भ्रष्ट गुंता सुटेल का?
By Admin | Updated: October 14, 2015 14:43 IST2015-10-14T04:05:10+5:302015-10-14T14:43:18+5:30
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आठवडाभरात अनेक तर्कवितर्क काढले गेले. परमार हे बरबटलेल्या व्यवस्थेचे बळी असल्याचा संशय दाट होत गेला

भ्रष्ट गुंता सुटेल का?
डिप्पी वांकाणी , मुंबई
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बकऱ्याप्रमाणे वागणूक दिली आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या भेटीला कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी अत्यंत हीन वागणूक दिली, त्यामुळे आपण अस्वस्थ होतो, असे आत्महत्या करणारे बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आपल्या पत्रात लिहून ठेवले आहे.
सूरज परमार यांचे चुलत भाऊ उदय परमार यांनी लोकमतला ही माहिती दिली. ते म्हणाले की, सूरज यांच्यासमोर कोणतीही वित्तीय अडचण नव्हती. कंपनीवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही. त्यामुळे सूरज खचण्याचा प्रश्नच नाही. मात्र आम्ही ठाणे पोलिसांच्या तपासावर समाधानी आहोत. सूरज यांनी आत्महत्या करून आठवडा उलटून गेला; पण आतापर्यंत आमच्याकडे कोणीही एका पैशाची मागणी केलेली नाही. सूरजने आत्महत्या करण्यापूर्वी आम्ही कार्यालय सुरू केले होते आणि त्या दिवशी तीन फ्लॅटही बुक झाले होते. ठाण्यात हिरानंदानी यांच्या गृहप्रकल्पाजवळच ग्राहकांनी कॉसमॉस क्लासिक या गृहप्रकल्पात हे फ्लॅट घेतले होते.
उदय म्हणाले, जेव्हा जेव्हा सूरज मला भेटत असे तेव्हा तेव्हा ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी देत असलेल्या वाईट वर्तणुकीबद्दल तो बोलत असे. तो किती अभ्यासू होता हे आता आम्हाला कळले आहे. ठाण्यातील ६० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च तो करीत असे. ही बाब आमच्यापैकी कोणालाही माहिती नव्हती, त्याला अभ्यासातही खूपच रस होता. दोन वर्षांपूर्वी लंडन येथे जाऊन त्याने बिझनेस इकॉनॉमिक्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
पोलिसांनी सूरजची ‘सुसाईड नोट’ ‘फोरेन्सिक’ तपासणीसाठी पाठविली आहे. या नोटमध्ये सूरज यांनी काही अधिकाऱ्यांची नावे खोडून टाकली आहेत. त्यामुळे ती वाचता
येत नाही, असे सांगून उदय म्हणाले की, असे असले तरी फोरेन्सिक लॅबमध्ये ही नावे शोधून काढता येतील, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. आता आम्हाला अहवालाची प्रतीक्षा आहे.
परमार यांचे आजोबा मोठे जमीनदार होते. त्यांना दोन मुले होती. या दोघांना उदय आणि सूरज ही दोन मुले. या दोघांनीही बांधकाम कंपनी सुरू केली. १९९८-९९ मध्ये त्यांची वाटणी झाली. त्यातून उदयने परमार कन्स्ट्रक्शन्स, तर सूरजने कॉसमॉस ग्रुप ही कंपनी स्थापन केली.
------------------------
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आठवडाभरात अनेक तर्कवितर्क काढले गेले. परमार हे बरबटलेल्या व्यवस्थेचे बळी असल्याचा संशय दाट होत गेला. सर्व बांधकाम व्यावसायिक या विरोधात एकवटले. परमार यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधून काढण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. पोलीस आणि महापालिका आता या प्रकरणाचा सर्वांगाने तपास करू लागली आहे. बांधकाम परवानग्या आणि संबंधित समस्या, त्यात होणारी चालढकल, त्यातून लाटला जाणारा मलिदा, या सर्वच समस्यांवर एक कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो का, हा भ्रष्ट गुंता सुटेल का, याचीही चाचपणी चालू झाली आहे.
--------------------------
>>ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांचा भव्य मूक मोर्चा
ठाणे : यंत्रणा, प्रशासन आणि वेठीला धरणारी ‘गोल्डन गँग’ यांना कंटाळून मागील आठवड्यात ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या केली. अशी वेळ अन्य कुणा बांधकाम व्यावसायिकावर येऊ नये यासाठी मंगळवारी शहरातील सुमारे १० हजार बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खारकर आळी ते महापालिका मुख्यालय असा मूक मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व ‘एमसीएचआय क्रेडाई’, ठाणे यांनी केले. यावेळी आयुक्तांना पाच पानांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चेकऱ्यांनी निषेधाचे बॅनर घेऊन हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या. त्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या ‘कॉसमॉस ग्रुप’च्या कार्यालयाबाहेर परमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेणबत्या लावून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. बांधकामासाठी विविध परवाने देण्याची प्रक्रिया सोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परमार यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या कुटुंबाला धोका संभवू शकतो असा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संपूर्णपणे संरक्षण मिळावे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली. पालिकेत ज्या पध्दतीने सध्या बांधकाम प्रकल्पांच्या मंजुरीच्या फाईल कूर्मगतीने सरकत आहेत, ते थांबवून त्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चात परमार यांचे कुटुंबिय, एमसीएचआयचे अध्यक्ष अजय आशर, सचिन मिरानी, राजन बांदेलकर यांच्यासह बिल्डर आणि आर्किटेक्ट सहभागी झाले.