लाइट.. साउण्ड..  कॅमेरा.. कोरोना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:02 AM2020-05-17T06:02:00+5:302020-05-17T06:05:06+5:30

टीव्ही मालिका, चित्रपटांचं शूटिंग  ही तशी एकदम डायनॅमिक गोष्ट.  कधीतरी शूटिंग बघायला येणार्‍या  हौशी मंडळींना बर्‍याचदा वाटतं, किती निवांत आहेत, ही मंडळी, पण प्रत्येक कोपर्‍यात काही ना काही  चालू असतं. टीव्हीच्या सेटवर तर जास्तच. कारण तिथे प्रत्येक मिनिटाचा  हिशेब बांधलेला असतो.  वस्तूंचं भाडं डोक्यावर असतं. टंगळमंगळ करून चालतच नाही. निवांतपणाचीही काही सोय नाही.  कोरोनामुळे आता सगळे घरी बसले आहेत;  पण शूटिंगचा हा चस्का संपणारा नाही.

Light.. Sound.. Camera.. Corona... | लाइट.. साउण्ड..  कॅमेरा.. कोरोना...

लाइट.. साउण्ड..  कॅमेरा.. कोरोना...

Next
ठळक मुद्देशुटिंगचं काम प्रत्यक्ष सुरू झाल्यावरच त्यातल्या अडचणी ध्यानात येतील आणि मग त्यावर उपायही शोधत, सापडवत जावं लागेल.

- अपर्णा पाडगावकर
कोणत्याही शूटिंगच्या सेटवर स्पॉटबॉय नामक एक पदाधिकारी असतो. सेटवर पडेल ते काम करणं आणि लोकांच्या चहापाण्याची व्यवस्था बघणं, हे याच्या कामाचे वर्णन म्हणता येईल. या वर्णनात न बसणारी एक गोष्ट हा स्पॉटबॉय सतत करत असतो, ते म्हणजे, कुणीही महत्त्वाचा माणूस - नट, डिरेक्टर, निर्माता, लेखक. सेटवर जरा जरी उभे राहिलेले दिसले की लगेच जाऊन त्यांना खुच्र्या देणं.. वर प्रेमाने बैठो ना, खडे क्यौं हो? असं म्हणत चाय, कॉफी?. विचारून निघून जाणार. हा प्राणी स्वत: मात्न दिवसभर पळापळ करत असतो. आपल्याला बसायचा कंटाळा आला असला तरी त्यांचा मान म्हणून बसावंच लागतं. आज कोरोनामुळे जवळपास दोन महिने घरात बसून आहोत.
कुणी तरी ‘शॉट रेडी आहे आणि तुम्ही फिल्डमध्ये आहात हो’, असं ओरडून सांगितलेलं ऐकावंसं वाटतंय..
शूटिंग ही एरवी एकदम डायनॅमिक गोष्ट असते. ज्यांचं तिथे काम नाही, त्यांना ते वरवर बघून कळत नाही. शूटिंग बघायला येणार्‍या हौशी मंडळींना वाटत राहतं की किती निवांत आहेत. पण प्रत्येक कोपर्‍यात काही ना काही चालू असतंच. टीव्हीच्या सेटवर तर अधिकच, कारण तिथे प्रत्येक मिनिटाचा हिशेब बांधलेला असतो. टंगळमंगळ करून चालतच नाही तिथे. निवांतपणाची सवयच नाही कोणाला. आता कोरोनाच्या धास्तीने सगळे घरी बसले आहेत; पण निवांत कोणीच असणार नाहीये.
शूटिंग म्हणजे हातावरचंच पोट
इथे माणसं ‘पर डे’च्या हिशेबाने काम करतात. म्हणजे ज्या दिवशी काम त्या दिवशीचा रोजगार मिळणार. यात सगळे सारखे - कलाकार, कॅमेरामन, दिग्दर्शक (फिल्मचे वगळता) आणि बाकीचे तंत्नज्ञ, सहाय्यक आणि कॅमेरा अटेंडंट आणि स्पॉटबॉयसारखे मदतनीस. ऑडियो रेकॉर्डर आणि कॅमेर्‍यासारखी उपकरणंसुद्धा दिवसाच्या भाड्यावर येतात. क्वचित महिन्याच्या बोलीवर करार होतोही; पण तिथेही प्रामुख्याने किती दिवस वापरले जाणार, हाच हिशेब. रिकामं राहणं कुणालाच परवडत नाही, माणसांनाही आणि उपकरणांनाही. शूटिंगचा दिवस म्हणजे फक्त रोजगार नव्हे, सकाळ-संध्याकाळचा नास्ता, दुपारचं जेवण तिथे सुटतं. हातावर पोट असणार्‍यांसाठी ही मोठीच जमेची गोष्ट. मुंबईत 18 मार्चला आता 31 तारखेपर्यंत शूटिंग होणार नाही, हे लक्षात आलं. पुढे दोन दिवस पोस्ट प्रॉडक्शन स्टुडियोज म्हणजे एडिटिंग व अन्य तांत्रिक प्रक्रि या चालत राहिल्या. डेली सोप्सच्या कारभारात अशी सलग सुट्टी मिळणं म्हणजे पर्वणीच.
बहुतेक जणांनी साधारणत: 22 - 23 मार्चपर्यंतचे एपिसोड्स चॅनेलमध्ये पोहोचवले होते. तोवर आठवड्याभराची सुट्टीची गंमत वाटत होती, कारण जिल्हाबंदी वगैरे लागू होईल, इतकं  वाटलंही नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्राभरातून आलेले कलाकार तंत्नज्ञ आपापल्या गावी निघून गेले. त्यानंतर 24 मार्चला लागू झालेली टाळेबंदी इतकी पुढे जाईल, हे तेव्हा कुणाच्याच ध्यानी आलं नव्हतं. दोन महिने काम बंद म्हणजे दोन महिन्याचा रोजगार बंद. सगळ्यांचाच. शूटिंग व एडिटिंगनंतर एपिसोड जेव्हा चॅनलवर दाखवला जातो, तेव्हा त्यात ज्या जाहिराती दाखवल्या जातात, ते चॅनलचं उत्पन्न आणि त्यातूनच निर्मात्याला पैसे मिळतात आणि तेच पैसे पुढे काम करणार्‍या सर्वांना मिळतात.
आता टीव्ही चॅनल्सची प्रेक्षकसंख्या इतकी कमी झाली आहे की, जाहिरातींचं उत्पन्न जवळपास शून्यावर आलं आहे. मुळात जाहिरातदार जाहिरात करतो ते आपलं उत्पादन लोकांनी विकत घ्यावं म्हणून. पण जर दुकानं बंद असताना कोण काय आणि कुठून विकत घेणार आणि मग जाहिराती तरी का कराव्यात? सध्या फक्त जंतुनाशक साबणांच्या जाहिराती भरमसाठ दिसतायत, कारण तेच एक उत्पादन लोकांना या काळात आवश्यकही आहे आणि तेच मिळू शकतं आहे. पण मुळात टीव्ही बघणार्‍यांचीच संख्या प्रचंड घटली असल्याने त्या जाहिरातींच्या उत्पन्नालाही काही फार अर्थ उरलेला नाही. त्यामुळे निर्मात्यांच्या पदरातही 22 मार्चपर्यंतचंच उत्पन्न असणार आहे.
‘आयएफटीपीसी अँण्ड प्रोड्युसर्स गिल्ड’ या निर्माता संघटनांनी कामगारांची काळजी घेण्याचे पूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यानुसार मार्चमधील पूर्ण पगार दिला गेला आहे. आणि एप्रिलच्या वेतनाचाही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत. (चौकट पाहा) पण मुख्य प्रश्न पुढील शूटिंग सुरू कधी होणार, हाच आहे.
मराठी मालिकांच्या सेटवर कोणत्याही वेळी साधारणत: सत्तर ते ऐंशी लोक काम करत असतात. हिंदी मालिकांसाठी हा आकडा 120 ते 130 असू शकतो. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात शूटिंग होतं, म्हणजे जिथे कॅमेरा असतो आणि कलाकार अभिनय करतात, त्या स्पॉटवर (एका सेटवर असे चार ते पाच स्पॉट्स असतात) यातले एकतृतीयांश लोक दाटीवाटीने उभे असतात. अन्य लोक पुढील सीनची तयार करत असतात. यापेक्षा कमी लोकांमध्ये सीन शूट होऊ शकत नाही. आणि यात मॉब सीन्स गृहीत धरलेले नाहीत. गर्दीचा सीन असेल तर ही संख्या अधिक दहा-पंधरापासून पुढे कितीही वाढू शकते. कोरोनाच्या भीतीमुळे यापुढे इतक्या लोकांनी एकत्न येऊन काम करण्यावर बंधनं येणार आहेत. चित्नीकरण हे एकमेकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होत नाही. साथी हाथ बढाना, ही उक्ती इथे तंतोतंत लागू पडते. एक कॅमेरा हाताळण्यासाठी कॅमेरामन अधिक तीन इतके लोक असतात. लायटिंग विभागात सहा माणसं काम करतात. काहीही पडलं झडलं तर मी का तू? असा प्रश्न न करता जवळ असेल तो धावत जातो. कलाकारांसाठी तर मेकअप करणारे, कॉस्च्युम्स घालणारे आणि माइक लावणारे असे तीन लोक हाताला हात लावल्याशिवाय कामच करू शकत नाहीत. सेटवर ठेवलेल्या वस्तू (प्रॉपर्टी) देणारा हा आणखीन एक.
प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक लाइट वापरला जातोच असं नाही. बाजूला ठेवलेला लाइट उचलण्यापूर्वी आणि उचलल्यानंतर सहा माणसांनी प्रत्येक वेळी सॅनिटायझर लावून हात धुणं अशक्य आहे. चहा पिण्याचा सीन असेल तर चहा बनवणारा वेगळा, तो कपात आणून देणारा वेगळा, तो कसा कधी प्यायचा, ते सांगणारा असिस्टंट डिरेक्टर वेगळा. शिवाय, त्यावर प्रकाश नीट पडावा, यासाठी तो योग्य कोनात ठेवणारा असिस्टंट कॅमेरामन अजून वेगळा. इतक्या लोकांमध्ये एखादा असिम्टोमॅटिक पॉझिटिव्ह असेल तर कसं कळणार? आणि दिव्याच्या उष्णतेत आणि गर्दीत घामामुळे मास्क, फेसकव्हर आणि ग्लोव्हज घालून काम करणं हे त्नासदायक आहे.
तरीही, शो मस्ट गो ऑन.
पोस्ट कोरोना जग वेगळं असणार आहे. आणि यात प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंगच्या अपरिहार्यतेमुळे कामगार कपात अपेक्षित आहे.
कोरोनाचा धोका टाळायचा असेल आणि त्यातून बाहेर येऊन काम सुरू ठेवायचं असेल तर माणसं कमी करावी लागतील. हे माझं काम नाही, असं म्हणून चालणार नाही. कदाचित दोन माणसांचं काम एकाला करावं लागेल. तरच माणसांच्या संख्येवर नियंत्नण ठेवता येईल. आणि शूटिंग भले, थोड्या उशिरानेपण सुरू करता येईल.
मुळात जिल्हाबंदी उठल्याशिवाय काम सुरूच करता येणार नाही. प्रामुख्याने शूटिंग होते ते मुंबई, ठाणे आणि वसई - नायगाव परिसरात. पण जी कलाकार व तंत्नज्ञ मंडळी आपापल्या गावात गेली आहेत आणि या क्षणी अडकल्यासारखी झाली आहेत, जोवर त्यांना मुंबईत पोहोचण्याची परवानगी मिळत नाही, तोवर काम सुरूच करता येणार नाही.
शूटिंग करणं हा एक चस्का आहे. इथे काम करणारी माणसं अन्यत्न सहसा फार रमत नाहीत. ती चुकतमाकत, शिव्या खात काम करत इथेच शिकतात. त्यामुळे अनेकांना ते करत असलेल्या कामाव्यतिरिक्त अन्य काही कौशल्य हाती नसतं. इथे सेटिंग करणारा बाहेर इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करू शकत नाही. र्मयादित कामगारसंख्येमुळे जे लोक कमी होतील, त्यांना अन्य काय काम करता येणार आहे, हा प्रश्न आहेच. बजेटचाही प्रश्न फार कौशल्याने सोडवावा लागणार आहे. जेव्हा लोक आनंदात आणि कोणत्याही भीतीपासून मुक्त वातावरणात वावरत असतात, तेव्हा ते मोकळेपणाने खरेदी करतात. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. सध्याच्या भीतीच्या वातावरणात केवळ गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकडेच लोकांचा कल राहाणार असल्याने पर्यटन, ऑटोमोबाइल्स, ज्वेलरी अशा वस्तूंचा उठाव कमी होईल, अशी शक्यता आहे. 
वेतन कपात सर्वच क्षेत्नात दिसू लागली आहे. त्याचाही खरेदीवर परिणाम होणारच. त्यामुळे जाहिरातींचं टीव्हीला मिळणारं उत्पन्न कमी झालं तर मालिकांचं बजेट कमी होण्याची दाट शक्यता आहे. ते झाल्यास जितक्या लोकांना काम मिळेल, तितक्या लोकांनाही कदाचित आधीपेक्षा कमी वेतनात काम करावं लागेल. 
कोरोनाची लस सापडेपर्यंत या परिस्थितीवर तोडगा मिळणं थोडंसं कठीण वाटतं आहे. पण आपल्या सिनेमा-टीव्ही आणि नाटक व्यवसायाने नेहमीच संकटांवर मात करतच आजवर टिकाव धरला आहे. देशातल्या अन्य कोणत्याही राज्यापेक्षा इथे आपण अधिक व्यावसायिकतेने काम करतो. प्रत्यक्ष काम करायला लागलं की मगच त्यातल्या अडचणी ध्यानात येतील आणि मग त्यावर उपायही शोधत सापडवत जावं लागेल. आपण ते नक्कीच करू. शेवटी, आपण विष्णुदास भावे आणि दादासाहेब फाळके यांचे वारस आहोत, हे सिद्ध करण्याची हीच तर वेळ आहे.

