योग दिन गेला...पुढे काय?
By Admin | Updated: July 5, 2015 01:39 IST2015-07-05T01:39:23+5:302015-07-05T01:39:23+5:30
पहिला वहिला जागतिक योग दिन भारतासह जगात उत्साहात साजरा झाला. योग दिनी अनेकांनी योगाचे धडे गिरवले. काहींनी (बहुधा सक्तीने) आठवडाभर आधीपासून योग दिनाची तयारी केली.

योग दिन गेला...पुढे काय?
जगू आनंदे
- राहुल रनाळकर
पहिला वहिला जागतिक योग दिन भारतासह जगात उत्साहात साजरा झाला. योग दिनी अनेकांनी योगाचे धडे गिरवले. काहींनी (बहुधा सक्तीने) आठवडाभर आधीपासून योग दिनाची तयारी केली. सरकारी फर्मान असल्याने त्यांना योग करण्याशिवाय अन्य पर्यायदेखील नव्हता. ‘योग सक्तीचा नाही’ असे सांगून एक प्रकारे सक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. जागतिक योग दिनाचा ‘इव्हेंट’ही धडाक्यात साजरा झाला. पण योग हा एक दिवस, काही आठवडे, काही महिने करण्याचा प्रकार नाही, हे आधी समजवून घ्यावे लागेल. असो. पण योग दिन झोकात पार पडला, आता पुढे काय, हा प्रश्न औत्सुक्याचा आहे.
ज्या सरकारी आस्थापनांमध्ये योगवर्ग घेण्यात आले, ते सुरू आहेत का? त्यात लोक सहभागी होत आहेत का? हे अजून समोर यायचे आहे. जबरदस्ती करून योग विषय कधीही कोणावरही लादता येऊ शकत नाही. त्यात कधीही यश येणार नाही. योग विषयाबद्दल यानिमित्ताने जागृती झाली, हा काय तेवढा महत्त्वाचा मुद्दा. सरकारी शाळांमध्ये योग विषय शिकवला जाणार आहे. हा निर्णयही स्वागतार्हच आहे. शालेय जीवनात योगाची ओळख झाल्यानंतर त्या मार्गात पुढे जाणे, तो समजून घेणे अधिक सयुक्तिक ठरते.
किंबहुना केवळ सरकारी नव्हे, तर सर्वच शाळांमध्ये योग विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. हल्ली तणावाची सुरुवात नर्सरीपासूनच होते. शालेय मुलांमध्ये कमालीचा ताण वाढत आहे. तो समजून घेणे शिक्षक, पालकांनाही अशक्य होत चालले आहे. माहितीच्या माऱ्यात शालेय मुलांचे बालपण हरवत चालले आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक जाण निर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ती जाणीव योगाच्या माध्यमातून निर्माण करणे, सहज शक्य आहे. स्वत:च्या मानसिकतेचा, आवाक्याचा हे विद्यार्थी अंदाज घेऊ शकतात. भावनिक प्रश्न सोडवण्याची क्षमता योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी योग विषय अत्यंत गरजेचा आहे. प्रश्न पुन्हा सक्तीचा आहे. सक्ती केल्यानंतर विषयाचे गांभीर्य संपू लागते. त्यामुळे योग विषयाची जागृती आणि आवड निर्माण करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची नितांत गरज आहे. त्यात विविध योग प्रकारांनी आता धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे नेमके कोणत्या मार्गावर जावे? काय योग्य? अयोग्य? हे समजून घ्यावे लागेल. योग विषयाबद्दल अनेक गैरसमजही आहेत. ते योग्य पद्धतीने दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा योग मार्गाचा स्वीकार करणे अडचणीचे ठरेल.
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी योग शिकवण्यासाठी विविध कालबद्ध कोर्सेसची आखणी करावी लागेल. विद्यार्थ्यांना योग शिकवताना त्याचे अनेक टप्पे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ योग विषयाची उत्सुकता वाढवणे महत्त्वाचे ठरेल. त्यात गोष्टी, गप्पा, उदाहरणे, थोरा-मोठ्यांच्या यशोगाथा यांची माहिती रंजकपणे देऊन पुढे या व्यक्तींची योग विषयाबद्दल असलेली रुची विद्यार्थ्यांना पटवून सांगावी लागेल. यातून आपण काय साधू शकतो? हे थोड्याफार प्रमाणात समजावणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आसने त्यांचे चार्ट्स, पुस्तके, टीप्स, खिशात मावतील अशा पुस्तिका यांची निर्मिती उपयुक्त ठरू शकते. सरकारी शाळांमध्ये योग सक्तीचा केल्यानंतर काही शाळांमध्ये सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांकडून आसने, प्राणायाम करवून घेणे सुरू करण्यात आले. पण योग पीटीच्या तासामधील अन्य खेळांसारखा खेळ प्रकार नाही. प्राणायामासाठीचे काही नियम आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे १२ वर्षांखालील अर्थात सातवीच्या खालच्या वर्गांतील विद्यार्थ्यांकडून प्राणायाम करून घेता कामा नये. श्वासोच्छ्वासाचे नियमन करणे त्यातील लयबद्धता जपणे १२ वर्षांखालील मुलांना कठीण आहे. शिवाय त्यांच्या शारीरिक स्थितीसाठीही ते योग्य नाही. त्यामुळे योगमार्गाचे अनुसरण करताना ते समजून उमजून करायला हवे. विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेली आसने टप्प्याटप्प्याने शिकवत, समजावून सांगत करायला हवी. तेव्हाच त्यांची या मार्गावरची वाटचाल सुकर आणि दीर्घकालीन होऊ शकेल.