शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पक्षी जाय माहेरा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 6:02 AM

विदर्भातल्या रानावनात रमून गेलेले चितमपल्ली सोलापूरला, त्यांच्या जन्मगावी निघालेत! माहेराची ओढ आहे, पण म्हणतात  ‘तिथे जंगल नाही हो!..’

ठळक मुद्देगेली साठ वर्षे मारुती चितमपल्ली सोलापूरबाहेर आहेत. 1960 साली त्यांनी सोलापूर सोडलं. आता जिथे जन्म झाला त्या सोलापुरातल्या जुन्या वाड्यात त्यांना राहता येणार नाही. अक्कलकोट रोडवरच्या नव्या वस्तीत ते इथून पुढे राहतील.

- श्रीमंत माने

असं म्हणतात की, नदीचं मूळ अन् ऋषीचं कुळ शोधू नये. दोहोंचा संबंध निसर्गाशी अन् दोन्ही हातांनी, दोन्ही तीरांनी देण्याशी, दातृत्वाशी व त्यागाशीही आहे. अशाच एका अरण्यऋषीचं कुळ अन् मूळ शनिवारी नागपुरात चर्चेत राहिलं. आठरस्ता चौकातल्या अभिरिका वसाहतीच्या दुसर्‍या माळ्यावरच्या छोटेखानी सदनिकेत सकाळपासूनच सामानाची आवराआवर, बांधाबांध सुरू होती. खाली फाटकाजवळ मालमोटार उभी होती. सामान तरी काय, तर पुस्तकेच पुस्तके. आतल्या दोन्ही शयनकक्षातली फडताळं पुस्तकांनीच भरलेली. ते भरलेले बॉक्स बाहेर दिवाणखान्यातून खाली उतरवले जात होते. ही सदनिका पक्षितज्ज्ञ, अरण्यव्रती मारुती चितमपल्ली यांची़ नागपूर सोडून सोलापूरला जाण्याची त्यांची तयारी़ वर्धेवरून नागपूरला येणार होत़े, तिथून एक-दीड किलोमीटर अंतरावर या अरण्यऋषीला द्यायच्या निरोपाची तयारी सुरू होती. चितमपल्ली यांचा हा निरोप समारंभ ज्या घरी होता ते घर आशुतोष शेवाळकर यांचे. साडेअकराच्या सुमारास मारूती चितमपल्ली वर्धेहून शेवाळकरांच्या घरी पोचले. 88 वर्षाचे चितमपल्ली थोडे थकलेले. कोरोना विषाणूपासून बचावासाठी डोक्यावर शिल्ड घातलेले. हळूहळू चालत कोचावर येऊन बसल्यानंतर सहज गप्पांना सुरूवात झाली.सोलापूर हे चितमपल्ली यांचे जन्मगाव. विजापूर वेस भागात, तेलंगी पच्छीपेठमधल्या वाड्यात 1932 मध्ये त्यांचा जन्म झाला त्याच शहरानं, विशेषत: आईनं व लिंबामामा, हणमामामानं त्यांच्यावर निसर्ग निरीक्षणाचे संस्कार केले. आईमागे धावत रानवाटा, अरण्यवाटा फिरले. पुढे त्या रानवाटांचाच प्रदीर्घ जंगल भटकंती, निरीक्षण,  अभ्यासानं प्रशस्त महामार्ग बनला. ‘पक्षिकोश पूर्ण झालाय. वृक्षकोशाचं महाराष्ट्रापुरतं काम झालंय. मत्स्यकोशाचं बरंच काम कोकण किनार्‍यावर पूर्ण झालंय, थोडं बाकी आहे ते आता सोलापुरात पूर्ण करायचंय,’- चितमपल्ली सांगत होते.तब्बल साडेचार दशकं  विदर्भातल्या जंगलांनी चितमपल्लींना अन् त्यांनी जंगलांना, वन्यजीव, तसेच अरण्यात राहणार्‍या माणसांना सांभाळलं. वनाधिकारी म्हणून 36 वर्षे वनखात्यात काम करताना जसा जंगलाचा संबंध आला तसाच ती जंगलं सांभाळणार्‍या माणसांशीही त्यांचा संबंध आला. 1990 मध्ये ते अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधून निवृत्त झाले. तोवर पक्षी जाय दिगंबरा, जंगलाचं देणं, केशराचा पाऊस, अनुभवून व लिहून झाला होता. नंतर तीस वर्षांपैकी बहुतेक काळ त्यांनी नवेगावबांध, नागझिर्‍यात काढला. जंगलाचं देणं अधिक जवळून अनुभवलं. माधवराव पाटील व व्यंकटेश माडगूळकरांच्या सोबतीनं तिथं त्यांनी जल, जमीन, जंगल, जीवनातले बारकावे टिपले होते. ते पुढे शब्दबद्ध केले. झाडं, पानंफुलं, पक्षी, प्राणी, रानातल्या वाटा, त्यातलं गुह्य व गूढ पानापानांवर उमटलं. एकाहून एक र्शेष्ठ साहित्यकृतींनी मराठीचं निसर्गलेखनाचं दालन समृद्ध होत गेलं. लोकसाहित्यातली गूढ निळावंतीही शब्दात गुंफली. पन्नास-साठ वर्षांचा आपला अरण्यप्रवास ‘चकवा चांदण’ या रुपानं शब्दात मांडला. हे त्यांचं वनोपनिषद. अरण्यऋषीचं  आत्मकथन. नागपूरवरून सहाशे-साडेसहाशे किलोमीटरवरच्या, महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरच्या सोलापूरच्या जन्मभूमीची ओढ सहज गप्पा मारतानाही चितमपल्लींच्या चेहर्‍यावर जाणवत होती. पण, सोबतच एक खंत, की सोलापूरला जंगल नाही! माळढोक अभयारण्याचा उल्लेख केला तर म्हणतात की ते ठीक आहे. पण, जंगल नाही. माळढोक तर गवताळ माळरानावर वावरतात. विदर्भासारखं जंगल कुठंच नाही. ते इथल्या माणसांनी, आदिवासींनी जपलंय. जंगलाशी एकरुप झालेली माणसंच तसं करू शकतात. अर्थात, नागपूरच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून चितमपल्ली पहिल्यांदा बाहेर चाललेत असं नाही़ 2007 मध्येही ते असेच शहरातलं घर सोडून नवेगाव बांधजवळच्या धाबे पवनी या खेड्यात राहायला गेले होत़े पण, ते गाव विदर्भातच होतं़ नागपूर, विदर्भाबाहेर ते पहिल्यांदा चाललेत़ म्हणत होते, ‘जंगल सांभाळणं सोपं नाही. चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगलाचं नष्टचर्य असं की, मूळ बहुवृक्षीय, बहुरंगी जंगल जागतिक बँकेच्या पैशाच्या लोभाला बळी पडून आपण संपवलं. तुमचा अभिजात निसर्ग संपवा, आम्ही पैसा देतो, त्याचा वापर आम्ही सांगतो तशा जंगलाची लागवड करा, असं बँकेनं सांगितलं. आपण ते ऐकलं अन् निसर्गाचा ठेवा गमावला. हा र्‍हास अजूनही सुरूच आहे.’ मेळघाटाबद्दल मात्र ते खूप आशादायी आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारखा घातकी प्रयोग तिथंही झाला खरा. पण तो सगळा डोंगराळ भाग असल्यानं अजूनही व्हजिर्न जंगल टिकून आहे. कोरकू आदिवासींचं ते जंगल टिकविण्यात मोठं योगदान आहे. तरीदेखील इंग्रजांनी रेल्वेलाईन जंगलातून नेली. नंतर हायवे झाला. त्यामुळं जंगलाची मोठी हानी झाली. आता तो साधारणपणे सोळाशे चौरस किलोमीटरचा टापू म्हणजे आपलं वैभव आहे व ते टिकवायला हवं. प्राणी-पक्ष्यांना मुक्त वावर करता येईल, असा इतका मोठा जंगलाचा टापू इतरत्र कुठेच नाही. कसंही करून हा ठेवा जपायला हवा़ कारण, जंगलाचा संबंध केवळ हिरवेपणाशी नाही़ अगदी कुपोषणासारख्या समस्येवरचा उपायही जंगलातच आहे - मारुती चितमपल्ली सांगतात.विदर्भातली 45 वर्षे आणि वनखात्यातल्या नोकरीमुळं आधीची 15 वर्षे अशी साठ वर्षे मारुती चितमपल्ली सोलापूरबाहेर आहेत. 1960 साली सोलापूर सोडलं. आता जिथे जन्म झाला त्या सोलापुरातल्या जुन्या वाड्यात त्यांना राहता येणार नाही. अक्कलकोट रोडवरच्या नव्या वस्तीत ते इथून पुढे राहतील. वृक्षकोशाचं अन् मत्स्यकोशाचं उरलेलं काम ते सोलापूरमध्ये पूर्ण करतील़ म्हणूनच जन्मभूमीतला एकांत त्यांना खुणावत असावा.  हा निसर्गवेडा शब्दपूजक आयुष्याचे शतक ओलांडेल, पुढच्या दीडेक दशकात मराठी निसर्गसाहित्याच्या खजिन्यात आणखी मोलाची भर टाकील. नव्या पिढय़ांना निसर्ग अभ्यासाची, निरीक्षणाची अन् निसर्गातल्या सौंदर्य, गूढ, रंजकता, अद्भुतता असं सारं काही कागदावर उतरवण्याची नक्की प्रेरणा देत राहील!shrimant.mane@lokmat.com    (लेखक लोकमत नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)