शिखरे अजून खूप दूर
By Admin | Updated: October 4, 2014 19:27 IST2014-10-04T19:27:20+5:302014-10-04T19:27:20+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मेरी कोमचे सुवर्णपदक, भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारलेली धूळ या भारतीयांसाठी अभिमानाच्या बाबी आहेतच परंतु तरीही अजून बरीच मजल मारायची आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षा आणि लक्ष्य हवे ते पहिल्या तिघांत येण्याचेच.

शिखरे अजून खूप दूर
- भीष्मराज बाम
दक्षिण कोरियामध्ये इन्चिओन येथे आशियाई क्रीडा स्पर्धा चालू आहेत. या स्पर्धांचा समारोप होत आला आहे. या स्पर्धा दर चार वर्षांनी भरत असतात. २0१0 साली चीनमध्ये या स्पर्धा झाल्या, तेव्हा भारताने १४ सुवर्णपदके आणि एकंदर ६४ पदके जिंकून आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली होती. अर्थात त्या वर्षी दिल्लीला राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या असल्याने खेळाडू तयार करण्यावर काही प्रमाणात लक्ष दिले गेले होते. त्याचाही चांगलाच फायदा झाला. या वर्षी आतापर्यंत (२९ सप्टेंबर) भारताने ७ सुवर्ण पदके आणि एकंदर ५0 पदके जिंकली आहेत. अजून कुस्ती, बॉक्सिंग, अँथलेटिक्स आणि भारताची हुकमी कबड्डी या खेळांमधल्या स्पर्धा बाकी आहेत. त्यामुळे पदकांची संख्या २0१0 संख्येच्या जवळपास पोहोचू शकेल असे वाटते. गेल्या वेळेस भारत पाचव्या स्थानावर होता, तर या वेळी आपले स्थान अकरावे आहे. चीन १३१ सुवर्ण व एकंदर २९४ पदकांसह पहिल्या स्थानावर, द. कोरिया ६२ सुवर्ण व एकंदर १८९ पदकांसह दुसर्या स्थानावर आणि जपान ३९ सुवर्ण व एकंदर १६१ पदकांसह तिसर्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त कझाकिस्तान, इराण, उ. कोरिया, थायलंड, कतार, उझबेकिस्तान आणि तैपेह हे देशही आपल्या पुढे आहेत. आपल्या ५0 पदकांत ३५ कांस्यपदके आहेत. त्यामुळे आपला क्रमांक इतका खाली गेलेला आहे; कारण पदकतालिकेतला क्रमांक सुवर्णपदकांच्या संख्येवर ठरत असतो.
तीन मुलांची आई असलेल्या मेरी कोमने बॉक्सिंगचे सुवर्णपदक जिंकले आहे. सानिया मिर्झाने भारताला संमिश्र दुहेरीचे सुवर्ण आणि महिला दुहेरीचे कांस्यपदक मिळवून दिले. ही कामगिरी तिने नवोदित खेळाडूंच्या साथीने केली हे उल्लेखनीय आहे. सीमा पुनियाने थाळीफेक शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. अभिषेक वर्मा या नव्या खेळाडूने आर्चरीच्या खेळात सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक रजत अशी कमाई केली. नेमबाजीमध्ये जितू राय हा सेनादलाचा नेमबाज अपेक्षेप्रमाणे चमकला. त्याने फ्री पिस्तूलचे सुवर्णपदक पटकावले. स्क्वाश या खेळातही आपल्या खेळाडूंनी पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले. या सर्वांचे कौतुक करायला हवे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याने राष्ट्रकुल स्पर्धांचे सुवर्ण जिंकून मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या; पण त्याला दोन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. त्याने लगेच स्पर्धात्मक खेळामधून नवृत्ती जाहीर करून क्रीडाशौकिनांना धक्काच दिला; कारण तो अजून दहा वर्षे तरी खेळू शकला असता, असे सर्वांना वाटते. सायना नेहवाल, पी. सिंधू आणि काश्यप या बॅडमिंटन खेळाडूंनी अलीकडे उत्तम खेळ करून दाखवलेला होता; पण त्यांची कामगिरी या स्पर्धेत निराशाजनक झाली.
