फक्कडभाई
By Admin | Updated: July 18, 2015 13:41 IST2015-07-18T13:41:13+5:302015-07-18T13:41:13+5:30
साधुग्रामात तरुण साधू दोनपाचशे लोकांचा स्वयंपाक करताना, पाणी भरताना, वाढताना, भांडी घासताना भेटतात. कोण असतात हे? कुठून येतात? अध्यात्माची ओढ असलेले फार थोडे, गर्दी असते ती घरातून पळून आलेल्यांचीच!

फक्कडभाई
>- मेघना ढोके
पहिला कुंभमेळा अनुभवला, त्याला आता बारा र्वष झाली. तेव्हापासून आजवर एका प्रश्नाचं समाधानकारक उत्तर काही सापडलेलं नाही :
साधू का बनत असतील ही माणसं?
वयाच्या कुठल्या टप्प्यावर, कुठल्या अवस्थेत माणसं साधू होण्याचा (संन्याशी नव्हे!) निर्णय घेत असतील?
प्रश्न सोपा वाटतो, उत्तर तेवढंच गुंतागुंतीचं!
विशीपंचविशीचे तरुण साधुग्रामातल्या खालशात राबताना दिसतात. चेहरे मिल्ट्रीवाल्या इस्त्रीचे, कमांडरच्या आज्ञेशिवाय चेह:यावरच काय पण त्यांच्या नजरेतही चुकून एखादी सुरकुती हलत नाही. कितीदा प्रयत्न केला तरी हे तरुण साधू बोलत नाहीत चटकन!
पायाखालच्या जमिनीत गाडलेली नजर आणि तोंडात फक्त एकच वाक्य, ‘हमें गुरुआग्या नहीं है, जो पुछना है गुरुजीसे पुछो!’
त्यांचे महंत, बडे बाबाजी फार घिसीपिटी आध्यात्मिक रेकॉर्ड लावायचे. जडजंजाळ हिंदीत ‘जीव और जगत’चं ग्यान सांगायचे, ते फार वरवरचं वाटायचं.
तपोवनातल्या लक्ष्मीनारायण मंदिरातल्या दिगंबर आखाडय़ाचे स्थानधारी महंत होते नारायणदास महाराज. साधू समाजाविषयी अधिकारवाणीनं बोलणारे नारायणदास महाराजांइतके फार कमी लोक त्याही काळात नाशकात होते. दिलखुलास हसणारे, आजोबाच वाटणारे नारायणदास महाराज. (आता ते नाहीत, त्या मंदिरात त्यांच्या फोटोची प्रतिमा तेवढी उरली आहे.) आखाडे-साधू नी त्यांचा शिघ्रकोप नी थयथयाट हे काहीच गावीही नसण्याच्या, घोर अज्ञानी काळात एकदा त्यांना विचारलं होतं, ‘बाबाजी, ये साधू बनते कैसे है? क्या कोई भी साधू बन सकता है?’
ते खळखळून हसले. म्हणाले, ‘कुणीही उठावं आणि साधू बनावं ही इतकी सोपी गोष्ट नाही. केवळ गांजा पिऊन भगवे कपडे घातले तर त्याला कोण साधू म्हणोल? साधुता संभली नहीं संभलती बेटा, ज्ञान हो तो विरक्ती बढती है, मोह हो तो उलझन, दोनो चिजे मन की शांती नहीं रहने देती.’
- एवढंच कळलं की, स्थानधारी महंत शिष्य बनवू शकतात, पण ‘साधू’ मात्र ज्याला त्याला स्वत:लाच बनावं लागतं!
साधुग्रामात फिरताना लक्षात येतं की, भगव्या-पांढ:या कफनीतले आपल्याला सरसकट साधूच दिसत असले तरी सगळेच ‘साधू’ नसतात. प्रत्येकानंच काही संसार सोडून कायमचा ‘संन्यास’ घेतलेला नसतो. काहींनी केवळ एखाद्या स्थानधारी महंताचं शिष्यत्व घेतलेलं असतं, ब्रrाचारी राहण्याची दीक्षा घेतलेली असते. पारंपरिक दीक्षाविधी करून गुरुजींनी गंडा बांधला की तो झाला गंडाधारी-व्रतस्थ शिष्य. चौदा वर्षापासूनचे काही तरुण दिसतात. त्यांच्या रोजच्या दिनचर्येतून आणि रोजच्या धार्मिक पाठांतून त्यांच्या डोक्यात हे पक्कं मुरवलं जातं की, तुम्ही संन्यास घेताय, साधू बनताय ते स्वत:च्या उन्नतीसाठी! - धर्मासाठी, जगासाठी, समाजासाठी नाही!
