शहरातली ‘समोवार’ जेव्हा बंद होतात
By Admin | Updated: April 4, 2015 18:45 IST2015-04-04T18:45:56+5:302015-04-04T18:45:56+5:30
शहरातली ‘समोवार’ जेव्हा बंद पडतात तेव्हा शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो आणि शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातं. थोडं थोडं झिजत जातं..

शहरातली ‘समोवार’ जेव्हा बंद होतात
>- शर्मिला फडके
'समोवार’ हे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतं. त्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं. ज्यात आनंदाचे, दु:खाचे, जिव्हाळ्याचे, नैराश्याचे, उमेदीचे, यशाचे, अपयशांचेही असंख्य क्षण भरून असतात. मुंबईसारख्या कोलाहल भरून राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव ‘समोवार’ असतं.
--
सकाळचे अकरा वाजले की एक परदेशी तरुण मुलगी आपल्या लहान मुलीला प्रॅममधे घालून रोज त्या रेस्टॉरन्टमधे यायची, पॉट टी मागवायची आणि तिथल्या टेबलावर बसून पुस्तक वाचायची किंवा पत्र लिहायची. लिहिताना काहीवेळा तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे. चेहराही अनेकदा दमलेला दिसायचा. रेस्टॉरंटच्या मालकिणीच्या ते लक्षात आलं तेव्हा तिने ऑर्डर दिलेली नसतानाच त्या टेबलावर ऑमलेट आणि ज्यूसही पाठवायला सुरु वात केली. पत्र लिहिणारी सावकाश ते संपवायची. मग बिल देऊन मुलीला घेऊन निघून जायची. जाताना रेस्टॉरन्टच्या मालिकणीचे आभार मानायला विसरायची नाही. मग हळूहळू गप्पा सुरू झाल्या. तेव्हा कळलं की ती तरुण मुलगी आपल्या इंग्लंडमधल्या नातेवाइकांना खूप मिस करतेय. भारतात राहण्याची, इथल्या आयुष्याशी जुळवून घेण्याची सवय करण्याची धडपड करताना थकून जातेय. आपल्या लहान मुलांचं आवरून, घरातलं काम करून, नवर्याचं खाणंपिणं करून तो कामावर गेला की ती इथे येते आणि इथेच फक्त तिला निवांत वेळ मिळतो घरच्यांना पत्र लिहून खुशाली कळवण्याचा, तिकडच्या मित्र-मैत्रिणींना इथल्या गमतीजमती कळवायला. काही दिवसांनंतर एका संध्याकाळी ती आपल्या नवर्यासोबत तिथे आली. तेव्हा रेस्टॉरन्टच्या मालकिणीला कळलं की तरुणी शशी कपूरची बायको, जेनिफर केण्डल कपूर आहे. प्रॅममधली ती चिमुरडी होती संजाना कपूर. ते रेस्टॉरन्ट होतं नुकतंच बंद झालेलं समोवार.
समोवार बंद होणार हे कळल्यावर संजाना कपूरने ही आठवण सांगितली. ती जेव्हा सांगते की ती अक्षरश: या जागेत वाढली आहे, लहानपणापासूनचे अनेक आनंदाचे क्षण या जागेत साठून आहेत तेव्हा त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.
एकटा, एकाकी आरा, कॅनव्हासचं ओझं घेऊन हिंडणारा, समोवारमधे बिनदुधाचा चहा पीत गप्पा मारणारा. कधी समोवारमधे न खाणारा. त्याला वांग्याचं भरीत खावंसं वाटलं तेव्हा त्याने समोवारमधूनच तेरा रुपये घेतले वांगी, टोमॅटो, मिरच्या आणायला आणि मग तिथल्या किचनमधे ते बनवलं.
मुंबईतून फ्रान्सला गेलेले आणि तिथून पुन्हा पुन्हा मुंबईत येत राहिलेले, परत जात राहिलेले रझा जहांगीरमधे झालेल्या त्यांच्या एका चित्रप्रदर्शनानंतर खूप उशिरा, सगळी गर्दी ओसरल्यावर समोवारमधे चहा प्यायला आले आणि जाताना टेबलावरच्या पेपर नॅपिकनमधे लिहून गेले- ‘‘किप मी बॅक, डोण्ट लेट मी लिव्ह, क्लास्प मी टू दिज शोरस - मुझे आप यहां रोक लिजिए-’’.
