मद्य कारखान्याने सुखना धरणात कालवले विष!

By Admin | Updated: June 22, 2015 02:40 IST2015-06-22T02:40:57+5:302015-06-22T02:40:57+5:30

औरंगाबाद तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांची तहान भागविणाऱ्या, हजारो हेक्टर शेती फुलविणाऱ्या अन् देशीविदेशी पक्ष्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या सुखना धरणात

Wine factory toxic poison in Sukna dam! | मद्य कारखान्याने सुखना धरणात कालवले विष!

मद्य कारखान्याने सुखना धरणात कालवले विष!

विनोद काकडे/संजय देशपांडे, औरंगाबाद
औरंगाबाद तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांची तहान भागविणाऱ्या, हजारो हेक्टर शेती फुलविणाऱ्या अन् देशीविदेशी पक्ष्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या सुखना धरणात चक्क विष कालवले जात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून हा भीषण आणि भयावह प्रकार समोर आला. कोणतीही प्रक्रिया न करता विषारी रसायन थेट सुखना धरणात सोडत हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचे काम शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको या मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीकडून गेल्या दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे.
१९७२ साली बांधलेले सुखना धरण जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरले आहे. मात्र, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको एनव्ही डिस्टलरीज् महाराष्ट्र लि़ या धान्यापासून मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीतून निघणारे विषारी रसायन या धरणात सोडले जात असल्याने परिसरातील हजारो नागरिक, पशुधन आणि शेती धोक्यात आली आहे़ तसेच धरणातील पाण्याचा रंगही बदलला आहे. या दूषित पाण्यामुळे शेती उजाड होत आहे, जनावरे मरत आहेत, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशा तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी रॅडिको ते सुखना धरण, अशी पंधरा किलोमीटरची परिक्रमा केली. तेव्हा या कंपनीत सत्ताधारी मोठ्या राजकीय नेत्यांची भागीदारी असल्याने कोणताही विभाग कारवाई करण्यासाठी धजत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
राजकीय दबावामुळेच कारवाई नाही
हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या रॅडिकोविरुद्ध काहीच कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आ.नि. काटोले यांच्याशी संपर्क साधून संभाषणाचे रेकॉर्डिंग केले.
तेव्हा काटोले यांनी ‘आमच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे’ असे म्हणत हा दबावच कारवाईला अडथळा निर्माण करीत असल्याची कबुली दिली. त्यांचे हे रेकॉर्डिंगही ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.
पाणी रॅडिकोचेच -तहसीलदार
परिसरातील रहिवाशांच्या तक्रारीनंतर औरंगाबादचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी ५ जून २०१५ रोजी तेथे जाऊन पाहणी करीत पंचनामा केला. तहसीलदारांनी आपल्या पंचनाम्यात हे पाणी रॅडिको कंपनीच सोडत असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. रोगराई पसरत आहे. नागरिक आणि पशू-पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्या पंचनाम्याची प्रतही ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.
पोलीस म्हणतात, कारवाई व्हावी
याबाबत परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर १ एप्रिल २०१५ रोजी करमाड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर.डी. चव्हाण, डी.जी. बेले, अशोक वाघ यांनी मध्यरात्रीनंतर २ वाजता रॅडिको कंपनीपासून ते कुंभेफळपर्यंत पाहणी केली. तेव्हा ही कंपनीच नाल्यात विषारी रसायनयुक्त पाणी सोडत असल्याचे आढळून आले. रॅडिको कंपनीविरुद्ध सीआरपीसी कलम १३३ (ख) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल करमाड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हर्ष पोद्दार यांनी तहसीलदार मुंडलोड यांना दिला होता. त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
पाझर तलाव रक्ताळला
वोखार्डच्या बाजूला असलेला पाझर तलाव रॅडिकोच्या केमिकलमुळे अक्षरक्ष: रक्ताळलेला दिसून आला. तलावातील संपूर्ण पाणी केमिकल मिसळल्याने लालभडक झालेले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने हा तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे पुढे सांडव्यावरून हे पाणी कुंभेफळकडे जाणाऱ्या नाल्यात पडताना अक्षरक्ष: लाल रंगाचा धबधबा कोसळावा, असे चित्र दिसत आहे.

Web Title: Wine factory toxic poison in Sukna dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.