दान पावले हो, म्हणणारे पांगूळ आधाराविना
By Admin | Updated: January 13, 2017 00:17 IST2017-01-13T00:17:17+5:302017-01-13T00:17:17+5:30
दान मागून आपल्या मातृपितजनांचा उद्धार करून दान पावले हो... म्हणणाऱ्या भटक्या जमातीतील पांगुळांचा स्वातंत्र्यानंतरही अजूनपर्यंत उद्धार झालेला नाही.

दान पावले हो, म्हणणारे पांगूळ आधाराविना
व्यथा पांगूळ समाजाची : भटक्या जमातीचे असूनही दारिद्रय रेषेच्या यादीत नाही
पवनी : दान मागून आपल्या मातृपितजनांचा उद्धार करून दान पावले हो... म्हणणाऱ्या भटक्या जमातीतील पांगुळांचा स्वातंत्र्यानंतरही अजूनपर्यंत उद्धार झालेला नाही. या पांगुळाचे संपूर्ण जीवनच भटकंतीत जात आहे.
लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील नानाजी दशरथ सुतार हे बहूरूपी समाजातील ६५ वर्षीय गृहस्थ अशीच भटकंती करीत जगत आहेत. डोक्याच्या मागच्या बाजूने कपड्याचे पांघरुण घालून दान मागताना दान पावले हो...ची आरोळी सकाळीच कानी पडताच पांगुळ आल्याची प्रचिती होते. दिवाळीच्या पंचमीपासून अक्षयतृतियेपर्यंत सात महिने हे भटकंतीत जातात. नानाजी हे विदर्भ तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओरीसा आदी राज्यात दान मागण्यासाठी भटकत असतात.
नानाजी जातीने बहुरुपी असले तरी पोटासाठी पांगुळ बनून वयाच्या १५ वर्षापासून भटकत आहेत. पांगूळ आता राहिले नाहीत. आताची भटक्या जातीतील मुले चादरी, पलंग, खुर्च्या विकतात. जे सापडेल तो व्यवसाय करीत बदलत्या काळानुसार करीत आहेत. घरात अठराविश्वे दारिद्रय असूनही हे बहुरुपी पांगुळ समाज दारिद्रय रेषेखालील यादीत नाहीत. त्यामुळे त्यांना दारिद्रय रेषेखालील सवलती मिळत नाही. नानाजी सुतार हे पाच दिवसांपासून पवनी शहरात आले आहेत. त्यांचा मुक्काम कुऱ्हाडा तलावाच्या पाळीवर आहे. शहरात फिरुन दान मागून ते कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)