शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

पक्षी जाय माहेरा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 06:05 IST

विदर्भातल्या रानावनात रमून गेलेले चितमपल्ली सोलापूरला, त्यांच्या जन्मगावी निघालेत! माहेराची ओढ आहे, पण म्हणतात  ‘तिथे जंगल नाही हो!..’

ठळक मुद्देगेली साठ वर्षे मारुती चितमपल्ली सोलापूरबाहेर आहेत. 1960 साली त्यांनी सोलापूर सोडलं. आता जिथे जन्म झाला त्या सोलापुरातल्या जुन्या वाड्यात त्यांना राहता येणार नाही. अक्कलकोट रोडवरच्या नव्या वस्तीत ते इथून पुढे राहतील.

- श्रीमंत माने

असं म्हणतात की, नदीचं मूळ अन् ऋषीचं कुळ शोधू नये. दोहोंचा संबंध निसर्गाशी अन् दोन्ही हातांनी, दोन्ही तीरांनी देण्याशी, दातृत्वाशी व त्यागाशीही आहे. अशाच एका अरण्यऋषीचं कुळ अन् मूळ शनिवारी नागपुरात चर्चेत राहिलं. आठरस्ता चौकातल्या अभिरिका वसाहतीच्या दुसर्‍या माळ्यावरच्या छोटेखानी सदनिकेत सकाळपासूनच सामानाची आवराआवर, बांधाबांध सुरू होती. खाली फाटकाजवळ मालमोटार उभी होती. सामान तरी काय, तर पुस्तकेच पुस्तके. आतल्या दोन्ही शयनकक्षातली फडताळं पुस्तकांनीच भरलेली. ते भरलेले बॉक्स बाहेर दिवाणखान्यातून खाली उतरवले जात होते. ही सदनिका पक्षितज्ज्ञ, अरण्यव्रती मारुती चितमपल्ली यांची़ नागपूर सोडून सोलापूरला जाण्याची त्यांची तयारी़ वर्धेवरून नागपूरला येणार होत़े, तिथून एक-दीड किलोमीटर अंतरावर या अरण्यऋषीला द्यायच्या निरोपाची तयारी सुरू होती. चितमपल्ली यांचा हा निरोप समारंभ ज्या घरी होता ते घर आशुतोष शेवाळकर यांचे. साडेअकराच्या सुमारास मारूती चितमपल्ली वर्धेहून शेवाळकरांच्या घरी पोचले. 88 वर्षाचे चितमपल्ली थोडे थकलेले. कोरोना विषाणूपासून बचावासाठी डोक्यावर शिल्ड घातलेले. हळूहळू चालत कोचावर येऊन बसल्यानंतर सहज गप्पांना सुरूवात झाली.सोलापूर हे चितमपल्ली यांचे जन्मगाव. विजापूर वेस भागात, तेलंगी पच्छीपेठमधल्या वाड्यात 1932 मध्ये त्यांचा जन्म झाला त्याच शहरानं, विशेषत: आईनं व लिंबामामा, हणमामामानं त्यांच्यावर निसर्ग निरीक्षणाचे संस्कार केले. आईमागे धावत रानवाटा, अरण्यवाटा फिरले. पुढे त्या रानवाटांचाच प्रदीर्घ जंगल भटकंती, निरीक्षण,  अभ्यासानं प्रशस्त महामार्ग बनला. ‘पक्षिकोश पूर्ण झालाय. वृक्षकोशाचं महाराष्ट्रापुरतं काम झालंय. मत्स्यकोशाचं बरंच काम कोकण किनार्‍यावर पूर्ण झालंय, थोडं बाकी आहे ते आता सोलापुरात पूर्ण करायचंय,’- चितमपल्ली सांगत होते.तब्बल साडेचार दशकं  विदर्भातल्या जंगलांनी चितमपल्लींना अन् त्यांनी जंगलांना, वन्यजीव, तसेच अरण्यात राहणार्‍या माणसांना सांभाळलं. वनाधिकारी म्हणून 36 वर्षे वनखात्यात काम करताना जसा जंगलाचा संबंध आला तसाच ती जंगलं सांभाळणार्‍या माणसांशीही त्यांचा संबंध आला. 1990 मध्ये ते अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधून निवृत्त झाले. तोवर पक्षी जाय दिगंबरा, जंगलाचं देणं, केशराचा पाऊस, अनुभवून व लिहून झाला होता. नंतर तीस वर्षांपैकी बहुतेक काळ त्यांनी नवेगावबांध, नागझिर्‍यात काढला. जंगलाचं देणं अधिक जवळून अनुभवलं. माधवराव पाटील व व्यंकटेश माडगूळकरांच्या सोबतीनं तिथं त्यांनी जल, जमीन, जंगल, जीवनातले बारकावे टिपले होते. ते पुढे शब्दबद्ध केले. झाडं, पानंफुलं, पक्षी, प्राणी, रानातल्या वाटा, त्यातलं गुह्य व