शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नुसते शब्द कसे टिकतील? - ते हरवणारच!

By admin | Updated: June 13, 2015 14:05 IST

हरवत जाणारे शब्द टिकवण्यासाठी ती संस्कृतीही टिकवली पाहिजे, पण ते शक्य आहे का? आपण आज मोटेनं पाणी काढणार आहोत का? जात्यावर दळणार आहोत का? बैलगाडीतून प्रवास करणार आहोत का? याचं व्यावहारिक उत्तर ‘नाही’ असंच येतं. - मग त्यासोबतचे शब्द तरी कसे व्यवहारात टिकतील?

- डॉ. तारा भवाळकर
 
बदलणं हा तर जगण्याचा धर्म. शब्दातल्या, भाषेतल्या बदलांची प्रक्रिया अखंड चालत आलीय. अगदी प्राचीन काळापासून. संतसाहित्यातले अनेक शब्द आता आपल्याला माहीत नाहीत. तेव्हाच्या संस्कृतीतले, जगण्यातले ते शब्द आता भौतिक संस्कृतीच्या बदलामुळं मागं पडलेत. जगणं बदलल्यामुळं त्या जगण्यातले शब्दही बदलले. 
आपलं एकूणच जगणं बदललं. पाश्चिमात्यांचं अनुकरण करणं वाढलं. त्यामुळं भाषेतल्या बदलांचीही देवघेव वाढली. जागतिक संस्कृतीतल्या आदानप्रदानामुळं शब्दही आदानप्रदान होत असतात. मराठीत तर प्रादेशिक बदलानुसार शब्द बदलतात. मराठीत शब्दांच्या अनेक छटा दिसतात. एकाच अर्थाचा शब्द प्रदेशानुसार बदललेला दिसतो. सीमाभागात ही सरमिसळ अधिक जाणवते. जेव्हा सांस्कृतिक आदानप्रदान होतं, तेव्हा भाषेचंही होतंच. लग्नसमारंभातली ‘मेहंदी’ ही संकल्पना आपल्याकडं नव्हतीच. आपल्याकडं होती ती ‘हळद’. मात्र उत्तरेतून ‘मेहंदी’ हा प्रकार आला आणि आपल्यातलाच झाला. सांस्कृतिक बदलामुळं लग्नातल्या मुहूर्तमेढ, रूखवत, मांडव परतवणी, आजेचीर (आजीला देण्यात येणारी साडी-चोळी), पोट झाकणं (वधूच्या आईस्ची साडी-चोळी), धारेचा आहेर (चुलत्याने आणलेल्या कळशीतून वधुवराच्या पायावर पाणी सोडल्यानंतर द्यायचा आहेर) या संकल्पनाही हरवत चालल्या आहेत. हरवत चाललेले शब्द ज्या संस्कृतीतून आले, ती संस्कृतीच नाहीशी होऊ लागल्यानं हे होणं स्वाभाविकच म्हणा!
 केवळ शेतीसंस्कृती आणि गावगाडय़ातलेच नव्हे तर शहरी संस्कृतीतलेही शब्द बदलले. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रतच बदल झाल्यानं भाषिक बदल होणं, हे ओघानंच आलं! डिपार्टमेंटल स्टोअर्समुळं आठवडी बाजार मागं पडले. परिणामी त्या बाजाराशी संबंधित शब्द हरवले. बैठकीच्या खोलीचा ‘हॉल’ झाला. माहेरवाशिणीचा प्रवास बदलला. ती बैलगाडीएवजी एकटी मोटारीनं जाऊ लागली. मग मुराळी, बुत्ती हे शब्द कसे राहतील? 
अलीकडं हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव वाढल्यानं त्या दोन्ही भाषेतल्या शब्दांना आपण जवळ केलं. त्यामुळं व्याकरण आणि वाक्यरचनाही बदलू लागली आहे. या काळात मातृभाषेत भाषांतरित केलेले शब्द वापरण्याचा प्रयत्नही झाला. उदाहरणार्थ : भ्रमणध्वनी (मोबाईल), स्थिरभाष (लॅन्डलाईन), कृष्णधवल (ब्लॅकव्हाईट), धनादेश (चेक), रोखापाल (कॅशिअर).
-  पण रूळत असलेल्या शब्दांपेक्षा मातृभाषेतले, मुद्दाम निर्माण केलेले शब्द अवघड असल्याचं दिसून आलं. या भाषिक गमतीजमती आहेत.
 शब्द नुसते टिकत नाहीत, कारण तो संस्कृतीचा भाग असतो. तिच्यातल्या बदलानुसार ते मागं पडतात. आपल्याला भूतकाळाबद्दल उमाळा असतो. नवं स्वीकारताना जुन्याबद्दल आत्मियता वाटते.. आणि इथंच गोंधळ होतो. विशेषत: मध्यमवर्गीयांमध्ये ही द्विधावस्था जास्त आढळते. भावनिक बांधिलकी आणि उपयुक्ततावाद यात ओढाताण होते. 
हरवत जाणारे शब्द टिकवण्यासाठी ती संस्कृतीही टिकवली पाहिजे, पण ते शक्य आहे का? आपण आज मोटेनं पाणी काढणार आहोत का? जात्यावर दळणार आहोत का? बैलगाडीतून प्रवास करणार आहोत का? पाच-पाच दिवसांचे लग्नसमारंभ साजरे करणार आहोत का? याचं व्यावहारिक उत्तर ‘नाही’ असंच येतं. मग त्यासोबतचे शब्द तरी कसे व्यवहारात टिकतील?
शब्द मुद्दाम जतन होत नसतात. मुळात भाषेचा हा प्रवाह टिकवण्यासाठी तिच्याविषयी आस्था असली पाहिजे. शिक्षणाचं माध्यम मराठीऐवजी इंग्रजी होऊ लागलंय. त्यामुळं शिकण्याच्या परिभाषेवरही परिणाम झालाय. माणसाचं जसं जगणं, तसं त्याचे आविष्कार असतात. त्या आविष्काराचा परिणाम होणारच. 
- जगण्यातली सहजता संपल्यानं सहज आलेले शब्दही संपणारच की!