लहान वयातच प्रत्येकाला वाचनाची आवड लागली तर त्याचा निश्चितच दूरगामी फायदा आहे. तो समजावून घेऊन वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला तर वाचन हा विशिष्ट वयोमर्यादेत करण्याचा उपचार न राहता तो जगण्याचा अविभाज्य भाग बनेल. - प्रसाद भडसावळे- लहान वयातच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने २ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक बाल पुस्तक दिन' म्हणून साजरा होतो. हॅन्स ख्रिस्तीयन अँडरसन हे सुप्रसिद्ध डॅनिश कवी व जगातील पहिला परिकथाकार असा लौकिक असलेले व्यक्तिमत्त्व. आपल्या कल्पक व आकर्षक भाषाशैलीतून गोष्टी सांंगत त्यांनी मुलांचे बालविश्व समृद्ध केले. पानाफुलांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या व तसेच राजाराणी व परिकथांच्या जादूमयी गोष्टींनी मुलांचे रंजन करणे हेच त्यांनी आयुष्यभर केले. २ एप्रिल १८०५ रोजी त्यांचा जन्म झाला. पश्चिम युरोप खंडातील डेन्मार्कच्या फुनेन बेटावरील ओडेन्स गावात जन्मलेल्या या परिकथाकारास अभिवादन करण्या हेतू आंतरराष्ट्रीय बोर्ड आॅन बुक्स फॉर यंग पीपल संस्थेने 'आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन' म्हणून त्यांच्या जन्मदिवसाची, २ एप्रिलची निवड केली. यादिवशी मुलांना वाचनास प्रेरित करण्यासाठी जगभरात विविध उपक्रम राबविले जातात. बालसाहित्यात लोककथा, नीतिकथा, पुराणकथा, ऐतिहासिक कथा, साहसकथा, वास्तवकथा, विज्ञानकथा याबरोबरीनेच प्राणिकथा, परिकथा यांची विविध रूपं विकसित झाली. भारतात तर अगदी सुरुवातीच्या काळात पंचतंत्र, हितोपदेश, रामायण-महाभारतातील प्राणिकथा लोकप्रिय ठरल्या. मराठी भाषेतील पहिलं गद्यलेखन करणाºया महानुभावांच्या श्री चक्रधर स्वामींनी एक लहान प्राणिकथा सांगितली. मुद्रणकलेच्या शोधानंतर पुराणातील कथांबरोबरच पाश्चिमात्य साहित्याची भाषांतरंही भारतीय भाषेत होऊ लागली. यात प्रामुख्याने यक्षकथा, चेटकिणींच्या गोष्टी तर परिकथांचा अंतर्भाव होता. सुंदर, छोट्या आकाराची, आकर्षक पोषाखाची, सुंदर पंख असलेली, फुलांवर राहणारी, स्वप्नात प्रवेश करणारी परिकथेतील ही लोभस परी मुलांच्या भावविश्वात थेट प्रवेश करती झाली. सद्गुणी मुलांना मदत करणं, त्यांचं मनोरंजन करणं, तर दुष्ट द्वाड मुलांना भयंकर स्वप्नाची सफर घडवत शिक्षा करणं, ही तिची कामं असत. ही परी अदभुतरम्यतेला खेळकरपणाची साथ देत मुलांच्या भावविश्वात स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करत असे. अशाच परिराणीच्या जादूच्या, चमत्काराच्या व स्वप्नवत अशा छान छान गोष्टी हॅन्स अँडरसन मुलांना सांगत असे. हॅन्स मुळातच अतिशय कल्पक असल्याने त्याच्या गोष्टी इतक्या आकर्षक असत, की मुले त्याच्या जवळून हालत नसत. पानाफुलांच्या, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या गोष्टी तो मुलांना सांगे. गरीब मुलांच्या हालअपेष्टांच्या, राजाराणीच्या व परिराणीच्या गोष्टी तर त्याच्या जिव्हाळ्याच्याच असत. पण सर्व गोष्टींत एक तत्त्व कायम असे. ते म्हणजे वाईट विनाश पावते, चांगले अमर राहते नि सत्याचा विजय होतो, हेच सर्व गोष्टींचे प्रमुख तत्त्व असे. हॅन्सच्या या गोष्टींचा लहानच नाही तर मोठ्यांवरही इतका प्रभाव पडला की, या अदभुत व रम्य परिकथांचे एकामागून एक संग्रह प्रसिद्ध होऊ लागले. गावोगावच्या लोकांत ते भरपूर खपू लागले. कवी, कादंबरीकार, नाटककार वा नट होऊ पाहणारा हॅन्स अचानक परिकथाकार बनला. त्याचे लेखन इतके लोकप्रिय ठरले