गूढ पानापानांवर उमटलं. एकाहून एक र्शेष्ठ साहित्यकृतींनी मराठीचं निसर्गलेखनाचं दालन समृद्ध होत गेलं. लोकसाहित्यातली गूढ निळावंतीही शब्दात गुंफली. पन्नास-साठ वर्षांचा आपला अरण्यप्रवास ‘चकवा चांदण’ या रुपानं शब्दात मांडला. हे त्यांचं वनोपनिषद. अरण्यऋषीचं  आत्मकथन. नागपूरवरून सहाशे-साडेसहाशे किलोमीटरवरच्या, महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरच्या सोलापूरच्या जन्मभूमीची ओढ सहज गप्पा मारतानाही चितमपल्लींच्या चेहर्‍यावर जाणवत होती. पण, सोबतच एक खंत, की सोलापूरला जंगल नाही! माळढोक अभयारण्याचा उल्लेख केला तर म्हणतात की ते ठीक आहे. पण, जंगल नाही. माळढोक तर गवताळ माळरानावर वावरतात. विदर्भासारखं जंगल कुठंच नाही. ते इथल्या माणसांनी, आदिवासींनी जपलंय. जंगलाशी एकरुप झालेली माणसंच तसं करू शकतात. अर्थात, नागपूरच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून चितमपल्ली पहिल्यांदा बाहेर चाललेत असं नाही़ 2007 मध्येही ते असेच शहरातलं घर सोडून नवेगाव बांधजवळच्या धाबे पवनी या खेड्यात राहायला गेले होत़े पण, ते गाव विदर्भातच होतं़ नागपूर, विदर्भाबाहेर ते पहिल्यांदा चाललेत़ म्हणत होते, ‘जंगल सांभाळणं सोपं नाही. चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगलाचं नष्टचर्य असं की, मूळ बहुवृक्षीय, बहुरंगी जंगल जागतिक बँकेच्या पैशाच्या लोभाला बळी पडून आपण संपवलं. तुमचा अभिजात निसर्ग संपवा, आम्ही पैसा देतो, त्याचा वापर आम्ही सांगतो तशा जंगलाची लागवड करा, असं बँकेनं सांगितलं. आपण ते ऐकलं अन् निसर्गाचा ठेवा गमावला. हा र्‍हास अजूनही सुरूच आहे.’ मेळघाटाबद्दल मात्र ते खूप आशादायी आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारखा घातकी प्रयोग तिथंही झाला खरा. पण तो सगळा डोंगराळ भाग असल्यानं अजूनही व्हजिर्न जंगल टिकून आहे. कोरकू आदिवासींचं ते जंगल टिकविण्यात मोठं योगदान आहे. तरीदेखील इंग्रजांनी रेल्वेलाईन जंगलातून नेली. नंतर हायवे झाला. त्यामुळं जंगलाची मोठी हानी झाली. आता तो साधारणपणे सोळाशे चौरस किलोमीटरचा टापू म्हणजे आपलं वैभव आहे व ते टिकवायला हवं. प्राणी-पक्ष्यांना मुक्त वावर करता येईल, असा इतका मोठा जंगलाचा टापू इतरत्र कुठेच नाही. कसंही करून हा ठेवा जपायला हवा़ कारण, जंगलाचा संबंध केवळ हिरवेपणाशी नाही़ अगदी कुपोषणासारख्या समस्येवरचा उपायही जंगलातच आहे - मारुती चितमपल्ली सांगतात.विदर्भातली 45 वर्षे आणि वनखात्यातल्या नोकरीमुळं आधीची 15 वर्षे अशी साठ वर्षे मारुती चितमपल्ली सोलापूरबाहेर आहेत. 1960 साली सोलापूर सोडलं. आता जिथे जन्म झाला त्या सोलापुरातल्या जुन्या वाड्यात त्यांना राहता येणार नाही. अक्कलकोट रोडवरच्या नव्या वस्तीत ते इथून पुढे राहतील. वृक्षकोशाचं अन् मत्स्यकोशाचं उरलेलं काम ते सोलापूरमध्ये पूर्ण करतील़ म्हणूनच जन्मभूमीतला एकांत त्यांना खुणावत असावा.  हा निसर्गवेडा शब्दपूजक आयुष्याचे शतक ओलांडेल, पुढच्या दीडेक दशकात मराठी निसर्गसाहित्याच्या खजिन्यात आणखी मोलाची भर टाकील. नव्या पिढय़ांना निसर्ग अभ्यासाची, निरीक्षणाची अन् निसर्गातल्या सौंदर्य, गूढ, रंजकता, अद्भुतता असं सारं काही कागदावर उतरवण्याची नक्की प्रेरणा देत राहील!shrimant.mane@lokmat.com    (लेखक लोकमत नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)