- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)प्रिय कार्यकर्त्यांना,जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही तर थेट बातमी येईल... असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आणि गावागावात चावून चोथा झालेला विषय पुन्हा चर्चेला आला. ते दोघं एकत्र आले काय आणि न आले काय...? तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का..? उगाच बसता चर्चा करत... काल, शनिवारी राज ठाकरे घराबाहेर पडले, तर मीडियावाल्याने त्यांना विचारले, साहेब कुठे निघालात..? तेव्हा राज मिश्कीलपणे म्हणाले, मातोश्रीवर... चॅनलवाल्यांना तेवढा विषय दिवसभर पुरेसा ठरला. त्यांचा दिवस भागला. उद्या दुसरा विषय आला की ते दुसऱ्या विषयावर बोलत राहतील. तुमचे भवितव्य चॅनलवाले जसे विषय बदलतात तसे बदललेले तुम्हाला तरी चालेल का..? या अशा प्रश्नांनी तुमचे राजकीय भवितव्य सुधारणार का? आम्ही पक्षासाठी सतरंज्या उचलल्या, असे म्हणायची ही आता सोय राहिली नाही. सतरंज्या टाकण्यापासून मंडप टाकण्यापर्यंत सगळी कामे हल्ली ठेकेदार करतात.
महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे दिवस आहेत. असे विषय रोज येतील. लोकसभा आणि विधानसभेच्या आधीचे दिवस आठवून बघा... डोके भंडावून सोडतील अशा अफवा दर तासाला येत होत्या. आता कुठे अफवांचे वारे सुरू झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे..! उद्धव आणि राज यांनी किती जागा लढवायच्या हे लोकांनीच ठरवून टाकले आहे..! शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते; पण मतदान होत नाही असे म्हणत चर्चेत राहण्याची व्यवस्था केली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने बघा... कोण, कोणासाठी, कधी, कुठे, काय बोलला याचा सिक्वेन्स पत्त्यातल्या रम्मीसारखा नीट लावता आला पाहिजे. कोणता जोकर कुठे लावून सिक्वेन्स पूर्ण करायचा यासाठी ही नेते मंडळी वाट्टेल ते करतात. तुमचा जोकर होऊ देऊ नका...
राज आणि उद्धव एकत्र येण्यात पहिला फायदा उद्धव ठाकरे यांना होईल. त्यांच्या पक्षातून सुरू झालेले आउटगोइंग थांबेल. जे माजी नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात आहेत, त्यांना ब्रेक लागेल. गेले काही दिवस ठाकरे सेनेचे पाच खासदार शिंदेसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती. उद्धव - राज एकत्र येण्याच्या बातमीने ही चर्चा तुम्हाला कुठे ऐकायला तरी आली का..? काट्याने काटा काढला जातो, तसे एका चर्चेला दुसऱ्या चर्चेने कसे मारावे हे राजकारण्यांकडून शिकले पाहिजे. ठाण्यात भाजपची बैठक झाली. आपल्याला आता मित्रपक्षासोबतच लढावे लागेल असे तिथल्या नेत्यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर स्पष्ट केले. (तिथे भाजपचा मित्रपक्ष शिंदेसेना आहे.) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये स्वबळाची भाषा वापरली. (तिथे त्यांची लढत शिंदेसेनेसोबत आहे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची इच्छा असते. आधी पक्ष वाढवू, नंतर एकत्र बसू असे पुण्यात सांगितले. या अशा चर्चा आत्ताच का सुरू झाल्या..? याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत.
जाता जाता : दोन भाऊ एकत्र येण्याचा सगळ्यात जास्त फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसेल की भाजपला..? जर शिंदेसेनेला फटका बसेल आणि त्यात भाजपचाच फायदा होणार असेल, तर दोन भाऊ एकत्र येण्याला भाजप सपोर्ट करेल की विरोध..? भाजप आणि शिंदेसेना यांच्यातले सुमधुर संबंध जगजाहीर आहेत. कोणाची कामे, कोणी थांबवली आहेत हेही सगळ्यांना ठाऊक आहे. तेव्हा डोक्याला शॉट लावून घेऊ नका... दोन भाऊ एकत्र येणार म्हणून लगेच उड्या मारू नका. ते दोघे एकत्र आले तर तुम्ही लगेच नगरसेवक, महापौर व्हाल अशी स्वप्न पाहू नका. ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहलेख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है... अल्लामा इक़बाल यांचा हा शेअर लक्षात ठेवा. फलाना डिंमका आगे बढो हम तुम्हारे साथ है... बेंबीच्या देठापासून अशा घोषणा देणे फक्त तुमच्या हाती उरले आहे... हे पक्के लक्षात ठेवा... आम्हाला तुमच्याविषयी काही वाटते म्हणून हे सांगितले. बाकी तुमची मर्जी...- तुमचाच बाबूराव