आशियाई क्रीडा स्पर्धा भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धांत पहिल्या पाचांत आणि शक्यतोवर पहिल्या तिघांत येण्याची आपली महत्त्वाकांक्षा असायला हवी. चीन, द. कोरिया आणि जपान यांची उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून आपण क्रीडा क्षेत्राचा विकास घडवून आणायला हवा. द. कोरियामध्ये या स्पर्धा तिसर्यांदा होत आहेत. यापूर्वी सेऊल आणि नंतर बुसानला या स्पर्धा झालेल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी ज्या सोयीसवलती निर्माण झालेल्या आहेत, त्या चांगल्या स्थितीत राखून त्यांचा उपयोग करून घेत त्या देशाने आपले खेळाडू तयार केलेले आहेत आणि बलाढय़ चीनबरोबर टक्कर देत त्यांनी ६५ सुवर्णपदकांची कमाई केली आहे आणि हा आकडा ते आणखी पुढे नक्की रेटून नेऊ शकतील. चीननेही प्रत्येक स्पर्धेचा उपयोग आपल्याकडच्या सोयीसवलती वाढवून त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी केलेला आहे. पण सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे त्या देशांनी उत्कृष्ट प्रशिक्षक निर्माण करण्याकडे सातत्याने लक्ष पुरवले आहे. तेच जपानच्या बाबतीतही खरे आहे.
आपल्याकडे उत्कृष्ट गुणवत्ता असताना क्रीडा क्षेत्राची अशी दुरवस्था का आहे, याची शासनाने एक तज्ज्ञांचा आयोग नेमून चौकशी करायला हवी. आणि तशीच क्रीडा क्षेत्रावर देखरेख करण्यासाठी आणि वेळोवेळी शासनाला सल्ला देण्यासाठीही एक तज्ज्ञ समिती हवी. क्रीडा संघटना चालवण्यासाठीही व्यावसायिक तज्ज्ञ मंडळींची गरज आहे. आपल्या नेमबाजांना संघटनेच्या खराब व्यवस्थेचा चांगलाच फटका बसला. त्यांची पिस्तुले आणि बंदुका वेळेवर त्यांच्या हातात पोहोचल्याच नाहीत आणि याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. जितू राय सुवर्णपदक मिळवून भारतात परतला तेव्हा त्याचे स्वागत करावे, असे संघटनेला आणि शासनालाही वाटले नाही. वास्तविक त्याचा मोठा सत्कार करण्याने संघटनेला खेळाचा प्रचार करण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरले असते; पण त्याची कोणाला पर्वा दिसत नाही. अशा वागणुकीमुळे नवी गुणवत्ता खेळाकडे आकर्षित कशी होणार? सरितादेवी या भारतीय बॉक्सिंग खेळाडूचे पदक पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे हुकले. ताबडतोब अपील करण्याची काळजी संघटनेने घेतली नाही. आणि भावनेच्या भरात त्या खेळाडूने केलेल्या कृतीमुळे तिची कारकीर्दच आता धोक्यात आली आहे. असे बोलले जाते, की या संघटनेत मणिपूरच्या खेळाडूंना मुद्दाम आकसाने वागवले जाते.
क्रीडा क्षेत्राच्या या दुरवस्थेबाबत क्रीडा संघटना आणि शासन एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे व्हायला बघतात. उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पिढय़ांवर पिढय़ा बरबाद होत आहेत आणि सर्वसामान्य जनता खराब कामगिरीबद्दल त्यांनाच दोष देत राहते. निवडक खेळात ठिकठिकाणी सोयीसुविधा निर्माण व्हायला हव्यात. तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध व्हायला हवे म्हणजे खेळाडूंचा दर्जा झपाट्याने वाढत जाईल. असे हजारोंनी खेळाडू तयार होतील, तेव्हा त्यातले सर्वोत्तम जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सुवर्णपदके मिळवायला लागतील. त्यासाठी योग्य धोरण आखून ते काळजीपूर्वक अमलात आणायला हवे. क्रीडा संघटना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांचा आधार घेऊन सरकारला आपल्या कामात ढवळाढवळ करू देत नाहीत आणि शासनाने सगळ्या उपक्रमांना पैसा पुरवावा, अशी अपेक्षा ठेवतात. गुणवान भारतीय खेळाडूंना मात्र कोणीच वाली उरलेला नाही. अशीच जर परिस्थिती राहणार असेल तर मोठय़ा स्पर्धांंमध्ये जाऊन उगीच आपला अपमान कशाला करून घ्यायचा? पण संबंधितांना याची लाज वाटेनाशी झाली असावी किंवा याची लाज वाटायला हवी हेच कळेनासे झाले असावे, असे वाटते.
गोल्डन पंच आणि
सुपर शूटआऊट
एका बाजूला मेरी कोमने सुवर्णपदक जिंकून सर्वांची मान अभिमानाने उंचावली तर आशियाई क्रीडा स्पर्धेचे भारताच्या हॉकी संघानं तब्बल १६ वर्षांंनंतर सुवर्णपदकावर नाव कोरण्याची किमया केली आहे. पाकिस्तानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा धुव्वा उडवून भारताच्या शिलेदारांनी हा पराक्रम रचला आणि दिवाळीपूर्वीच आनंदोत्सवाचं कारण मिळवून दिलंय.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)