अंकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 06:00 AM2019-07-07T06:00:00+5:302019-07-07T06:00:04+5:30

फक्त काही दिवसांचाच वेळ हातात होता. आठवी ते दहावीची सगळी मुलं एकत्र झाली. शाळा, क्लासेस, खेळ. या सार्‍यांतून वेळ काढत सायकलवर फिरून त्यांनी पैसे गोळा केले. याच पैशांतून काही सामान विकत आलं. स्वत:ही बरंच र्शमदान केलं. एक नवी आशा ते उगवत होते.

Children's unique efforts to grow trees | अंकुर

अंकुर

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘डन !’ नववीतल्या सेजल आणि वेदने एकमेकांना टाळी दिली. आणि मग जवळ जवळ 35 मुला-मुलींचा घोळका आपापल्या सायकलींवर बसून घराकडे निघाला. जेमतेम महिन्याभरापूर्वीच शाळा सुरू झाली होती, तरी त्यांना येत्या आठवड्यात फार काम होतं. घरी जाऊन त्यातल्या प्रत्येकाने रिकामा डबा किंवा बरणी शोधायला सुरुवात केली. डबा मिळवायचा, त्याला पिगी बॅँकसारखं लांबट भोक पाडायचं, मग तो डबा बाजूने सजवायचा आणि मग उठता बसता जी कोणी मोठी माणसं भेटतील त्यांच्यासमोर तो डबा हलवून पैसे गोळा करायचे हे एक मोठं काम तर होतंच; पण त्याहीपेक्षा त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची किंमत काढायची, ती वस्तू हव्या त्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुठली गाडी करावी लागेल, त्या गाडीला किती पैसे द्यावे लागतील याचा अंदाज काढायचा आणि मग तेवढे पैसे उभे करायचे..
शाळा, क्लास, छंदवर्ग, गृहपाठ, व्यायाम, खेळ, इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही या सगळ्यातून वेळ काढून, फक्त सायकलींवर फिरून एवढं सगळं करायचं, तेही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आणि केवळ एक महिन्यात हे काही सोपं काम नव्हतं..
पण मुलांनी ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि त्यासाठीचं प्लॅनिंग पूर्ण करून ते आज कामाला लागले होते.
सेजलला घरी गेल्यावर रोज अर्धा तास मोबाइल वापरायला मिळायचा. त्यावर तिने एक छोटा ग्रुप तयार केलेला होता. त्यावर तिने टाकलं, ‘इकडची तयारी सुरू.. तिकडे काय परिस्थिती?’
आणि मग तिकडून धपाधप फोटोज आणि मेसेजेस यायला लागले. एका फोटोत लहान गावातल्या आर्शमशाळेत मोठी मुलं दोन-दोनचे गट करून खड्डे खणत होती. दुसरीकडे लहान मुलं पाण्याच्या डबक्या गोळा करत होती. तिसर्‍या फोटोत लहान मुलं काहीतरी गोळा करत होती; पण ती काय गोळा करतायत ते दिसत नव्हतं.
‘ग्रेट !’ - सेजलने रिप्लाय केला. ‘आपली फायनल संख्या किती?’
‘पन्नास’ - तिकडून उत्तर आलं.
‘ओके. तुम्हाला पन्नास जमतील ना?’
‘हो. हो. आमचं नियोजन झालेलं आहे. तुम्हाला जमेल कापण? कारण आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही.’
‘आम्ही पन्नासचं प्लॅनिंग केलं आहे; पण आम्ही जमवू. आणि मदत तर आम्हीपण तुम्हाला करू शकत नाही. तुम्ही जे करताय ते आम्ही करू शकत नाही.’
‘पण आपण सगळे मिळून करू शकतो.’ - तिकडून उत्तर आलं. त्यावर एक लाइकवाला अंगठा आणि एक स्मायली टाकून सेजल म्हणाली, ‘आता जाते. होमवर्क करायचा आहे. उद्या बोलू.’
आणि मग पुढचा महिनाभर या शाळेतील मुलं आणि जिल्ह्यातच असणार्‍या दुसर्‍या एका आर्शमशाळेतली मुलं झपाटल्यासारखी काम करत होती. बघता बघता ऑगस्ट महिना सुरू झाला.
सेजल आणि तिच्या बरोबरची मुलं त्यांच्या क्लास टीचरकडे गेली आणि त्यांना म्हणाली,
‘सर, यावर्षी 15 ऑगस्टला आपण आपल्या शाळेच्या आर्शमशाळेत जाऊया.’
वेद म्हणाला, ‘म्हणजे आम्ही असं ठरवलंय.’
‘गप रे. म्हणजे सर, आम्हाला तसं करायचंय. तर आपण जाऊ शकतो का?’
‘हो न सर, पाहिजे तर यावर्षीची वर्षासहल कॅन्सल करू आपण..’
इतकी सगळी मुलं एकमेकांशी न भांडता काहीतरी सांगताहेत याचा अर्थ त्यांचा काहीतरी सॉलिड प्लॅन शिजलेला आहे हे सरांना इतक्या वर्षांच्या अनुभवावरून नक्की माहिती होतं. ही मुलं वर्षासहलीवर पाणी सोडायला तयार झाली म्हणजे त्यांचा प्लॅन तसाच सॉलिड असणार याचाही त्यांना अंदाज होता. ते म्हणाले,
‘आपण विचारू मुख्याध्यापकांना; पण तिथे जाऊन करायचं काय?’
सगळ्या मुलांनी एकमेकांकडे बघितलं आणि म्हणाले, ‘झेंडावंदन!’
