पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?
By Admin | Updated: November 1, 2015 00:25 IST2015-11-01T00:25:48+5:302015-11-01T00:25:48+5:30
तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली (जि. पुणे) येथील काळे ओढा परिसरात शनिवारी सकाळी घडली. अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) असे त्याचे

पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?
वाघोली : तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली (जि. पुणे) येथील काळे ओढा परिसरात शनिवारी सकाळी घडली. अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या जाचाला कंटाळून हे पाउल उचलल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केला असून, आत्महत्येला पोलीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजीराव चिखले यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे.
महिन्यापूर्वी एका महिलेने अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) व इतर दोघांवर विनयभंगाची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर अतुल १५ दिवस येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता़ काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला होता़ त्यानंतर तो चुलत्यांकडे गेला होता़ दोनच दिवसांपूर्वी तो घरी आला होता़ शनिवारी सकाळी त्याचे आई, वडील बाहेर गेले होते़ घरात आजी होती़
त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांमार्फत आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश ग्रामीणचे अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
चिठ्ठीत पोलिसांचा उल्लेख
सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व पोलीस कर्मचारी गणेश पोटे यांनी त्रास दिल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे. अतुलच्या आत्महत्येला पोलीस जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अतुलच्या वडिलांनी केली आहे.
अतुलवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करण्याचा, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याचे कुटुंबाबरोबरही वाद होते. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस त्याला बोलवत होते. पोलिसांकडून उपरोक्त प्रकार घडलेला नाही. - वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक