कार्यकर्त्यांनो, एकजूट व्हा !
By Admin | Updated: January 16, 2016 01:47 IST2016-01-16T01:47:55+5:302016-01-16T01:47:55+5:30
राग आणि गटबाजी सोडा, मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. हीच काँग्रेसची पद्धत आहे, असा मूलमंत्र देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल
कार्यकर्त्यांनो, एकजूट व्हा !
मुंबई : राग आणि गटबाजी सोडा, मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. हीच काँग्रेसची पद्धत आहे, असा मूलमंत्र देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपविण्याचा निर्वाणीचा इशाराही दिला.
आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयातील मुरली देवरा सभागृहाचे राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर पक्षकार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी भाषणाचा रोख मुंबई काँग्रेसमधील गटबाजीकडे वळविला. राहुल म्हणाले की, ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ हा मकरसंक्रांतीचा संदेश आहे. त्यामुळे इथे कार्यालयात तीळगुळाचा डबा ठेवायला मी सांगितले आहे. येणाऱ्या प्रत्येक नेत्याला लाडू द्या आणि गोड बोला. राजकारणात संघर्ष, मतभेद होतच राहतात. काँग्रेस लोकशाही मार्गाने चालणारा असल्याने थोडेफार पुढेमागे आपल्याकडे चालते. धाक दाखवून गप्प बसवायला हा काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही. मात्र, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल, असे राहुल म्हणाले.
तब्बल २२ वर्षे मुरली देवरांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणे किती अवघड आहे, याची मला कल्पना आहे. कुठून विरोध होतोय, कोण करतोय, हेच अनेकदा उमगत नाही. अशात २२ वर्षे अध्यक्षपदी ते राहिले याचाच अर्थ त्यांच्यात काही खास होतं. सदैव हसतमुख राहणाऱ्या देवरांनी मतभेद असणाऱ्यांनाही सोबत घेऊन काम केले, हेच काँग्रेसचे धोरण आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्वांनी पक्षांतर्गत मतभेद विसरून एकत्र यायला हवे. गटबाजी थांबवायला हवी, असे आवाहन गांधी यांनी केले. माझे काम सगळ्यांना एकत्र करण्याचे आहे. मात्र, गटबाजीचे प्रकार चालूच राहीले तर ‘शिस्त’ शिकवावी लागेल, अशी समज द्यायलाही राहुल विसरले नाही.
‘कॉम्प्लिकेटेड’ पार्टी
२००४पासून मी राजकारणात आहे. अनेक प्रदेश काँग्रेस कमिट्यांना भेटलो. त्यांच्या अडचणी काय असतात याची मला कल्पना आहे. कोण व कसा विरोध करेल याचा नेम नाही, असे सांगत काँग्रेस म्हणजे ‘कॉम्प्लिकेटेड’ पार्टी असल्याचे ते म्हणाले.
मुंबई अध्यक्षपद म्हणजे ‘हॉट सीट’
मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजे एक प्रकारे ‘हॉट सीट’ असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र, दिवंगत मुरली देवरा यांनी तब्बल २२ वर्षे ही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे निरुपम बघा थोडं, असा चिमटा चव्हाणांनी काढताच सभागृहात हशा पिकला. मुंबईसाठी तीळगूळ घ्या आणि गोड बोला, हा संदेश घेऊनच सगळे आलो आहोत, असे चव्हाण म्हणाले.
उत्साही कार्यकर्ते आणि हैराण पोलीस
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
३ वाजताच सभागृह गच्च भरल्याने पोलिसांनी गडबड टाळण्यासाठी सभागृहाकडे जाणारा मार्ग बंद केला.
मात्र, आत जाणारच अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांचा लोंढा पोलिसांच्या बॅरेकेडवर धडकला. या गोंधळात सुरक्षा तपासणीसाठी लावलेले ‘मेटल डिटेक्टर’ मात्र निखळून पडले.