लक्ष्मण श्रेष्ठ नेपाळवरून जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे शिकायला आले चित्रकलेच्या ओढीने. घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे जवळ पैसे नसायचेच. होस्टेलवर जेमतेम रात्री झोपण्यापुरता आसरा. अशात जे जे मधून पास आऊट होत असतानाच त्यांचं प्रेम जडलं एका सुंदर, श्रीमंत घरातल्या मुलीवर. जहांगिर आर्ट गॅलरीच्या पायर्यांवर ते तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत बसायचे. समोवारच्या उषा खन्नांनी बरेच दिवस ते पाहिलं आणि त्याला आत रेस्टॉरन्टमधे येऊन बसत जा असं सुचवलं. तो मुलगा संकोचला. त्याच्याजवळ तिथे रोज चहा प्यायला पैसे नव्हते. पण समोवारमधे चालत होतं जमेल तेव्हा पैसे दिलेले. तो मुलगा हळूहळू तिथे इतका रमला की एकदा त्याने विचारलं की ‘मूली का आचार’ का बनवत नाही तुम्ही इथे? हा खास नेपाळी पदार्थ त्याला त्याच्या मैत्रिणीला खिलवायचा होता. तेव्हा त्याच्याकडूनच रेसिपी घेऊन ते बनवलं गेलं. मग तो पदार्थ मेन्यू कार्डावर आला. लक्ष्मण श्रेष्ठांचं पुढे त्या मुलीशी म्हणजे सुनीता परळकरांशी लग्न झाल्यावर समोवारच्या स्टाफने त्यांना पार्टी दिली. लक्ष्मण आणि त्यांची बायको समोवारमधे नियमित येत राहिले, अगदी परवा समोवार बंद होईपर्यंत. लक्ष्मण आवर्जून सांगतात की, गरज होती तेव्हा पेंटिंगची मोठी कामं त्यांना मिळाली. हुसेनसारख्या इथेच मिळालेल्या मित्रांनी करून दिलेल्या इथल्या ओळखींमधून.
लक्ष्मण श्रेष्ठ, आरा, जेनिफर कपूरसारखे अनेक जण असतात या अवाढव्य, गजबजलेल्या शहरात; पण समोवारसारख्या जागा मात्र अगदीच मोजक्या, शेवटच्या काही उरलेल्या.
मुंबईसारख्या शहरात असं एखादं रेस्टॉरन्ट अशा या अनेकांकरता काय असतं नेमकं?
जे जे स्कूल ऑफआर्टमधे शिकणारे, तिथून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेले आर्टिस्ट, थिएटर, सिनेमामधे काही नवं करू पाहणारे, लिहू पाहणारे, कविता करणारे, स्वप्न पाहणारे हजारो तरु ण आणि तरुणी.
काय हवं असतं त्यांना शहरात?
जवळ पैसे नसतात तेव्हा त्यांना उधारीवर खाण्याची मुभा, काम मिळवायला फोन करायला लागतो म्हणून कॅश काउन्टरजवळच पब्लिक बूथची सोय, चित्रकारांना त्यांची चित्र विकत घेऊ शकतील अशांशी ओळखी, लेखकांना लिहायला एक निवांत टेबल, कार्टुनिस्टकरता समोर अनेक इंटरेस्टिंग चेहरे. एकंदरीत अनेकांना दिवसभर हवी तितकी, हवा तितका वेळ बसता येईल अशी जागा, ज्यांच्याकडे परमनन्ट अँर्ड्ेस नाही अशांना पत्रव्यवहार करण्याकरता एक पत्ता. कवी, पत्रकार, उभरते लेखक, जाहिरात व्यावसायिक, सिनेमा नाटकांमधे काम करणारे सगळेच एका ठिकाणी जमा होणार, मग त्यातून अनेक पुढील काळात दंतकथांचं स्थान मिळालेल्या गोष्टी घडणार. पत्रकारांना शहरातल्या सांस्कृतिक घडामोडी टिपायला वाव. ताज्या बातम्या कळण्याचं, बातम्या घडण्याचं एक ठिकाण.
दमून भागून समोवारमधे येऊन टेकणं हे घरात येऊन टेकण्यासारखंच. रेस्टॉरन्ट अनेकांच्या लग्नाला साक्षीदार राहिलं, त्यांच्या डिव्होर्सलाही ते साक्षी होतंच. जतीन दासांनी आपलं लग्न समोवारमधेच पंडिताला बोलावून इथल्या स्टाफच्या साक्षीने लावलं आणि मग त्याची आठवण म्हणून रेस्टॉरन्टच्या छतावर न्यूड काढलं. लग्न टिकलं नाही पण त्याने काढलेलं छतावरचं पेंटिंग टिकलं अनेक वर्षं. मग एका पावसाळ्यात गळणार्या छतावरचं न्यूडही पुसलं गेलं. जतीन दासांनी नवं लग्न केलं. ते आणि त्यांची नवी बायको येत राहिले. नाती जमली, तुटली, पुन्हा जुळली इथे.
गीव्ह पटेल, अकबर पदमसी, जहांगिर सबावाला, अर्पना कौर, अंजोली इला मेनन, जोगेन चौधरी, अल्ताफ, प्रोतिमा बेदी, रत्ना पाठक, नासिरु द्दीन शहा, श्याम बेनेगल, अमोल पालेकर. न्यू वेव्ह सिनेमाच्या जन्माला, बहराला, आधुनिक, समकालीन कला मुंबईत रु जत जाताना समोवार साक्षी होतं.
