पर्वणी

By Admin | Updated: July 5, 2015 15:31 IST2015-07-05T15:31:55+5:302015-07-05T15:31:55+5:30

नाशिकच्या कुंभमेळ्याची धर्मध्वजा येत्या आठवडाभरात रोवली जाईल आणि साधुग्राम गजबजू लागेल. कुठूनकुठून आखाडे-खालसे आणि माणसं येतील. संसार सोडून अध्यात्माला लागलेले, संसारापासून पळत सुटलेले आणि तरीही अडकलेले. अशाच माणसांच्या जगात भ्रमंती करणारी ही लेखमाला आजच्या अंकापासून!

The mountains | पर्वणी

पर्वणी

>पर्वणी-एक बारा वर्षानंतर : अध्यात्म आणि आसक्तीच्या जगातली भ्रमंती
 
- मेघना ढोके
 
जुन्या नाशकात एक नाग चौक आहे.
बारा वर्षापूर्वीही मी हाच चौक शोधत, खाकी आखाडा नावाचं साधूंचं एक ‘स्थान’ हुडकत फिरले होते. तेव्हा तर साधूंचं जग, आखाडे, खालसे असं काहीच माहिती नव्हतं. आता सिंहस्थ सुरू व्हायला पंधरा दिवस उरलेले असताना, पुन्हा त्या जगात त्याच उत्सुकतेनं जायचं ठरवलं तर बारा वर्षापूर्वी केलेल्या सिंहस्थाच्या रिपोर्टिगचं गाठोडं पाठीवर होतं. 
पुन्हा एकदा अशाच एका चकित करणा:या, चमकदार आणि उत्सुक वळणावर उभी राहून मी नाशिकनगरीत आता सुरू होणा:या सिंहस्थाकडे पाहतेय. बारा वर्षापूर्वी मी या सिंहस्थ नावाच्या जगातच हरवून गेले होते. त्या आठवणींचा ताळा करून पाहत तेव्हा विचारला होता तोच प्रश्न आजही पुन्हा स्वत:ला विचारत उत्तरं शोधायला निघतेय की, हा सिंहस्थ आहे काय? हे साधू कोण आहेत? या साधू समाजातली माणसं, ती कशी दिसतात? गोदावरीच्या पाण्यात बुटकुळ्या मारून पापं धुऊन घ्यायला येणारी संसारी माणसं, ती कोण? कशी? का येतात इथवर असोशीने.
खरंतर दर बारा वर्षानी गोदाकाठी हा महाकुंभ भरतो. साधूंच्या त्याच रितीभाती, तेच मानपान, साधूंचे जत्थे, त्यांचं गोदास्नान, त्यांच्या आखाडय़ांचे तपोवनात लागलेले मंडप आणि पर्वणीस्नानाला येणारी संसारी माणसांची काही लाखांची गर्दी. हे सारं कुंभ दर कुंभ तेच असतं. लांबून पाहताना सगळं सारखंच दिसू शकतं. पण ते सारखं नसतं याचा पहिला धक्का मला खाकी आखाडय़ात गेल्यावर बसला!
कुंभमेळ्यात देशभरातून साधू नाशकात येतात. नाशिकच्या तपोवन भागात पत्र्याच्या लहानमोठय़ा शेड उभ्या राहतात आणि तात्पुरत्या लहानमोठय़ा निवा:यात मंडपबिंडप टाकून एक ‘साधुग्राम’ उभं राहतं.
या साधुग्राममधे अनेक आखाडय़ांचे साधू येतात.  आखाडा म्हणजे विशिष्ट देवता, पूजाप्रणाली मानणारा साधूंचा गट. आखाडे लहानमोठे, गरीब, श्रीमंत, अतिश्रीमंत, काही ‘दुबळे’ही असतात. तर काही आखाडे राजकीय अर्थाने भलते वजनदारही. काहीतर इतके ‘असरदार’ की, शासनसत्ता त्यांच्यापुढे नमतं घेते.
त्याच आखाडय़ातून देशातल्या चार ठिकाणी भरणा:या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या तुकडय़ा जातात. त्यांना खालसा म्हणतात. प्रत्येक आखाडय़ाच्या वेगवेगळ्या शहरात राहणा:या प्रातिनिधिक तुकडय़ांनाही खालसा म्हणतात. 
