ग्राहक राजाच राहील असे काम करू : बापट

By Admin | Updated: May 23, 2016 02:01 IST2016-05-23T02:01:58+5:302016-05-23T02:01:58+5:30

देशाचा पंतप्रधान व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचा आहे. ग्राहकांचे अर्थात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचे ते काम करीत आहेत

Will the customer continue to work as king: Bapat | ग्राहक राजाच राहील असे काम करू : बापट

ग्राहक राजाच राहील असे काम करू : बापट

पुणे : देशाचा पंतप्रधान व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचा आहे. ग्राहकांचे अर्थात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचे ते काम करीत आहेत. त्यामुळे येत्या ६ महिन्यांत ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन राज्याचा दौरा करून ग्राहकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न होईल. ग्राहक हा राजा आहे आणि तो राजाच राहील, असे काम आम्ही करू, असा विश्वास ग्राहक संरक्षण व अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी बापट बोलत होते. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अरुण देशपांडे, उपाध्यक्ष रवींद्र साळुंके व धनंजय गायकवाड, अधिवेशनाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत पाठक, सचिव दुर्गाप्रसाद सैनी, ठकसेन पोरे, डॉ. वीणा पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकाला देव मानण्याची आपली परंपरा आहे. परंतु, या परंपरेला छेद देण्याचेच काम झाले. आता मात्र देशात व राज्यात सत्तांतर झाले आहे. ग्राहकांच्या हिताचे हे सरकार आहे. ग्राहक पंचायतीने संपूर्ण देशभरातील ग्राहकांचे विविध प्रश्न एका व्यासपीठावर आणावेत. त्यासाठी एक राष्ट्रीय समिती स्थापन करावी. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील सरकारची मदत मिळवून देण्यासाठी मी मदत करेन, असे खासदार सोमय्या यांनी सांगितले.
अन्नधान्य व अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असताना अन्न सुरक्षिततेचा कायदा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे त्यात दुरुस्ती करून भेसळ करणाऱ्यास जन्मठेप अथवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करावी, प्रत्येक हॉटेलमध्ये अन्नात भेसळ झाल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता यावा, यासाठी तो दर्शनी भागात लावावा. यासंबंधी राज्य सरकारने आदेश काढावेत, पाण्याची तपासणी करण्याचा अधिकार अन्न निरीक्षकाला द्यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून बिल्डरांच्या प्रस्तावांना ठराविक दिवसांतच मंजुरी देण्यासंबंधी कायदा करावा आदी मागण्यांचे निवेदन ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी याप्रसंगी केले.पॅकिंगच्या पाण्याचा मोठा घोटाळा!
देशात पॅकिंगच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये ९० टक्कयांहून अधिकांकडे परवाने नाहीत. त्यामुळे ते अशुद्ध पाणी विकतात. त्यांचा हिशेब कोणाकडेच नाही. यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा आहे. मुंबई महापालिकेमध्ये पाण्याचा माफियाराज सुरू असल्याचा आरोप करून खासदार किरीट सोमय्या यांनी देशभरातील हा भ्रष्टाचार आपण समोर आणणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की आपण समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतो. असे करीत असताना आजवर एकदाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणांस रोखले नाही. काँग्रेस सरकारच्या काळात दबलेल्या चिटफंड घोटाळ्यातील अनेकांना आता अटक होत आहे. यापुढील काळातही नागरिकांच्या हिताशी आणि त्यांच्या विकासाशी खेळणाऱ्यांना हे सरकार सोडणार नाही.

Web Title: Will the customer continue to work as king: Bapat