की, जगभरातल्या जवळपास शंभरहून अधिक भाषांमध्ये या परिकथांचे भाषांतर झाले. मराठीतही सुमती पायगांवकर यांनी अत्यंत सहजसोप्या भाषेत त्यांचा अनुवाद केला आहे. आजही त्या आवडीने वाचल्या जातात. लहान मुलं खरं तर वाचू इच्छितात; परंतु अनेकदा त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकं मिळत नाहीत. आपण मोठ्या व्यक्ती, पालकवर्ग व ग्रंथालयं आपली आवड त्यांच्या निरागस मनावर लादून त्यांचे भावविश्व बधिर करीत असतो. कोणत्याही चांगल्या गोष्टींचा, कृतीचा अंगीकार जर लहान वयातच झाला तर तो आयुष्यभर पुरणारा असतो. पण वाचनाची खरी गोडी लागणे अपेक्षित आहे त्या बालवयामध्ये मुलांना वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात शाळा-शिक्षक-व्यवस्थापन तसेच मुलांचे पालक अक्षम्य दुर्लक्ष करतात. मुलं खरंच वाचू इच्छितात आणि त्यामुळेच चांगली पुस्तकं वाचायला मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकारच आहे. पण पुस्तकांऐवजी अवतीभवती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध झालेले विविध खेळ, गॅझेट, व्हिडीओ गेम, संगणक, मोबाईल यातून मनोरंजनासाठीचे केवळ आभासी जग नकळत त्यांच्या हाताशी येते. त्या जगात त्यांचा वावर सातत्याने वाढत जातो. यात गुरफटत गेलेली मुले अनेकदा आपले संतुलन गमावून बसतात. मुलांना आवडणारे हिरो, खेळ इतके कृत्रिम वा आभासी असतात, की सारासार विचार करण्याची सवयच मुलांना राहत नाही. म्हणूनच आभासी जगाऐवजी मुलांनी स्वप्नांच्या दुनियेत वावरायला शिकले पाहिजे. त्यासाठी वाचनासारखा अन्य पर्याय नाही. कारण स्वत: वाचलेल्या गोष्टीतील नायक, परी, राक्षस यांच्या प्रतिमा ती गोष्ट वाचणाºया मुलांच्या मन:पटलावर उमटतात. त्या प्रतिमा त्यांच्या स्वत:च्या मनातील असतात. वाचलेल्या गोष्टीतील नायक, नायिका ही त्याच्या प्रत्येकाच्या मनात त्याला जशी गवसली तशी असते. जसे सिंड्रेला, अल्लाउद्दीन, हिमगौरी, गलिव्हर, सिंदबाद, फास्टर फेणे... अशा व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखा वाचलेल्या प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टीची त्यातील व्यक्तींच्या स्वत:च्या म्हणून वेगवेगळया प्रतिमा उमटतात. या जाणिवांच्या प्रत्येकाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून मुलांनी आभासी जगात न वावरता स्वप्नांच्या जगात वावरले पाहिजे. जादूच्या गोष्टी, परिकथा यांना वाचनात प्रामुख्याने स्थान दिले पाहिजे. जगविख्यात युगप्रवर्तक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते, 'मुलं बुद्धिमान होण्यासाठी त्यांना परिकथा वाचायला द्या. यावर मुलं अधिक बुद्धिमान व्हावीत, यासाठी काय करावे? या प्रतिप्रश्नास क्षणाचाही विलंब न लावता आइनस्टाइन म्हणाले, ह्यमुलांना अधिक बुद्धिमान करायचे असेल तर त्यांना आणखी परिकथा वाचायला द्या.' तात्पर्य हे की, वाचनातून माहिती किंवा ज्ञान हे मिळतेच; पण कल्पकता, सर्जनशीलता व सृजनशीलता यांचा विकासही वाचनाने होऊ शकतो. वाचक हा कधीच उत्तम वाचक असत नाही. तो घडावा लागतो, घडवावा लागतो. हे घडणंच खूप महत्त्वाचं असतं. 'जागतिक बाल पुस्तक दिनानिमित्ताने' मुलांना लहान वयातच दर्जेदार साहित्याची उपलब्धी करून देण्याचा संकल्प सर्वांनी केला तरच वाचन हा विशिष्ट वयोमर्यादेत करण्याचा उपचार न राहता जगण्याचा अविभाज्य भाग बनेल. (लेखक संदर्भ ग्रंथपाल आहेत.)
रम्य ती पुस्तकांची दुनिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:00 IST