नको ते नाहीसेच?

By Admin | Updated: January 10, 2015 12:56 IST2015-01-10T12:56:46+5:302015-01-10T12:56:46+5:30

श्रद्धेहून बुद्धीचा, मनाहून मेंदूचा, मताहून विचाराचा आणि भूमिकेहून विवेकाचा स्वर जोवर मोठा होत नाही तोवर विरोधाचा थेट खूनच करणारा हा हिंसाचार असाच चालेल. जे आपल्या बाजूचे नाही, आपल्याशी सहमत नाही ते नाहीसेच करण्याची नवी रीत जगभरात (आणि आपल्याही देशात) रुजत असल्याचे भयावह चित्र अधुनमधून दिसत असते. ‘शार्ली एब्दो’चा संपादक आणि त्याचे सहकारी दहशतीच्या या नव्या नृशंस रीतीचे बळी आहेत.

Do not miss it? | नको ते नाहीसेच?

नको ते नाहीसेच?

- सुरेश द्वादशीवार

 
 
फ्रान्सच्या कबर्‍या-भुर्‍या-गोर्‍या आकाशाला इस्लामचा हिरवा रंग फासण्याच्या वेडाने बेजार झालेल्या तीन बुरखाधारी दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये ‘शार्ली एब्दो’ या फ्रेंच नियतकालिकाच्या संपादकाची त्याच्या  सहकार्‍यांसह जी निर्घृण हत्त्या केली ती या दहशतवाद्यांच्या वाढत्या बळाचे नव्हे, तर साहस व क्रौर्याचे स्वरूप सांगणारी आहे. 
आताचा दहशतवाद केवळ सार्वत्रिकच नाही, तर तो सांदीकोपर्‍यात आहे. तो पेशावरच्या शाळेवर हल्ला चढवून तिच्यातली सव्वाशेवर निरपराध मुले मारतो. मलाला युसुफजाईच्या मेंदूत तीन गोळ्या घालतो आणि समोरासमोरच्या लढती टाळत एखाद्या नियतकालिकाच्या असुरक्षित कार्यालयावर हल्ला चढवून त्यातली नि:शस्त्र माणसे मारतो. 
‘शार्ली एब्दो’ हे फ्रान्समधील एक कमी खपाचे व्यंगचित्र साप्ताहिक. ते डाव्या विचारांचे आहे. धर्मांध, सत्तांध व अर्थांध माणसांची टिंगलटवाळी करणार्‍या व्हॉल्टेअर या त्याच देशाच्या थोर तत्त्वचिंतक सुपुत्राचा  वारसा चालविणारे आहे. व्हॉल्टेअर हा त्याच्या बेबंद मुक्तपणापायी अनेकवार तुरुंगात गेला. शार्ली एब्दोनेही आपल्या त्याच प्रवृत्तीपायी अतिरेक्यांचे अनेक हल्ले  आतापर्यंत अंगावर घेतले. सार्‍या जगात व विशेषत: इराक-इराण-सिरियापासून पाकिस्तानपर्यंतच्या पूर्व व मध्य आशियात मुस्लीम दहशतवाद्यांनी आपल्या दहशतखोर कारवायांनी आतंक माजवला आहे. आपणच इस्लामचे खरे व एकमेव तारणहार आहोत अशी स्वत:ची धारणा करून घेतलेल्या या दहशतवाद्यांनी जगभरच्या मवाळ मुसलमानांनाही धर्मविरोधीच ठरविले आहे. त्यांच्यावर टीका होते, त्यांची नालस्ती करणारे लोक त्यांच्या धर्मातही आहेत; मात्र या दहशतवाद्यांना जास्तीचे जखमी करणारे अस्त्र आहे व्यंग. आणि शार्ली एब्दोजवळचे त्या शस्त्राचे भांडार मोठे आहे. 
९ फेब्रुवारी २00६ च्या आपल्या अंकात ‘एब्दोने’ प्रेषित महंमदाची व्यंगचित्रे प्रकाशित केली होती. त्याचवेळी दहशतवादी संघटनांनी त्याला आपल्या काळ्या यादीत टाकले. ३ नोव्हेंबर २0११ चा आपला अंक ‘शरिया एब्दो’ या धर्म नामांकित नावाने प्रकाशित करण्याचे जाहीर करून त्याच्या अतिथी संपादकपदी प्रत्यक्ष हजरत सलीवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर हेच असतील असेही एब्दोने जाहीर करून टाकले. मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी त्याआधीच दि. २ नोव्हेंबरला त्याच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून तो अंक निघणार नाही याची व्यवस्था केली. सप्टेंबर २0१२ मध्ये एब्दोने प्रेषित महंमदाची व्यंगचित्रे पुन्हा प्रकाशित करून दहशतवाद्यांना डिवचण्याचे काम जारीच ठेवले. 