सिंहस्थाचा एक न दिसणारा चेहरा असतो. ज्यात साधू झालेली माणसं भेटतात, संसाराच्या रामरगाडय़ात गणलेली संसारी माणसं येतात. आणि भेटतात अशा काही कथा ज्या एरवी आपल्या अवतीभोवती असून दिसत नाहीत.
अशीच एक गोष्ट नाग चौकातल्या त्या खाकी आखाडय़ात भेटली. 
बारा वर्षापूर्वी गल्लीबोळ पिंजल्यावर मी एका मठवजा मंदिरात शिरले होते. दार सताड उघडं. मी आत गेले तर डोळ्यात बोट गेलं तरी कळू नये इतकं मिच्चं गुडूप. बायकांच्या बांगडय़ांचा, खिदळण्याचा आवाज येत होता. पोरं रडत होती. भीतीच वाटली. नशीब काही मिन्टात लाईट आले आणि प्रकाशात एकदम वर पाहिलं तर वरती छत नव्हतंच. मीच अंगणात उभी असल्यासारखी. ते अंगण चारी बाजूंनी बांधलेलं. दोन मजले चाळीसारखे. खेटून खेटून वतरुळाकार बांधलेल्या खोल्या. काही बायका वरती कठडय़ाला रेलून पत्रकार मुलगी पाहत होत्या. हसत होत्या.
तेवढय़ात भगव्या कफनीतले एक बाबाजी आले. त्यांचं नाव नरसिंहदास महाराज. हे नाशकातल्या त्या अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय आखाडय़ाचे स्थानधारी महाराज. स्थानधारी म्हणजे आखाडय़ाच्या या शाखेचे प्रमुख. आखाडय़ांच्या अनेक शाखा देशभर असतात आणि बॅँकेच्या शाखा असाव्यात तसे तिथले शाखाप्रमुख  म्हणजे हे स्थानधारी महंत तिथं राहतात. आल्या-गेल्या साधूंच्या राहण्याजेवण्याची सोय करतात. तसा हा आखाडा. इथं सत्यनारायणाचं मंदिर आहे. आता प्रश्न असा होता की, या अंधा:या आखाडय़ात या संसारी बायका कशा?
आखाडय़ामधल्या काही खोल्या बाबाजींनी भाडय़ानं दिल्या होत्या. त्या भाडय़ावर त्यांचा आणि आखाडय़ाचा उदरनिर्वाह चालतो.
हा सारा तेव्हाचा अनुभव हाताशी ठेवून मी पुन्हा नाग चौकातल्या त्या आखाडय़ात पोहचले. त्यावेळचे थकलेले बाबाजी भेटतील की नाही माहिती नव्हतं. पण आखाडय़ाच्या वाटेनं निघाले तर वाटेत भेटलं बदललेलं नाशिक. एक साधा दोनपदरी हायवे होता तिथे केवढा मोठ्ठा उड्डाणपूल झालाय. गोदाकाठावर सुशोभिकरण झालंय. नाशिक स्मार्ट सिटी होणार असे गाजेवाजे होताहेत. आणि शहरीकरणाच्या वेगात वाढणा:या बकाल वस्त्याही जागजागी उभ्या राहताहेत. शांत-आटोपशीर नाशिक मोठं होत सुटलंय!
खाकी आखाडय़ात गेले तर जरा जास्तच थकलेले नरसिंहदास महाराज भेटले! त्यांना पूर्वीची ओळखदेख सांगितली तर त्यांना काही आठवत नव्हतं. म्हणाले, ब:याच गोष्टी विसरायला होतात आता. त्यांच्याशी बोलता बोलता अवतीभोवती पाहिलं तर बदललं काहीच नव्हतं. आखाडा तसाच, काळाकुट्टं अंधारलेला. साधूबाबा एकटेच. भाडेकरूंची धावपळ, लेकरांची लगबग सगळं जैसे थेच होतं. उलट थोडं जास्त काळवंडलेलं, रया गेलेलं वाटलं! 
बाबाजींना विचारलं की, आता सिंहस्थ जवळ आलाय, तयारी जोरात का?
तसे ते वैतागले. म्हणाले, कसली तयारी? पैसा तर पाहिजे हाताशी? उत्पन्न काही नाही. भाडेकरू जागा बळकावताहेत काही, कुणीकुणी भाडंच देत नाहीत. आखाडय़ाची घरपट्टी-पाणीपट्टी भरायची तर पैसे नाहीत. कुठून आणू पैशाचे सोंग?
म्हटलं, पण तुमचे मुख्य स्थानवाले बडे महंत तुमचे इथले स्थानिक प्रश्न सोडवत नाहीत का?