स्थानधारी महंत, आखाडेवाले महंत ज्यांना शिष्य करून घेतात त्या साधू बनण्याच्या व्यवस्थाच अशा आहेत की, इच्छा असो-नसो, शिस्तीनं-सक्तीनं नियमाप्रमाणं जगावं लागतं. शरीराला परिश्रमांची शिस्त लावली की मनाला लागतेच या तत्त्वावर खरंतर साधूंचं ट्रेनिंगही सुरू होतं. हे आखाडे म्हणजे साधूंची फौजच होती ना एकेकाळी. त्यामुळे फौजेचे नियम इथंही लागू झालेले दिसतातच. हे सारं खरं, पण येतात कुठून ही मुलं? आपल्याच समाजातली असतील ना, आपल्याच अवतीभोवतीची कुणी. एकदम साधूच कशी बनायला निघतात? साधुग्रामात हे तरुण साधू दोनपाचशे लोकांचा स्वयंपाक करताना, पाणी भरताना, वाढताना, भांडी घासताना भेटतात. दुपारची जेवणं-भांडीकुंडी झाली की अनेकजण निवांत होतात.
प्रश्न विचारला, की घुमाफिराकेच उत्तर ! त्यातही हिंदी-शुद्ध घीवाली, आपल्याला ग्यानडोस देणंच सुरू, त्यामुळे त्यांना ‘बोलतं’ करणं फार अवघड जायचं!
सगळे बडे महंत, खालशांचे प्रमुख, बडेबडे ढुढ्ढाचार्य साधू मीडिया म्हटलं की बोलायला नुस्ते आतूर! किती बोलू नी किती नको असं त्यांना व्हायचं. आणि हे त्यांचे शिष्यगण आणीबाणी जाहीर झाल्यासारखे खाल मानेनं जमिनीत नजर गाडून कायम अबोलच!
हळूहळू कळलं की, साधुत्वाचा, अध्यात्माचा प्राथमिक अभ्यास करून, संसारातून मन उडून, जगण्याबिगण्याचे अर्थ शोधत साधू होत अभ्यासाला लागलेले फार थोडे! बहुसंख्य तर घरातून पळालेलेच! पळण्याचं कारण फक्त ‘गरिबी’च असतं असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं मानसिक अस्वस्थता. बैचेन होतात. काहीबाही शोधत फिरतात. काहींना संसारिक कटकटी नको असतात, तर काहींना आपल्या अपयशापासून पळायचं असतं. काही पूर्ण निराश झालेले असतात, जगण्याचा आधार शोधत फिरतात. काहींना आपल्या आहे त्या वास्तवापासून फक्त पळून जायचं असतं. काही ‘सटक’ असतात. अनेकजण तर सणक आली तशी घरातून पळत सुटलेले असतात. उपाशीतापाशी फिरतात, जे मिळेल ते खातात, त्यातून एखाद्या आखाडय़ात आलेच आणि आश्रय मागितलाच तर त्यांना कष्टाच्या कामांना जुंपलं जातं. पाणी भरणं, भांडी, झाडपूस, स्वयंपाक, त्यातून राहण्याखाण्याची सोय होते, आणि ज्याची जशी कुवत तसा तो त्या साधू व्यवस्थेतल्या हायरारकीत पुढं सरकत राहतो.
काही ठिकाणी तर आखाडय़ाचे महंत कुठल्याशा घरी जाऊन सांगतातही की, तुमचा हा मुलगा तेजस्वी आहे, मला द्या !
- श्रद्धा असलेले किंवा गरिबीही असलेले पालक मुलांना साधूला देऊनही टाकतात. अर्थात स्वत:हून मागितलेली किंवा स्वत:हून दिलेली मुलं कमीच! पण तरी असे मुलं मागून आणून, त्यांना घडवून, आपला उत्तराधिकारी बनवणारे बाबाजीही असतात. अर्थात अशी डायरेक्ट एण्ट्री फार कमी लोकांच्या वाटय़ाला येते. बाकीचे सारे घरातून पळालेले, कसल्या ना कसल्या शोधात, साधू बनण्याचा त्यांचाही एक स्ट्रगल असतोच.