कडव्या डाव्या विचारांच्या नियतकालिकाच्या या ‘पुंडाव्या’चा पुरता बंदोबस्त करण्यासाठीच दहशतवाद्यांनी त्याच्यावर आताचा भीषण हल्ला चढवून त्याच्या संपादकांना व सहकारी कर्मचार्‍यांना ठार मारले आहे. कोपर्‍यात अडकलेल्या आणि चहुबाजूंनी अंगावर भीती चालून येत असलेल्या मांजराने जिवावर उदार होऊन समोरच्या माणसावर हल्ला चढवावा तसा हा भीतीतून उद्भवलेला भ्याड हल्ला आहे. दहशतवाद्यांना त्यांचे ‘बळी’ स्वतंत्रपणे शोधता व टिपता येतात. त्यांच्या सगळ्याच हालचालींची माहिती सुरक्षा यंत्रणांजवळ नसणे हेच त्यांचे सर्वात मोठे बळ असते. 
एब्दो हे बोलूनचालून व्यंगचित्रांचे व काहीसे टवाळखोर प्रवृत्ती असलेले साप्ताहिक आहे आणि त्याचा रोख जगभरच्या सगळ्या कडव्या धर्मांधांवर आहे. १९७0 च्या दशकात फ्रान्स व एकूणच युरोपात कामधंदा मिळविण्याच्या निमित्ताने आलेल्या आणि विविध उद्योग समूहांभोवती राहण्यासाठी उभारलेल्या घेट्टोंमध्ये दाटीवाटीने राहणार्‍या मध्य आशियातील मुस्लिमांचे वर्ग मोठे आहेत. त्यातले जे युरोपिय समाजाच्या मध्य प्रवाहात कालांतराने सामील झाले त्यांचा अपवाद वगळला तर बाकीचे गरीब अजून त्या घेट्टोतच राहणारे आहेत. कर्मठ धर्मांधांच्या सशस्त्र टोळ्यांची भरती सामान्यपणे या वर्गातून होते. त्यामुळे युरोपातील सामाजिक अस्वस्थपणात अजून राहिलेले धर्माचे अडसरही या प्रकारांना काही प्रमाणात कारणीभूत आहेत. 
वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाने चालणारी टिंगलटवाळी हा इतरांच्या मनोरंजनाचा विषय असला, तरी कर्मठ धार्मिकांच्या लेखी तो धर्मद्रोहाचा किंवा ब्लासफेमीचा प्रकार होतो. त्यामुळे या प्रकारात एब्दोलाही पूर्णपणे निर्दोष सोडता येत नाही; मात्र एब्दोचा अपराध त्याला मृत्युदंड देण्याएवढा खचितच मोठाही नाही. 
झोपलेल्या अगर झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला जागे करण्यासाठी व्यंग या अस्त्राचा वापर करण्याचे प्रयोग जगभरात सातत्याने होत आलेले आहेत. ते आपल्याकडेही झाले. एका व्यंगचित्राची ताकद शंभर अग्रलेखांएवढी असते असे म्हटले जाते, ते खरे आहे. अचूक जागी नेमका प्रहार करणारे एखादे सर्मथ व्यंगचित्र एखादी शहाणी गोष्ट जेवढय़ा सहजपणे आणि परखडपणे समाजाच्या गळी उतरवू शकते तेवढे सार्मथ्य शब्दांमध्ये असतेच असे नाही. त्यामुळे अशी व्यंगचित्रे कमालीची बोलकी आणि औषधी गुणांनी युक्त असतात.  ‘पंच’सारख्या व्यंगचित्रांच्या नियतकालिकाने असे वर्मी लागणारे बाण नेमके मारून अनेकदा समाजाला डिवचले होते. पण म्हणून संतापून जाऊन कुणी त्याच्या संपादकांचा खून केला नाही. टीका ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. कोणत्याही प्रगतिशील समाजाला / विचाराला टीकेला तोंड देतदेतच पुढे जावे लागते. महाराष्ट्रात नाही का तत्कालीन समाजाला डिवचणार्‍या सावित्रीबाईंचा आणि फुल्यांचा छळ झाला? आगरकरांनी आपली प्रेतयात्रा पाहिली. गांधींच्याही प्रेतयात्रा या देशाने काढल्या. विचारांना विरोध आणि त्या विरोधातून उन्नयन हा प्रवाह सार्वकालीकच असल्याचे दिसेल.
- पण आता वातावरण बदलले आहे. जे आपल्या बाजूचे नाही, आपल्याशी सहमत नाही ते नाहीसेच करण्याची नवी रीत जगभरात (आणि आपल्याही देशात) रुजत असल्याचे भयावह चित्र अधूनमधून दिसत असते. शार्ली एब्दोचा संपादक आणि त्याचे सहकारी दहशतीच्या या नव्या नृशंस रीतीचे बळी आहेत.
श्रद्धेहून बुद्धीचा, मनाहून मेंदूचा, मताहून विचाराचा आणि भूमिकेहून विवेकाचा स्वर जोवर मोठा होत नाही तोवर हा हिंसाचार असाच चालेल. त्याची आकडेवारी कमी होईल. मारणार्‍यांच्या टोळ्या आणखी आडरानात आणि सांदीकोपर्‍यात दडतील; पण जोवर हा हिंसाचार आणि सूडबुद्धी मनातून नष्ट होत नाही तोवर एब्दो, मलाला, पेशावर, मालेगाव, मुंबई, समझोता एक्स्प्रेस आणि कर्नाटक-ओडिशासारखे प्रकार घडत राहणार.

Web Title: Do not miss it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.