Shiv Sena Shinde Group News: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. विधानसभेतील विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. तर महाविकास आघाडी पराभवाचा वचपा काढण्यासाठी सर्व जोर पणाला लावत आहे. परंतु, यातच ठाकरे गटाला पडलेले पक्ष गळतीचे भगदाड वाढताना पाहायला मिळत आहे.
काल मातोश्रीवर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आवर्जून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे.मुंबई महानगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि मोहसीन शेख यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटाचे माजी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, ५ तालुकाप्रमुख, १ शहरप्रमुख, विभागप्रमुख आणि त्यांचे सहकारी यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वर्धापन दिनीच पक्षात प्रवेश ही आनंदाची बाब
ठाणे शहरातील रामचंद्र नगर शाखा क्रमांक २३ चे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे व अनेक गटप्रमुख, उप-शाखाप्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचा वर्धापन दिन असून, भव्यदिव्य पद्धतीने साजरा केला जात आहे. वर्धापन दिनाच्या सोहळ्याला अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले आहेत. याच दिवशी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची ही पोचपावती असून त्यामुळेच आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येऊन दाखल होत असल्याचे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष करून मुंबईत पालिका निवडणुकीपूर्वी या सोहळ्यांना महत्त्व आहे. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर एकामागून एक माजी नगरसेवक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होताना दिसत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. परंतु, आता ही गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष सोडून जाऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी शर्थीचे प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असा कयास बांधला जात आहे.