जागे राहा!
By Admin | Updated: March 1, 2015 15:55 IST2015-03-01T15:55:36+5:302015-03-01T15:55:36+5:30
कॉम्रेड पानसरे हे अखेरच्या श्वासापर्यंत गरिबांच्या, श्रमिकांच्या लढाया लढले. पण त्यांच्या एका हाती जसे आंदोलनाचे शस्त्र होते तसे दुसर्या हाती लेखणीचे शस्त्र.

जागे राहा!
>रूपा कुलकर्णी
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिहितात, ‘मला व्याख्यानं द्यायची सवय आहे, तशी लिखाणाची नाही.’ परंतु हा त्यांचा विनय होता. कॉम्रेड पानसरे हे अखेरच्या श्वासापर्यंत गरिबांच्या, श्रमिकांच्या लढाया लढले. पण त्यांच्या एका हाती जसे आंदोलनाचे शस्त्र होते तसे दुसर्या हाती लेखणीचे शस्त्र. चळवळीतील कार्यकर्त्यांना विविध विषयांचे आकलन आणि योग्य रणनीतीचेही ज्ञान व्हावे आणि त्याचबरोबरच समाजप्रबोधन हेही तेवढेच प्रधान उद्दिष्ट होते.
‘समाज दुरुस्त व्हावा’ हा ध्यास घेतलेले पानसरे, त्यांच्या व्याख्यानांमधून दिसायचे आणि लेखनातूनही. आता त्यांचे फक्त लिखाण फक्त आपल्यापाशी आहे.
धर्म, जात, वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन आहे. ‘धर्मविषयक भूमिका’ हा सध्याच्या काळात अतिमहत्त्वाचा प्रश्न! त्यावर कोणतीही भीडमुर्वत न ठेवता पानसरे यांनी लिहिले आहे. धर्मभावनेच्या आधारे धर्मभोळ्या समाजाला चेतवून मते मिळविणार्या व सत्ता बळकावणार्या ‘मोदीवाद्यांना’ नजरेसमोर ठेवून आपल्या भूमिका निश्चित करायला हव्यात असे ते सांगतात, पण त्याचबरोबर ते हाही इशारा देतात की आपल्या देशातील धर्मभोळ्या गरीब समाज विभागास बरोबर घेतल्याखेरीज पुरोगामी चळवळीला बळ येणार नाही. प्राधान्याने येथे प्रबोधन धर्मभोळ्या समाजाचेच करावे लागेल - तेही योग्य परिणामकारक पद्धतीने आणि सातत्याने!
पुरोगामी चळवळींचा भक्कम आधार बनू शकतील असे, पण प्रत्यक्षात प्रतिगामी शक्तींभोवती संघटित होणारे समाजगट ज्या भावनांच्या आणि विचारांच्या आधारे फसविले गेलेले असतात, त्यासंबंधात पुरोगाम्यांनी भूमिका ठरविल्या पाहिजेत, असा आग्रह पानसरे यांनी धरला आहे.
आजच्या परिस्थितीत तर पानसरेंचा हा सल्ला फारच मोलाचा ठरतो. कारण प्रत्यक्षात ज्यांचे आधीच प्रबोधन झालेले आहे, अशाच समाजगटांच्या पुन्हा प्रबोधनाचा प्रयत्न चळवळी करीत राहतात. पुरोगामी विचारांच्या व्यासपीठांचा श्रोतृवर्ग ठरलेलाच असतो. ज्यांना माहिती असते आणि पटलेलेही असते, त्यांच्यासमोरच सातत्याने बोलत राहणे, हा पुरोगामी चळवळींच्या बाबतीत एक चिंतेचा विषय आहे, हे सत्य आहे.
- कॉम्रेडना याची खंत वाटते. त्यांना दुसरी खंत याची वाटते की, आपल्या देशातील पुरोगामी चळवळीची अक्षरश: अनंत शकले झालेली आहेत. ते म्हणतात, ‘पुरोगामी चळवळीची जितकी शकले आहेत तितकी शकले भूमिकांबाबतीत मात्र नाहीत. निदान नसावीत. तशी असायला वाव नाही. चळवळीच्या शकलांच्या संख्येपेक्षा भूमिकांची शकले कमी आहेत आणि ही संख्या आणखी कमी करणे शक्य आहे.’
पुरोगामी चळवळीतील दोषांवर आणि चुकांवर नेमके बोट ठेवताना घरातल्या एखाद्या कणखर वडीलधार्याच्या भूमिकेतून पानसरे जेव्हा कार्यकर्त्यांची कानउघाडणी करतात तेव्हा आपण अंतर्मुख होतोच होतो.
आपण एकटे शत्रूला पराभूत करू शकणार नसू तर मग काय करावे? मित्र शोधावेत की नको? मित्रांना बरोबर घेण्यासाठी आपली भूमिका ताठर ठेवावी की लवचिक असावी? सच्चे आणि पक्के मित्र कोण? कच्चे आणि डळमळीत कोण? सच्च्या मित्रांची जूट भक्कम कशी करावी? संभाव्य मित्रांना आपल्या बाजूला कसे आणावे व कसे ठेवावे? - इत्यादि सर्व प्रश्नांची चर्चा व्हावी म्हणून कॉम्रेड पानसरे कार्यकर्त्यांचेही नेहमी प्रबोधन करीत. त्यांच्या मते विचारवंत कार्यकर्ता असतोच असे नाही, पण कार्यकर्ता मात्र विचार करणारा असावाच लागतो. समाज बदलायला निघालेल्या कार्यकर्त्याला विचारही करावा लागतो आणि कार्यही करावे लागते, हे भान त्यांनी त्यांच्या लेखनातून अखंड दिले
पुरोगामी चळवळीतील हानिकारक अपप्रवृत्तींवर भाष्य करताना पानसरे म्हणतात, पुरोगाम्यांमधली परस्पर कटुता, एकमेकांशी पुरोगामित्वावरून जुंपलेली चढाओढ आणि संप्रदायवाद हे चळवळीची हानी करतात. त्यात इतकी शक्ती व बुद्धी खर्च होते की ‘प्रतिगाम्यांवर’ टीका करायला उसंतच मिळत नाही. म्हणून पुरोगामी कार्यकर्त्यांना पानसरे आग्रहाने सांगतात- ‘प्रतिगाम्यांचे सार्मथ्य ही आजची खरी वस्तुस्थिती नसून पुरोगाम्यांचे दौर्बल्य ही खरी वस्तुस्थिती आहे.’
डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे या दोघांच्याही हत्त्या म्हणजे पानसरे यांनी केलेल्या वरील निदानाचे भीषण पर्यावसान आहे. मोठी माणसे काळाची पावले आधीच ओळखून समाजाला खडबडून जागे करण्याचं काम सातत्याने करीत असतात. धम्मपदातील एक गाथा आपल्याला नेमका हाच संदेश देते. तथागतांनी म्हटले आहे, ‘लोकहो जागे राहा. कारण जाग्या व्यक्तीला भय नसते.’
‘नत्थि जागरतो भयम’ हे बुद्धवचन आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून कॉम्रेड समाजाला सतत जागे करत होते. सर्वाधिक महत्त्व प्रबोधनाला देत असतानाच हे ठासून सांगत की, कृतीपासून फारकत घेतलेले प्रबोधन हे प्रबोधनच असत नाही. समाजजीवनातील कोणत्याही प्रश्नाची चर्चा केवळ सैद्धांतिक नसावी, ती स्थळकाळाचे भान ठेवणारी असेल तरच कृतीला सहाय्यभूत ठरते. त्यांनी स्वत: हे पथ्य नेहमी पाळले. म्हणूनच त्यांना प्रबोधनकार म्हणायचे.