‘हो का..? मग ते तर काय इथेही करता येईल.. त्यासाठी एवढय़ा लांब जायची काय गरज आहे???’ सर तिथून उठले आणि चालायला लागले. सगळी मुलं आरडाओरडा करत त्यांच्या मागे धावली,
‘ओ सर.. जाऊया ना’
‘सर सर.. प्लीज..’
‘ऐका न सर’
‘सर आमचा काहीतरी प्लॅन आहे.’ - एकाने शेवटी काकुळतीला येऊन सांगून टाकलं.
‘अच्छा..’ सर थांबले आणि म्हणाले, ‘काय प्लॅन आहे?’
‘सर ते सरप्राइज आहे.’
सरांना कळेना की मुलांना कसं समजावून सांगावं. ते म्हणाले, ‘अरे, आपल्या शाळेतून 40-45 मुलं आर्शमशाळेत न्यायची तर त्याला प्लॅनिंग नको का? बसवाल्यांना सांगायला लागेल, इतक्या मुलांबरोबर चार शिक्षक लागतील. त्यांना सांगावं लागेल, तुमच्या घरी कळवायला लागेल, तुमच्या पालकांची परवानगी लागेल, तिथे आर्शमशाळेत सांगून ठेवायला लागेल, एकदम 50-60 माणसं येणार तर त्यांना पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यापासून सगळं करायला लागेल. असं सरप्राइज म्हणून उठून जाता नाही येणार.’
बापरे ! हे सगळं मुलांना दिसलेलंच नव्हतं; पण त्यांनी इतका हट्ट धरला की मुलांचं एवढं काय सरप्राइज आहे ते तरी बघूया म्हणून सरांनी 15 ऑगस्टला मुलांना आर्शमशाळेत न्यायचं कबूल केलं.
15 ऑगस्टच्या दिवशी बस भरून मुलं आर्शमशाळेत पोहोचली. तिथे त्यांना बघून आर्शमशाळेतली मुलंही सॉलिड खूश झाली. झेंडावंदन झालं. आर्शमशाळेतल्या मुलांनी मानवी मनोरे बनवले. संचलन केलं. कार्यक्र म संपत आला. आता मात्न मुलांची चुळबुळ सुरू झाली. त्यांचं सरप्राइज काही केल्या येईचना.
शेवटी आर्शमशाळेतले एक शिक्षक आभार मानायला उठले. आणि त्याचवेळी आर्शमशाळेच्या दारातून एक ‘छोटा हत्ती’ आत शिरला. ती गाडी आत आल्याबरोबर सगळी मुलं एकदम उठून आरडाओरडा करत त्या टेम्पोकडे धावली. मुलांचं वागणं बघून शिक्षकांच्या लक्षात आलं की इथे काय चाललंय ते सगळ्या मुलांना माहिती आहे. फक्त आपल्यालाच कोणी काही सांगितलेलं नाहीये. टेम्पोतून तारांची भेंडोळी खाली उतरवायला मुलांनी सुरुवात केली, मग अँँगल्स उतरवले, मग चेन लिंकची मोठी मोठी बंडल उतरवली. नर्सरी बॅग्समधली 40-50 छोटी छोटी रोपं.. बघता बघता सगळं सामान मुलांनी शाळेत सुरक्षित आणून रचलं आणि मग जणू काही झालंच नाही अशा थाटात परत रांगा करून बसली.
सर उभे राहिले आणि म्हणाले, ‘सरप्राइज देऊन झालं असेल तर आता आम्हाला सांगता का हा काय प्रकार आहे?’
सगळ्या मुलांच्या वतीने सेजल उभी राहिली आणि  म्हणाली,
‘सर शाळा सुरू झाल्या झाल्या आठवी-नववी दहावीच्या मुलांना क्षेत्नभेटीसाठी आपल्या आर्शमशाळेत आणलं, तेव्हा आम्ही आर्शमशाळा पहिल्यांदा बघितली. इथल्या मुलांशी आमची मैत्नी झाली. कारण त्यांनी आम्हाला त्यांची शाळा खूप छान दाखवली; पण आम्हाला ते बघत असताना सारखं वाटत होतं की इथे मोठी झाडं का नाहीयेत? कारण इथे खेळताना बसायला, डबे खायला छान झाडं नाहीयेत. मग आम्ही ते इथल्या मुलांना विचारलं, तर मुलं म्हणाली, ‘आम्ही दरवर्षी झाडं लावतो; पण शेळ्या आमची झाडं खाऊन टाकतात.’ 
त्यांनापण इथे झाडं पाहिजे होती आणि पावसाळा संपल्यावर ते झाडांना पाणी घालायला तयार होते. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आम्ही शहरातल्या आणि इथल्या मुलांनी मिळून इथे झाडं लावायचीच. कारण, आम्ही शहरात मोठी झाडं लावू शकत नाही; कारण आमच्याकडे जागा नाहीये. मग आमचे इथले मित्न म्हणाले की, आम्ही सगळी मेहनत करू, खड्डे खणू. त्याप्रमाणे त्यांनी महिन्याभरात 50 खड्डे खणले.  आम्ही सगळ्यांनी पैसे गोळा करून इथे लावायला 50 झाडं आणि त्या झाडांभोवती लावायला 50 तारेचे पिंजरे विकत घेतले. आता इथली झाडं शेळ्या खाणार नाहीत.’ आणि  मग जरा थांबून मुलं म्हणाली, ‘सर, आज आम्हाला समजलं की एकीचं बळ काय असत ते.. आता आम्ही सगळे जण दरवर्षी 15 ऑगस्टला इथेच येणार. शाळेतून बाहेर पडलो तरी..’
सेजल बोलायची थांबली; पण शिक्षकांच्या टाळ्या थांबेनात. कारण त्या फक्त मुलांसाठी नव्हत्या, तर इंडिया आणि भारतातल्या मैत्नीसाठीही होत्या.
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

Web Title: Children's unique efforts to grow trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.