ज्ञानेश्वर नाडकर्णी, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, रणजित होस्कोटे, निस्सिम इझिकेल, अनिल धारकर, डॉम मोरेस, फ्रॉॅन्क सिमोससारखे अनेक जण मुंबईच्या बदलांच्या, घडामोडींच्या नोंदी वृत्तपत्र, कविता, लेखांमधून वेध घेणारे इथे रमले, प्रसिद्ध झाले, अस्ताला गेले.
जेव्हा खिसे रिकामे असलेले भणंग सृजनाच्या ऊर्मी मनात घेऊन शहरातल्या रस्त्यांवर, गल्ल्यांमधून भटकत असतात तेव्हा त्यांना अशा जागांची गरज असते. शहरातली कला-साहित्याची संस्कृती मग इथेच रु जते, फोफावत राहते.
समोवारसारख्या जागा गजबजलेल्या शहरातले सांस्कृतिक ओअँसिस असतात. अशा जागा फक्त भेटण्याच्या, खाण्यापिण्याच्या जागा नसतात. इथले खाद्यपदार्थ उकृष्ट असतीलच असं नाही, पण ते त्यांच्या चवीला, खिशाला परवडणारे, रुचणारे बनत गेलेले असतात. इथे येणारी माणसं घडतात, मोठी होतात आणि मग जागाही मोठी होते, प्रसिद्ध होते. ग्लॅमरसही होते. पण ती उर्मट होत नाही, स्नॉबिशही नाही. ती येणार्याला जिव्हाळा देत राहते.
हळूहळू शहर बदलत गेलं. बॉम्बेचं मुंबई झालं. रस्ते बदलले, नकाशे बदलायला लागले. इराणी कॅफे एकामागोमाग एक नाहिसे होत गेले, कॉफी हाऊसेस बंद पडत गेली. स्ट्रॅण्डसारखी घरगुती जिव्हाळ्यातून चालवलेली पुस्तकांची दुकाने बंद पडली. मिनर्व्हा, मेट्रो, रॉक्सी बंद पडलं, नाट्यगृहे बंद पडली. एकेका फ्लायओव्हरखाली अशी अनेक ठिकाणं जमीनदोस्त होत गेली. शहराच्या नकाशावरची निवांत बेटं होती जी हळूहळू खचत गेली. शहरातल्या वाढत्या चकचकाटात, झगमगाटात बुडून गेली.
तरी समोवार होतं. ते होतं तोवर या बदलांची झळ लागली नाही. पण आता तेही नाही आणि मग तेव्हा प्रश्न पडतो की आता यानंतर काय? शहरातली समोवार जेव्हा बंद पडतात शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो. आणि मग अनेकांच्या नॉस्टेल्जियाचं एक गाठोडं बांधलं जातं आणि ते शहराच्या इतिहासात फेकलं जातं. अनेक जण हळहळतात. त्या जागेत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. आठवणी अडकलेल्या असतात. तिथल्या टेबलखुच्र्यांमधे. ते जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा त्यांना एक कप चहावर तासन्तास बसून रहायला, सिगरेटच्या धुरात विचारांची वर्तुळं काढायला, चर्चा करायला, योजना आखायला, त्या कागदावर मांडायला, इतरांची मतं आजमावून बघायला, आपल्यासारख्या इतर काहींचं नेमकं काय चाललंय, काय चाललेलं नाही ते चाचपडायला इथे जागा मिळालेली असते. खिशात पन्नास रुपये असणार्याला आणि पाच हजार असणार्यालाही सामावून घेण्याची क्षमता अजून कुठे असणार? इंच इंच जागेचा हिशेब लावणार्या महागड्या शहरात अशा बेहिशेबी जागांचं मोल करता येत नाही.
सुख वाटायला, दु:ख शेअर करायला, निराशा गिळून टाकायला अशा जागांची गरज असते. शहराच्या कॉस्मोपोलिटन संस्कृतीमधे संवाद निर्माण व्हायला, एकजिनसीपणा वाढवायलाही या जागा गरजेच्या असतात. समोवार बंद पडतात तेव्हा भेटण्याच्या जागा, गप्पांची ठिकाणं हरवतात. शहरातली लोकं मग आठवणी काढत राहतात. कधी वे साईड इनच्या, कधी भुलाभाई मेमोरियल सेंटरच्या, आर्टिस्ट सेंटरच्या, कोपर्यावरच्या इराण्याच्या.
आणि मग शहर एकसुरी बनत जातं. जास्त यांत्रिक. मल्टीनॅशनल बॅँक्स, ब्रॅण्डेड शॉप्स, चेन रेस्टॉरण्ट्सच्या साचेबद्ध सजावटीखाली शहर आपला चेहरा हरवत जातं. गुळगुळीत होत जातं शहराचं व्यक्तिमत्व. इतर चार आंतरराष्ट्रीय शहरांसारखंच ते एक.
शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातं. थोडं थोडं झिजत जातं. थोडं थोडं पोकळ होत जातं..
(लेखिका ज्येष्ठ कलाआस्वादक आणि समीक्षक आहेत.)