Ambadas Danve vs Eknath Shinde Ajit Pawar, Maharashtra Winter Session : सत्ताधारी सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी देशोधडीला लावले आहे. जनतेचे हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार आहे, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली. तसेच, सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्या भाषणावर उत्तर देताना आमचे सरकार असे आहे, त्यांचे सरकार तसे होते असं म्हटलं. पण दोन्ही उपमुख्यमंत्री त्या काळात आमच्या मंत्रिमंडळात सहभागी होते हे ते सोयीने विसरले, असे रोखठोक विधानही केले.
"राज्य थांबणार नाही, हे ब्रीदवाक्य सरकार सतत म्हणत आहे. पण ५ डिसेंबरला शपथविधी होऊन सरकारला खाते वाटप करता आले नाही. मागच्या अधिवेशनाची परिस्थिती पाहिली तर राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेले? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवली. राज्यातील शिक्षण आरोग्य, उद्योग विभागाची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गुन्हेगारीत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षात सरासरी १२६ गुन्हयाची नोंद झाली आहे. २०२३ मध्ये ४५ हजार ४३४ महिला अत्याचाराच्या घटना नोंदवल्या असून सायबर गुन्ह्यात राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. १२ ऑक्टोबर २०२४ ला राज्याचे माजी विधानसभा सदस्य बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी त्यांची रेकी केली होती. आज राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या घराची रेकी झाली आहे," या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले.
"पुणे येथे जेलमध्ये जेलर पठाण यांना मारण्याचा प्रयत्न झाला आहे. म्यानमार मधील रोहिंग्याचा पुण्यात वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या झाली. सत्ताधारी यांची ही स्थिती असल्यास सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल? परभणी प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू व बीडचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येबाबतही अनेक प्रश्न आहेत. या हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड हा मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे. गेले ४ दिवस त्याचे नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलीस त्याला पकडू का शकले नाहीत," असा सवाल करत आरोपींना राजकीय आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.
संभाजी नगर जिल्ह्यात ७५ खूनाच्या घटना समोर आल्यात. मुंबई, पुणे व नागपूर येथे हिट अँड रनच्या घटना घडत आहेत. नागपूरच्या घटनेत मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आलेली नाही. मलकापूर अर्बन बँक घोटाळा, न्याय राधा कॉ-ऑपरेटीव्ह बँक घोटाळा समोर आलाय, संभाजी नगरमधील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळयातही अद्याप कोणतीही कारवाई नाही. महाराष्ट्रातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात अडकली आहे. फूड अँड ड्रग्स त्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले बनले असून सत्ताधाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळात तडीपारीच्या नोटीस दिल्या. नांदेड जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संतोष वडुळे यांचे बोट छाटले गेल्याची घटना घडली आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत सर्रास कायदे मोडले जातात. या साऱ्याला आळा घातला जायला हवा," असे दानवे यांनी सांगितले.