‘महाजेन्को’ च्या प्रकल्पाची पाहणी करणार
By Admin | Updated: December 17, 2014 00:27 IST2014-12-17T00:27:35+5:302014-12-17T00:27:35+5:30
पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने

‘महाजेन्को’ च्या प्रकल्पाची पाहणी करणार
रामदास कदम : त्रुटी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन
नागपूर : पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने घेतली आहे. या केंद्राला येत्या दोन-तीन दिवसांत भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कदम यांनी मंगळवारी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे चंद्रपूर वीज केंद्रात ‘महाजेन्को’ कडून उल्लंघन केले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली.
याबाबत विचारणा केली असता, पर्यावरण विभागाचे सचिव राजीव कुमार यांच्यासमवेत या केंद्राची पाहणी करूव नेमके कशाप्रकारे पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे किती प्रमाणात पालन होत आहे, याचा आढावा घेऊ. जर यात त्रुटी आढळल्या तर नियमानुसार निश्चित कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी कदम यांनी राज्यातील पर्यावरणाबाबत चर्चा केली. जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून कुठल्याही स्थितीत आम्ही नमते घेणार नाही, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. कोकणातील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पासाठी कोकणातीलच मातीचा उपसा करून समुद्रात भराव घालण्यात येईल.
यामुळे कोकणच्या पर्यावरणाची हानी होऊ शकते. संपुआ सरकारने फ्रेंच कंपनीसोबत एक लाख मेगावॅट ऊर्जानिर्मितीसाठी करार केला. परंतु देशातील निरनिराळ्या ठिकाणी ही ऊर्जा निर्माण होऊ शकते, मग जैतापूरचा आग्रह का, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
आम्ही फडणवीसांच्या पाठीशी
शिवसेना व भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. विचारभिन्नता जरी असली तरी त्यामुळे राज्याच्या प्रशासनावर काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्तबगार व हुशार व्यक्ती आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात राज्य विकासाचे शिखर गाठेल. आमचा पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.