यंदा संघर्षची दहीहंडी रद्द
By Admin | Updated: August 21, 2015 01:02 IST2015-08-21T01:02:51+5:302015-08-21T01:02:51+5:30
आॅगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला

यंदा संघर्षची दहीहंडी रद्द
ठाणे : आॅगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला. हंडीसाठी खर्च केला जाणारा निधी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ठाण्यातील ओपन हाऊस येथे संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून दहीकाला उत्सवाचे आयोजन केले जाते. दहीहंडीच्या माध्यमातून स्पेनच्या कॅसलर्सना त्यांनीच ठाण्यात आणले होते. तसेच, अनेक गोविंदा पथकांनाही प्रशिक्षणासाठी त्यांनी स्पेनला पाठविले होते. मोठमोठ्या बक्षिसांसाठी संघर्षची दहीहंडी प्रसिद्ध आहे. मात्र, राज्यात सध्या दुष्काळी स्थिती असल्यामुळेच त्यांनी ही दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार उदासीन आहे. थरांची मर्यादा, मंडपबंदी यामुळे उत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. त्यातच राज्य सरकारला या दुष्काळग्रस्तांबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. सरकारकडून अद्यापही शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आलेले नाही. तसेच, कर्जमाफीचाही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेषत: त्या भगिनींसाठी ही दहीहंडी रद्द करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शिवाय, दहीहंडीमध्ये होणारा पाण्याचा अपव्ययही रोखण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)