एक नक्की - त्यातले काही खरंच हुशार असतात, त्यांना अध्यात्मात गती असते. धर्मशास्त्रचं वाचन असतं. काहीतर असेही भेटले की गीताच नाही तर कुरआन, बायबलही ज्यांनी आपापल्या भाषेतून वाचलेलं होतं. राजस्थानातल्या अगदी खेडय़ातून आलेल्या खालसात महंतासह एक विशीतला साधू आला होता. तीनच वर्षे झाली त्याने संन्यास घेतला होता. दिसायला अत्यंत देखणा, राजबिंडा. रामायणावर रसाळ प्रवचन द्यायचा. त्याच्या प्रवचनाला गर्दी लोटायची. एकदा त्या साधूला विचारलं, आप कैसे बने, साधू?
‘मालूम नहीं! दसवी तक पढाई की, पर मन कहीं और भागता था.’
त्या मनाच्या मागे हा मुलगाही घरातून पळाला. अनेक दिवस कुठंकुठं फिरला. जास्तच अस्वस्थ झाला. उत्तरं सोडा, प्रश्नही कळत नव्हते म्हणाला, त्या काळात हे महंत भेटले. ते म्हणाले, प्रश्न तुङोत ना, मग उत्तरं तूच शोध, राहा इथे हवं तर! म्हणून मग हा साधू बनून राहू लागला. त्याचं वक्तृत्व उत्तम होतं, रामायणाचा अभ्यास केला आणि म्हणता म्हणता महाराजांचा उत्तराधिकारी होण्याच्या वाटेवर जाऊन उभा राहिला.
असे अनेक किस्से.
आखाडय़ात आल्यानंतर अनेकांचे कष्ट सुरू होतात. झाडलोट-स्वयंपाक-गायीगुरांमागे जाणं ते शेणखूर करणं इतर्पयत सगळी कामं ‘उपासना’ म्हणून करावीच लागतात. वय कमी असेल तर काही जणांना शाळा-कॉलेजातही घातलं जातं. इंग्रजीसह कॉम्प्युटरही शिकण्याची संधी मिळते. रामायण-महाभारत-गीता यांच्या निरूपणाचे पाठ गिरवले जातात. त्यातून काहीजण तरबेज होतात. इंटरनॅशनल अफेअर्सचे एक्सपर्ट असणारे आणि इंग्रजी अस्खलीत बोलणारे आणि रामायण मिठ्ठास शब्दांत उलगडणारेही मग भेटतात. आणि काहीजण कामांचे बोजे संपले की भांगेची गोळी लावून बसतात कोप:यात. हरकामे बनून राहतात. काही तर राजकारणही करतात. ती आणखी एक वेगळी गोष्ट आहे.
सतराशे साठ वृत्ती-प्रवृत्तीची माणसं या साधूंच्या रूपात भेटत राहतात.
मूळची घरातून पळालेली, आपल्या माणसांना विसरलेली, सारी नातीच तोडून आलेली..
पण खरंच सुटतात मायेचे पाश?
अयोध्येच्या खालशात भेटलेला एक तरुण साधू एकदम इमोशनल होत म्हणाला होता,
‘जब भागा तब बहौत छोटा था, सब भूल चुका हूं. गाव का नाम तक नहीं याद, पर मां कभी कभी बहौत याद आती है.!’
साधूंच्या जगातलं हे ‘आतलं’ माणूसपण जास्त छळकुटं असतं का? भगव्या कपडय़ाआड आणि साधूच्या बुरख्याआड ते दडवलं जातं का?
-त्याचा शोध हा एक वेगळाच कुंभमेळा आहे!
जगह नहीं है, यहॉँ आसन ना लगाए.’
आपल्याला वाटतं सगळे साधू इथूनतिथून सारखेच! भगवी कफनी, पांढरा डगला, हातात कमंडलू, केसांच्या जटा. झाला साधू!
पण साधूंचं जग अशा सगळ्यांना साधू मानत नाही. कुठल्याच आखाडय़ाशी, खालशाशी संबंध नसलेले, कुणाचेच शिष्य नसलेले, भटके साधू कुणाच्या खिजगणतीतही नसतात. त्यांना साधू समाज म्हणतो, ‘फक्कडभाई’. या फक्कडभाईंची गर्दी सिंहस्थात जास्त असते. अनेकदा खालसावाले खालशाच्या दारावरच बलदंड साधू उभे करतात आणि या फक्कडभाईंना सांगतात की, जगह नहीं है, यहॉँ आसन ना लगाए.’
पण ते घुसतातच. मस्त पथारी लावतात. खातात, झोपा काढतात. गांजाबिंजाची सोय करवून घेतात.
त्यांना ना कसले कष्ट, ना कसली उपासना.
फक्त आराम! आपलं आयुष्य असं उधळून देत निष्क्रिय व्हावं, फक्त दोन वेळच्या जेवणापुरतं जगावं अशा अवस्थेर्पयत का येऊन पोहचतात ही माणसं?
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com