तर बाबाजी म्हणाले, ते कशाला सोडवतील? त्यांना काय पडलंय? उनकी दुनियाही अलग है!
लोकल लेव्हलच्या साधूंचे प्रश्न निराळे, उच्चपदस्थ साधूंची सत्ताकेंद्रे वेगळी असं काहीतरी भलतंच होतं याही जगात! 
ओडिशातले हे बाबाजी. त्यांना आता आठवतही नाही की ते नाशकात कसे आले, हा नाशकातला कितवा सिंहस्थ हेदेखील त्यांना आठवत नाही. आणि ते सांगत नाहीत, पण त्यांच्या आखाडय़ाची आर्थिक स्थिती यथातथाच. हे बाबाजी स्वत:पुरतं एकदा शिजवून दोनदा खातात. आता वयानं त्रस द्यायला सुरुवात केलीये हे जाणवतं. त्यांचा दिलखुलास स्वभाव माहिती होता म्हणून विचारलं की, बाबाजी कभी बिमार हो आप, कभी अकेले तो कभी उदास नहीं लगता?
ते हसले. प्रश्नातली खोच कळल्यासारखे. मग त्या सत्यनारायणाकडे बोट दाखवून म्हणाले, ‘ये है ना, इनका साथ है.. बस इनका ही है!’
त्या बाबाजींशी बोलताना सारखं जाणवत होतं की, संन्यास घेतला तरी संसारी प्रश्न संपत नाहीत. आखाडय़ाचा संसार, स्वयंपाक-भांडीकुंडी आणि पैशाअडक्याचे व्याप हे सारं काही सुटत नाही. 
 सिंहस्थ पर्वणीला या बाबाजींच्या आखाडय़ाचा शाहीस्नानाचा पहिला मान असतो. तसं ताम्रपत्रच आहे त्यांच्याकडे. बाबाजींनी ते मनापासून जपून ठेवलंय. पण त्या पर्वण्यांनंतर?
हा असा अंधारा आखाडाच वाटय़ाला येतो. त्यांच्या आणि तिथं राहणा:या संसारी भाडेकरूंच्याही! एका भाडेकरणीशी गप्पा मारल्या. ती म्हणाली, माझा हा इथला पहिलाच सिंहस्थ, पण त्याने आपल्या मागचे व्याप काही कमी थोडीच होणारेत. येतील नी जातील साधू, आपल्याला काय?
खाकी आखाडय़ातले साधू आणि संसारी असे आपापले प्रश्न घेऊन भेटतात. आर्थिक चणचणीचे आणि वैतागवाण्या दैनंदिन व्यापाचेही!
अर्थात सारेच आखाडे असे ‘गरीब’ नसतात. काही श्रीमंत असतात, काहीं महंतधारींनी ग्लॅमर कमावलेलं असतं आणि काही पॉवरबाजही असतात!
समाजात जे चित्र दिसतं ते या साधूसमाजातही दिसतंच. कुंभमेळा हा फक्त पर्वणी-शाहीस्नान-साधुग्राम एवढय़ापुरताच मर्यादित नसतो. मीडियात दिसणा:या हटयोगी साधूंच्या चमत्कार आणि भलभलते हट-आसनं एवढाच उथळही नसतो.
त्याचा चेहरा वेगळाच असतो.
बारा वर्षापूर्वी झालेला सिंहस्थ कव्हर करताना तो वेगळा दिसला होता आणि आता बारा वर्षानंतर?
- तेच तर शोधत जाण्याचा हा प्रवास आहे.
साधूंच्या जगातली माणसं आणि कुंभातली माणसं पाहणं, त्यांना भेटणं, इव्हेण्टी सेलिब्रेशन आणि धार्मिक अवडंबराच्या पलीकडे जाणं, कुंभमेळ्यावर चढलेला वर्ख खरवडून आत डोकावून पाहत ती दुनिया जशी आहे तशी पाहण्याचा प्रयत्न करणं.
सिंहस्थ सुरू होत असताना सुरू केलेला हा प्रवास कुठे घेऊन जाईल.? यंदा नव्यानं काय हाती लागेल? लागेल की नाही? - माहिती नाही.
पण एक नक्की, ‘कुंभातली माणसं’ नक्की भेटतील. दिसतील. फक्त ती जशी आहेत तशी ‘पाहण्याची’ ताकद आणि हिंमत मात्र ठेवावी लागेल..
 
 
( लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
 
 
meghana.dhoke@lokmat.com

Web Title: The mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.