कामाविना असलेल्या
कामगारांना मदत!

‘आयएफटीपीसी’ म्हणजे इंडियन फिल्म अँण्ड टीव्ही प्रोड्युसर्स गिल्ड आणि ‘प्रोड्युसर्स गिल्ड’ या दोन निर्मात्यांच्या संघटनांनी इंडस्ट्रीत काम करणारे, हातावर पोट असलेल्या असंख्य कामगारांपुढे उभे ठाकलेलं संकट लक्षात घेऊन आपल्या इंडस्ट्रीतील कामगारांसाठी निधी उभा करण्याचे ठरविलं. इंडस्ट्रीतील कामगारांपुढील संकट लक्षात घेऊन निर्मात्यांच्या या दोन संघटनांनी 18 मार्च रोजी केलेल्या आवाहनाला बहुतेक सभासद निर्मात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यातून ‘मोशन पिक्चर्स अँण्ड टीव्ही प्रोड्युसर्स वेल्फेअर ट्रस्ट’ या विश्वस्त निधीमध्ये दीड कोटी रुपये जमा झाले. हा धनादेश 7 एप्रिल रोजी ‘एफडब्ल्यूआयसीइ’ या विविध क्राफ्टच्या कामगार संघटनांच्या फेडरेशनकडे सुपुर्द करण्यात आला.
या बरोबरच ‘आयएफटीपीसी’ने सर्व वाहिन्यांशी संपर्क साधून एप्रिल महिना कामाशिवाय जाणार असल्याने कामगारांना मदत करण्यासंबंधी वाटाघाटी केल्या. त्यानुसार प्रत्येक कार्यक्रमाच्या कामगारांना एप्रिल महिन्यात साधारणत: त्यांना किती पगार मिळाला असता, तितके पैसे  दिले जातील. मार्चमधील कामाचा पगार बहुतांश निर्मात्यांनी एप्रिलमध्ये दिलाही आहे.
दरमहा ज्या कामगारांची 30 हजारांहून कमी मिळकत आहे, अशा कामगारांचा प्रामुख्याने विचार व्हावा, असेही सुचविण्यात आले आहे. जे कार्यक्र म गेल्या तीन महिन्यात बंद झाले व त्यातील जे कामगार कामाविना आहेत, अशांचा व चित्नपट व्यवसायातील वेतनाविना राहिलेल्यांचा विचार व्हावा, असेही कामगारांच्या या फेडरेशनला सुचविण्यात आले आहे. ही मदत गोळा करून निर्माते थांबलेले नाहीत; अजूनही ती गोळा केली जाते आहे व मदतीविना राहून जातील, अशा काही कामगारांची नावे ‘आयएफटीपीसी’कडे येत आहेत. या अशा कामगारांना यातून कशी व किती मदत करावी, यावर विचार सुरू आहे. 
 
मराठी चित्नपटसृष्टीला 
हे ओझं पेलवेल?

मराठी चित्नपट व्यवसाय हा तर तसा आतबट्टय़ाचाच व्यवसाय. मुळातलेच प्रश्न इतके बिकट आणि त्यात हे कोरोनाचे संकट. सिनेमागृहं चालू केव्हा होतील, याचा याक्षणी काहीच अंदाज बांधता येत नाही. कारण, शेकडो माणसं एकत्न जमण्यावर बंधनं येतील. कदाचित एकूण क्षमतेच्या निम्म्याच जागा भरून सिनेमे चालवता येतील. पण मग खर्च भरून काढण्यासाठी तिकीटदर वाढवावे लागतील. ते ओझं मराठी चित्नपटसृष्टीला पेलवेल का? या प्रश्नाचं उत्तर दसरा -दिवाळीनंतरच आपल्याला मिळू शकेल. जनजीवन सुरळीत होण्यासाठी तितका कालावधी द्यावाच लागेल. कारण, मनोरंजनाचं स्थान प्राधान्यक्रमात शेवटचंच असणार आहे. 
जी गोष्ट सिनेमाची, तीच नाटकांची. त्यात यंदा परदेशवारी नक्कीच हुकणार आहे. साधारणत: एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत दौरे होत असतात. त्यानंतर युरोपात हिवाळा सुरू होतो. त्यावेळी तिथं शोज करायला जाण्यावर र्मयादा येतात. मुळात, आंतरराष्ट्रीय प्रवास कधी सुरू होऊ शकणार आहे, त्याचा नेमका अंदाज या क्षणी बांधता येणं कठीण आहे. त्यामुळेही मोठं नुकसान नाटक व्यवसायाला सोसावं लागणार आहे.

aparna.padgaonkar@gmail.com
(क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, दशमी स्टुडिओज, मुंबई) 
—---------—---------—---------—---------

Web Title: Light.. Sound.. Camera.. Corona...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.