रिटिशांच्या अमलाखाली भारतही तेव्हा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत होता. चीन आणि भारत, दोन्हीही देश पारतंत्र्यात होते. जपान्यांच्या तडाख्यामुळे अनेक चिनी सैनिक जखमी आणि मृत्युमुखी पडत होते. चिनी जनरलनं पंडित जवाहरलाल नेहरूंना वैद्यकीय मदत आणि भारतीय तज्ज्ञ डॉक्टरांना चीनला पाठविण्याची विनंती केली. तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 जून 1938ला पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनतेला त्यासाठी आवाहन केलं; जे स्वत:च त्यावेळी ब्रिटिशांच्या जुलुमातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडत होते.
मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधून नुकतीच वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतलेले 28 वर्षीय सोलापूरचे तरुण डॉ. कोटनिस यांनी नेताजींच्या या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद दिला आणि चिनी सैनिकांच्या मदतीसाठी जाण्याची तयारी दाखवली. 
तो असा काळ होता, जेव्हा भारताला चीनच्या केवळ दोनच गोष्टी प्रामुख्याने माहीत होत्या. एक म्हणजे चायनिज सिल्क आणि दुसरं, बौद्धिस्ट यात्रेकरू ह्युआन त्संग!
‘नेबरहुड फस्र्ट’ या भारतीय धोरणाचं वैयक्तिक पातळीवरील ते पहिलं प्रतिबिंब होतं! डॉ. कोटनिस आणि चार भारतीय डॉक्टरांनी वुहानजवळ चीनच्या भूमीवर पाऊल ठेवलं, तोपर्यंत एकाही भारतीयाला युद्धभूमीवरून मायदेशी आणलेलं नव्हतं. उलट या भारतीयांनीच स्वयंप्रेरणेनं त्या रणभूमीवर पाय ठेवला होता.
आशिया खंडातला भारत हा पहिला देश होता, जो चिनी सैनिकांच्या मदतीसाठी सर्वात प्रथम चीनला पोहोचला होता. कोरोना व्हायरसच्या वेळीही चीनमध्ये पोहोचणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश होता; पण यावेळी तो आपल्या स्वत:च्या नागरिकांना वाचविण्यासाठी चीनला पोहोचला होता, हा यातला विरोधाभास.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि औषधांचा तुटवडा असताना डॉ. कोटनिस यांनी युद्धभूमीवर सलग 72 तास चिनी सैनिकांवर शस्रक्रिया केल्या आणि अनेकांना जीवदान दिलं. जवळपास आठशे चिनी सैनिकांवर त्यांनी शस्रक्रिया केल्या. त्यांच्या याच योगदानामुळे डॉ. कोटनिस यांना नंतर चीनमधील डॉ. बेथुन इंटरनॅशनल पिस हॉस्पिटलचे संचालकपद देण्यात आले.
डॉ. कोटनिस यांच्याबरोबर भारतातून आलेले इतर चार डॉक्टर युद्ध संपल्यावर भारतात परत गेले. डॉ. कोटनिस मात्र चीनमध्येच राहिले. तिथेच मैत्री झालेल्या ग्यू किंगलॅन या चिनी नर्ससोबत त्यांनी विवाह केला. आपल्या मुलाचं नावही त्यांनी ठेवलं ‘यिन्हुआ’ (इंडिया-चायना)!
प्रमुख डॉक्टर आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरचं अतिशय कष्टाचं, हलाखीचं सातत्यपूर्ण काम. या सार्‍या असह्य ताणाचा फटका डॉ. कोटनिस यांनाही बसला. त्यातच 1942 मध्ये तरुण वयातच डॉ. कोटनिस यांचं निधन झालं. आपली प}ी आणि मुलाला मागे सोडून ते निघून गेले; पण ‘नेबरहुड फस्र्ट’चा, शेजारधर्माचा त्यांनी मागे ठेवलेला आदर्शही अतिशय महत्त्वाचा होता. भारत आणि चीन यांचं नातं परस्परांसाठी सार्मथ्यशाली आणि जगासाठी एका उत्तम स्रोतात परावर्तित करणं ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे. 
डॉ. कोटनिसांच्या रूपानं शेजारधर्माचं प्रतीक म्हणून एका भारतीयानं वुहानला दिलेली पहिली भेट, याच वुहानमध्ये 2018ला झालेलं पहिलं भारत-चीन अनौपचारिक शिखर संमेलन आणि आज कोरोना व्हायरसचं जागतिक केंद्र असलेलं वुहान. याच वुहाननं आपल्या सर्वांना एक संदेश दिला आहे. भारत आणि चीन या दोन्ही बलाढय़ देशांनी मैत्रीचा हात हातात घेणं जरुरीचं आहे, आगामी काळात मानवजातीला भेडसावणार्‍या समस्यांवर नावीन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय शोधण्यासाठी या दोन्ही देशांचा पुढाकार गरजेचा आहे. वुहान व्हायरसच्या निमित्तानं ही ‘वुहान जिंदादिली’ही आपण कायम जागती ठेवण्याची आवश्यकता आहे. 
त्याचंच प्रतीक म्हणजे 9 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना लिहिलेलं पत्र. कोरोना व्हायरसच्या संदर्भात सर्वतोपरी मदत करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. हे पत्र म्हणजे केवळ एका नेत्यानं दुसर्‍या नेत्याशी साधलेला संवाद नाही, जनतेनं नेत्याशी आणि नेत्यानं पुन्हा जनतेशी जोडलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचं, त्यांच्या सहभावनेचं आणि परस्पर हृद्य संवादाचं अनोखं स्वरूपही त्याला आहे. 

(लेखक ‘तेर पॉलिसी सेंटर’चे चेअरमन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक उपक्रमांचे माजी संचालक आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत.)
(शब्दांकन : समीर मराठे)

Web Title: Wuhan's lesson!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.