बारा दिवसांत संपले दीड टीएमसी पाणी
By Admin | Updated: May 18, 2016 00:41 IST2016-05-18T00:41:04+5:302016-05-18T00:41:04+5:30
खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे.

बारा दिवसांत संपले दीड टीएमसी पाणी
पुणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. त्यातील ०.४० टीएमसी पाणी पुणे शहरासाठी सोडण्यात आले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांमध्ये अवघा ३.५० टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे.
दौंड साठी ४ मे रोजी पाणी सोडण्यात आले होते, त्या वेळी या चारही धरणांमध्ये सुमारे ५.०४ टीएमसी पाणीसाठा होता. तो मंगळवारी (दि. १७) सकाळी ३.५४ टीएमसी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन, पालखीसाठी पाणी, दोन मोठ्या टाऊनशिपसाठी पाणी तसेच धरणाचा शिल्लक साठा याचे कशा प्रकारे केले जाणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील वर्षी जेमतेम ५० टक्के धरणे भरल्याने या चारही धरणांत केवळ ५० टक्केच पाणीसाठा होता. हे सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३२ गावांसह दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी सुमारे १.६० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सर्व पाणी पुणेकरांसाठीच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात या गावांमध्ये पुन्हा पाणी सोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या गावांना केवळ अर्धा टीएमपी पाणी सोडण्यात येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे पाणी एक टीएमसी असेल, असे सांगण्यात आले. त्याला राजकीय पक्षांचा विरोध असतानाही ४ मेपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून, १९ मेपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)
कालव्यातून १,२०० क्युसेक्सने पाणी
४ मे रोजी पाणी कालव्यातून सोडण्यात आले, त्या वेळी ६०० क्युसेक्सने ते सोडण्यात येत होते. त्यानंतर आजअखेर १,२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.
वरसगाव-टेमघरने गाठला तळ
या धरणप्रणालीतील वरसगाव आणि टेमघर धरणाने तळ गाठला आहे. ४ मे रोजी वरसगाव धरणात १.१० टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा आजअखेर ०.५२ टीएमसी झाला आहे. तर, टेमघर धरणार १२ दिवसांपूर्वी ०.१७ टीएमसीवर असलेला पाणीसाठी ०.0९ टीएमसीवर आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.